डॉ. आशीष थत्ते

सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्या तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपल्या पुढील वर्षांचे अंदाजपत्रक आधीच बनवून ठेवतात आणि त्याचा मोठा सोहळा म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प असतो. सरकारी अंदाजपत्रकात नक्की किती फायदा होईल किंवा तोटा होईल असे नसून पुढील वर्षी किती खर्च होईल त्याची तयारी असते. तसेच कंपन्यांमध्ये मात्र किती फायदा किंवा तोटा होईल याकडे अधिक लक्ष केंद्रित केले जाते. अर्थात वेगवेगळ्या विभागांकडून किती खर्च केला जाईल आणि त्यांना किती निधी वर्षभरात दिला जाईल याची मंजुरी अंदाजपत्रकाद्वारे घेतली जाते. कंपन्या आपले अंदाजपत्रक बनवताना अतिशय सूक्ष्म आणि सखोल विचार करतात. प्रत्येक लहान-मोठ्या खर्चाचा समावेश त्यात केला जातो. उत्पन्नाचा प्रत्येक स्रोत अधिकाधिक प्रमाणात कसा येईल याचे नियोजन केले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी खर्चाचा हिशोब मांडला जातो. उत्पन्नदेखील प्रत्येक महिन्याला पडताळून बघितले जाते आणि अंदाजापेक्षा कमी झाल्यास त्याची कारणमीमांसा केली जाते. कंपनीने निश्चित केलेल्या मार्गावर आणि ठरलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने मार्गक्रमण करणे हे अंदाजपत्रकाचे महत्त्वाचे काम असते. किंबहुना, कित्येक वेळेला खर्च बघून कंपनीची पुढील दिशा काय असेल याचा अंदाज येतो.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

आपण घरी काही लिखित स्वरूपात घरगुती अंदाजपत्रक बनवतो असे नाही. मात्र आजच्या साठी किंवा सत्तरीत असणारी पिढी निश्चित ते बनवत असतील. आपल्या जुन्या पिढीत हमखास रोजचा हिशोब लिहिणे ही प्रथा होती. म्हणजे थोडक्यात ती अंदाजपत्रकाशी पडताळणीच असायची. नवीन पिढी हल्ली सगळे व्यवहार ऑनलाइन करतात, त्यामुळे खर्चाची आपोआपच नोंद होते. दर महिन्याला थोडासा वेळ काढून याचे विश्लेषण केले तर नक्की खर्च कुठे झाला आणि पुढील महिन्याचा अंदाजदेखील येऊ शकतो. आपण वाढदिवस, काही विशेष समारंभ यासाठी आधीच अंदाज बांधून तेवढे पैसे बाजूला काढून ठेवतो म्हणजे एक प्रकारचे अनौपचारिक अंदाजपत्रकच मांडतो. हल्ली घरात तीन किंवा चार माणसे कमावणारी असतात, पण बऱ्याचदा बचत मात्र मनासारखी होत नाही. परत तरुण पिढीला अंदाजपत्रक म्हणजे खर्चावरच्या मर्यादा असे वाटते. मात्र ते तसे नसून हुशारीने खर्च करणे असे असते. म्हणूनच अंदाजपत्रक तयार करणे महत्त्वाचे असते. अर्थात अंदाज बांधला असल्याने तो तंतोतंत बरोबर येईलच असे नाही. पण तरीही सवय म्हणून किंवा भविष्यातील निधीच्या योग्य व्यवस्थापनासाठी ते निश्चित फायदेशीर ठरते आणि यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. अंदाजपत्रकामुळे यादी घेऊन खरेदी, उत्पन्नाचे सतत नवीन स्रोत शोधणे, गुंतवणुकीच्या चांगल्या संधी पडताळणे किंवा बचतीचे विविध मार्ग शोधणे अशा चांगल्या सवयी लावून घेऊ शकतो. अगदी ‘क्विन’ चित्रपटात कंगना राणावतने अंदाजपत्रकात मांडल्याप्रमाणे, लग्न मोडल्यावरही मधुचंद्राचा खर्च फुकट जाऊ नये म्हणून केलेली सहल फायद्याची ठरते असेच दाखवले आहे. म्हणजे अंदाजपत्रक मांडण्याची सवय जशी कंपन्यांना असते, तशी सामान्यांनासुद्धा असावी आणि ती फायदेशीर असते.

Twitter : @AshishThatte
E-mail : ashishpthatte@gmail.com