या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलाखतीची संकल्पना आणि अंतर्भूत घटक यांची चर्चा केल्यानंतर आजच्या लेखात प्रत्यक्ष मुलाखतीत द्यावयाच्या उत्तरांचा आशयात्मक अंगांनी विचार करणार आहोत. म्हणजेच उत्तरांचा आशय कसा असावा, त्याबाबतीत कोणत्या चुका टाळाव्यात, कोणती खबरदारी घ्यावी, उत्तरात नेमकेपणाची हमी कशी द्यावी या महत्त्वपूर्ण बाबींचा ऊहापोह करणार आहोत.

उमेदवार ज्या सेवेत रुजू होण्याचे स्वप्न बाळगून तयारी करतात त्यांच्याकडून मुलाखत मंडळ सेवेविषयी किमान आकलनाची अपेक्षा बाळगते. यात सनदी सेवेचा अर्थ, तिचे स्वरूप, काय्रे आणि जबाबदाऱ्या, कार्यप्रणाली व अधिकार, लोकप्रतिनिधींशी अपेक्षित व प्रत्यक्षात असणारा संबंध, सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील तिचे स्थान यापासून ते गेल्या २५ वर्षांच्या उदारीकरणाच्या काळात तिचे बदललेले स्वरूप व भूमिका, तिच्यासमोर उभी राहिलेली आव्हाने; तिच्यातील दोष-त्रुटी, समस्या; त्यातील सुधारणांचा थोडक्यात इतिहास आणि सद्य:स्थितीत आवश्यक सुधारणा या मुद्दय़ांपर्यंत तयारी करणे अपेक्षित आहे. यातील किमान नागरी सेवेची काय्रे-भूमिका आणि समाजबदलाच्या प्रक्रियेतील सकारात्मक योगदान देण्याची तिची क्षमता याविषयी नेमकी माहिती असावी. कारण ते उमेदवारांना विचारल्या जाणाऱ्या मूलभूत प्रश्नासंदर्भात मध्यवर्ती ठरते, तो प्रश्न म्हणजे – ‘तुम्हाला नागरी सेवेत का यायचे आहे? या प्रश्नाचे एखादे छापील उत्तर कधीच असू शकत नाही. प्रत्येक उमेदवाराचे त्याविषयक एक मत असते, जे स्वत:चा सामाजिक-आíथक-राजकीय स्तर, जीवन व्यवहाराचा अनुभव आणि भोवतालच्या परिस्थितीचे स्वत:चे आकलन यातून आकारास येते. नागरी सेवेकडे आकृष्ट होण्याची प्रत्येकाची प्रक्रिया आणि कारणेही विभिन्न असतात. अर्थात ती विधायक असावीत. त्यामुळे या मूलभूत प्रश्नाचे इतर कोणाकडे तयार, छापील उत्तर न मागता स्वत: विचार करून आपले उत्तर विकसित करावे. वस्तुत: प्रत्येकाकडे ते असतेच, परंतु विचारपूर्वक, नेमकेपणाने, स्पष्टपणे व आत्मविश्वासपूर्वक ते मांडण्याचा प्रयत्न करावा. आत्तापर्यंतच्या जीवनात शासकीय सेवेशी आलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध, समोर आलेले एखादे विधायक कार्य अथवा प्रयोग, एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा, इ. बाबी या प्रश्नाच्या बाबतीत साहाय्यभूत ठरतात. उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे, या प्रश्नाचे जे उत्तर दिले जाईल त्यातून उमेदवाराचे नागरी सेवाविषयक आकलनही तपासले जाते हे लक्षात घ्या आणि तयारी करा.

मुलाखतीसंदर्भात विचारला जाणारा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विचारलेली एखादी बाब, कळीचा मुद्दा वा घटनेविषयी कोणती भूमिका घ्यायची? हा होय. मुलाखतीत जे माहितीवजा, तथ्याधारित प्रश्न विचारले जातात त्याबाबतीत हा मुद्दा उपस्थित होत नाही. परंतु एखाद्या मुद्दय़ाविषयी भूमिका अथवा मत अजमावणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत नेमके काय म्हणायचे असा प्रश्न उद्भवू शकतो. अशा प्रश्नासंदर्भात पुढील बाबी मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरू शकतात. पहिले म्हणजे एखाद्या मुद्दय़ासंदर्भातील आपली भूमिका राज्यघटनेतील कायद्याचे राज्य, जनसार्वभौमत्व, लोकशाही, लोकाभिमुखता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य-समता-बंधुता, न्याय, संघराज्याचे तत्त्व या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. घटनात्मक चौकटीला समोर ठेवूनच आपली भूमिका निश्चित करावी. दुसरे म्हणजे आपली भूमिका योग्य तथ्य व माहितीवर आधारित असावी. वरवरची माहिती उपयोगाची नाही. तिसरे, एखाद्या मुद्दय़ाविषयी स्वत:ची भूमिका ठरवताना त्याविषयी विविध (किमान प्रमुख) मतमतांतरे आणि भूमिकांचा तौलनिक विचार केलेला असावा. त्यामुळे आपल्या विरुद्ध भूमिकेसंदर्भात विचारल्यास आत्मविश्वासाने मत मांडता येईल. शेवटी, स्वत:च्या भूमिकेतील मर्यादांचाही योग्य विचार करा. जेणेकरून त्याविषयक पडताळणी अथवा उलटतपासणी करणाऱ्या प्रश्नांचे-उपप्रश्नांचे व्यवस्थितपणे उत्तर देता येईल. या घटकांचा एकंदर विचार करता असे लक्षात येते की, महत्त्वाच्या संभावित मुद्दय़ाविषयी पुरेसे वाचन, चिंतन, मनन करूनच स्वत:चे मत वा भूमिका निर्धारित करावी आणि त्यासाठी समर्पक माहिती, तथ्य वा आकडेवारीचा आधार द्यावा.

मुलाखतीतील उत्तरांचा विचार करताना लक्षात घ्यायची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे उत्तराची व्याप्ती होय. मुलाखतीसारख्या तोंडी, संवादरूपी प्रकारचा अनुभव नसल्यामुळे आपली उत्तरे मोठी, पाल्हाळ व मोघम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना बहुतांश विद्यार्थ्यांना पहिला ‘टू‘ कल्ल३ी१५्री६’ दिल्यानंतर ‘नेमके बोला’ असा नेहमीचा परंतु महत्त्वपूर्ण शेरा दिला जातो. त्या दृष्टीने पाहता उत्तर देताना भलीमोठी प्रस्तावना, पाश्र्वभूमी देणे कटाक्षाने टाळावे. थेट मुद्दय़ाविषयी बोलण्यास सुरुवात करणे अधिक श्रेयस्कर! त्यासाठी मुलाखतीतील विविध अभ्यास घटकांची तयारी करताना नेमक्या शब्दात, मुद्देसूद नोट्स वा टिपणे काढून ठेवावीत. आवश्यकता भासल्यास प्रश्नोत्तराच्या स्वरूपात प्रश्न व उत्तरात्मक प्रतिसाद लिहून काढावा. त्यासंदर्भातील आकडेवारी, उदाहरणेदेखील नेमकेपणाने लिहून काढावीत. अशा तयारी प्रक्रियेमुळे आपली उत्तरे नेमकी, स्पष्ट आणि प्रभावी करता येतील. दुसरी बाब म्हणजे आपल्या उत्तराची लेखी स्वरूपात रंगीत तालीम केल्यामुळे त्यातून उद्भवणाऱ्या/संभवणाऱ्या प्रश्नांचाही अंदाज घेऊन त्याचीही तयारी करता येईल. यामुळे आपले मत आणि भूमिकेत स्पष्टता आणणेही शक्य होते.

मुलाखत मंडळ काही वेळा जाणीवपूर्वक एखाद्या बाबीच्या नकारात्मक अंगाविषयी मुद्दा उपस्थित करते तर काही वेळा एखाद्या घटितासंदर्भात निराशावादी चित्र उभे करते. कदाचित काही वेळा उमेदवाराकडूनच अशा प्रकारचे नकारात्मक चित्र ‘कबूल’ करवून घेण्याचा प्रयत्न करू शकते. अशा प्रसंगी उमेदवार संरक्षणात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न करतो किंवा द्विधा स्थितीत अडकतो. जेव्हा अशी स्थिती/प्रसंग निर्माण होतो तेव्हा अत्यंत आत्मविश्वासाने संबंधित मुद्दय़ाची नकारात्मक बाजू मान्य करूनही त्यातील सकारात्मक बाजू निदर्शनास आणाव्यात. कारण असे प्रश्न उमेदवार नकारात्मक, निराशावादी तर नाही ना याची चाचपणी करणारे असू शकतात. अर्थात संबंधित घटकाचे वास्तव तपासणेही महत्त्वाचे ठरते. अशा रीतीने एखाद्या विषयाची उणिवात्मक, दोषात्मक, नकारात्मक बाजू माहिती असणे महत्त्वाचे ठरते. तथापि तिची सकारात्मक, रचनात्मक आणि विधायक बाजूदेखील अवगत असावी. आपला सूर सकारात्मक व आशावादी राहील याची खबरदारी घ्यावी. त्या दृष्टीने विचार करता समाजजीवनातील विविध मार्गदर्शक, विधायक प्रयोगाचे भान साहाय्यभूत ठरते. राजकारण, प्रशासन, अर्थकारण, उद्योग, सहकार, स्थानिक संस्था, सामुदायिक पातळी, बिगरशासकीय संस्था, कला-क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण प्रयोगाचे आकलन पायाभूत ठरू शकते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview preparation in upsc
First published on: 26-01-2017 at 00:17 IST