रोहिणी शहा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून या घटकाबाबत पुढील मुद्दे लक्षात येतात. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय चळवळ हा भाग अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्रपणे विहीत केलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा दोन कालखंडांमध्ये विभागणी करुन या घटकाचा अभ्यास करणे शक्य आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये राजकीय, सामाजिक व आर्थिक अशा सर्व आयामांचा अभ्यास महत्त्वाचा आहे, तर स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या राजकीय आयामास जास्त महत्व देण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व राजकीय इतिहासामध्ये १८५७च्या उठावापासूनच्या स्वातंत्र्य चळवळी आणि त्या काळातील काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष, संघटना, क्रांतिकारी चळवळी यांचा विचार करण्यात आलेला दिसतो. तर समाज सुधारणा, भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल यांबाबत ब्रिटीशांचे धोरण, नीती आणि भारतीयांचे प्रयत्न व अभ्यास अशा दोन्ही पैलूंवर प्रश्न विचारण्यात येतात. या विश्लेषणाच्या आधारे तयारी कशी करावी ते पाहू. स्वातंत्र्यपूर्व इतिहास: * ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात. * शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव, गांधीयुगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इ. च्या चळवळी/बंड अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे करता येईल. * कारणे/पाश्र्वभूमी, स्वरूप, विस्तार, वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम * काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्था, ग्रामीण भारतातील उठाव यांचा आढावा कोष्टकामध्ये घेता येईल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास पुढील मुद्यांच्या आधारे तुलना करुन करता येईल. - * स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पाश्र्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील नेत्यांच्या मागण्या, महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया * सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार यांचा पाश्र्वभूमी, कारणे व परिणाम या मुद्यांच्या आधारे आढावा घ्यावा. * क्रांतिकारी विचार आणि चळवळींचा उदय हा मुद्दा उदयाची पाश्र्वभूमी, स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे स्वरुप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्यांच्या आधारे करावा. * गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासाव्यात. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरु झालेले वैशिष्टय़पूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, जातीय सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा. * वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत. * समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती - पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, सहकारी, स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र /नियतकालिक, साहित्य, महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद आणि इतर माहिती हे मुद्दे पहायला हवेत. * यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास : या विभागामधे घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका हा घटक राज्यव्यवस्था घटकामधून तयार होईल. * संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत सर्वागीण अभ्यास करायला हवा. तसेच उशीरा विलीन झालेल्या संस्थानांबाबत महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्याव्यात. * भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. * इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत अंतर्गत राजकीय घडामोडींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. आणीबाणी काळातील महत्त्वाच्या घडमोडी, नेते, त्यांचे कार्य, विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळी उदा. जयप्रकाश नारायण यांचे विद्यार्थी आंदोलन, आनंदपूर साहिब प्रस्ताव, भाषावार प्रांत रचनेबाबतचे संघर्ष अशा मुद्यांचा अभ्यास आवश्यक आहे. * स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्तिसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळी महत्त्वाच्या ठरतात. भाषावार प्रांत रचनेची मागणी, मराठी साहित्य संमेलने, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाची मागणी याबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे. * आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चर्चेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.