'भारत पे'चा संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आहे. शार्क टँक इंडिया कार्यक्रमातून नावारुपास आलेला उद्योजक त्याच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. परखडपणे व्यक्त होणे, ही अश्नीर ग्रोव्हर यांची खासियत आहे. नुकतेच त्यांची एक पोस्ट चर्चेत आहे. प्राप्तीकर विभागाने सकाळी ८ वाजता अश्नीर ग्रोव्हर यांना नोटीस बजावली आणि दुपारी १२.२८ ला उत्तर देण्याचे आदेश दिले. या नोटिशीनंतर ग्रोव्हर यांनी एक्स अकाऊंटवर केलेले विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. "कर दहशतवाद की सूड? तुम्हीच निवड करा. त्यापेक्षा थेट गोळीच घाला", असा नाराजीचा सूर अश्नीर ग्रोव्हर यांनी प्राप्तीकर विभागाच्या नोटिशीवर लावला आहे. सकाळी ८ वाजता नोटीस मिळाल्यानंतर दुपारी १२.२८ ला मला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून ग्रोव्हर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भारताचा प्राप्तीकर विभाग आणि अर्थमंत्री कार्यालयाला या पोस्टमध्ये टॅग केले आहे. या पोस्टमध्ये ग्रोव्हर यांनी प्राप्तीकर विभागाच्या नोटिशीचे फोटोही जोडले आहेत. प्राप्तीकर कायदा १९६१, च्या कलम १४२ च्या उपकलम १ नुसार ही नोटीस जाहीर केल्याचे यावरून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारत पे मधील ग्रोव्हर यांच्या वाट्याबाबतचा दावा निकाली लागल्यानंतर ते चर्चेत आले होते. बिझनेस टुडे या संकेतस्थळाने ग्रोव्हर यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात, "देशातील करदाते दानधर्माचे काम करत आहेत. त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. जर आपण १० रुपये कमावत असू तर त्यातील चार रुपये सरकारला कराच्या स्वरुपात जातात. याचा अर्थ १२ महिन्यांमधले जवळपास पाच पाहने आपण सरकारसाठी काम करतो. मग मला सांगा आपल्या आयुष्यातील किती वर्ष आपण सरकारसाठी राबत असतो.. आणि आपण या सर्व गोष्टी स्वीकारल्या आहेत. असंच आहे ना…"