२६ नोव्हें.च्या ‘करिअर वृत्तांत’ पुरवणीतील ‘नवनिर्माणाचे शिलेदार’ या सदरात ‘चौकटीत राहून चौकटीबाहेरचे काम’ या मथळ्याखाली जी कथा आपण निवेदन केली आहे, ती खरोखर स्पृहणीय अशा आशयाची व अनुकरणीय अशा तात्पर्याची आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांतील असामान्यत्व समाजापुढे आणून कार्यकर्त्यांनी प्रोत्साहित करण्याचा दुर्मीळ असा परिणाम त्यामुळे साधणार आहे. आज शिक्षण विभागात जवळपास नसलेल्याच ‘पर्यवेक्षण’ या घटकाचे पुनरुज्जीवन करून चांगले परिणाम कसे साधता येतील याचा वस्तुपाठ या लेखातून मिळतो. शिक्षणाच्या संकल्पनेत समाजाचा सहभाग हा आजच्या ‘र्सवकष मूल्यमापना’च्या यशस्वी कार्यवाहीकरिता कसा घेता येऊ शकतो, हेही या लेखात थोडक्यात बीजरूपाने सांगितले आहे. शिक्षणाविषयी तळमळ मनात जागती असली, तर आहे त्या परिस्थितीला शिव्याशाप देत न बसता किंवा हतबल न होताही यशस्वीपणे त्यातून मार्ग काढणाऱ्या सातारा जिल्ह्य़ातील कुमठे विभागाच्या (बीट) शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे या अपवादात्मक व्यक्तिमत्त्व न राहाता अनेक जागृत पर्यवेक्षीय स्तरावरील अधिकारी जागोजाग दिसणे अशक्य नाही. परिणामस्वरूप, हे लोण त्यांचा आदर्श मानणारे, मुख्याध्यापक, शिक्षक इ. तयार होणे अशक्य नाही.
२००३ मध्ये पदभार स्वीकारलेल्यापासून ध्येयवादी वृत्तीने सातत्याने आपल्या कार्याबद्दलची स्पष्ट कल्पना, निष्ठा व चिकाटी ठेवून त्यांनी विविध मार्गानी अविरतपणे प्रयत्न केले. यात त्यांच्या कल्पकतेचा, निरीक्षणाचा कस लागला असणार! त्यांना त्यांच्या कार्यापासून परावृत्त करणारे अनेक घटक सतत प्रयत्नशील असणार! स्त्री असल्याने घर व काम (नोकरी) अशी बरीच कुचंबणाही त्यांची झाली असणार! या सर्वावर मात करून त्यांनी मिळविलेले यश खरोखरीच आदर्श आणि अनुकरणीय आहे. झपाटल्यागत काम करून आपल्या विभागाला विकासाच्या पथ्यावर दौडण्यास सज्ज करणाऱ्या या बाईंचे खरेच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
शिक्षण, खरे शिक्षण, खरे जीवनशिक्षण याचा आत्मा काय तो समजून घ्यायचा असेल तर अशा वृत्तांत-कथा जरूर वाचल्या गेल्या पाहिजेत. शाळेतील दैनिक किंवा साप्ताहिक कार्यक्रमात अशा कथांचे जाहीर वाचन, नंतर अभ्यास व मग अनुकरण करण्याचा निश्चय केला गेला पाहिजे व शेवटी त्या एका प्रयोगाला अनेक अंकुर फुटून त्यांच्या शाखा विस्तारून ठिकठिकाणी त्यांचे डेरेदार वृक्षरांजीत रूपांतर झाले तर उत्तम होईल.
आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेले हजारो शिक्षक निवृत्तीनंतर पेन्शन घेऊन जीवन जगताना दिसतात. त्यांनी आता खरोखर वानप्रस्थ धर्माला जागून पुढे येऊन परिसरात जे चांगले उपक्रम सुरू असतील त्यांनी आपल्या क्षमतेनुसार हातभार लावायला हवा.
आजच्या तरुण पिढीच्या जडणघडणीकरिता ही गुंतवणूक करायची असते. शाळेप्रमाणेच कुटुंबासारख्या सामाजिक संस्था यांचीही तेवढीच जबाबदारी यात आहे, यात शंकाच नाही. म्हणूनच जे कोणी सामाजिक बांधीलकी मानून ध्येयप्रेरित होऊन या भविष्य घडविण्याच्या कामात कंबर कसून तळमळीने काम करीत आहे, त्यास सर्वानी शक्य ते सहाय्य करणे हे ज्याचे त्याचे कर्तव्य ठरते. हे जाणूनच प्रतिभा भराडे यांनी शिक्षकच नव्हे; तर गावकरी, परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यां, प्रत्यक्ष विद्यार्थी, त्यांचे पालक, डॉक्टर अन्य क्षेत्रांतले तज्ज्ञ इ. सर्वाचे याकामी सहकार्य घेतले. ही समजूत सर्वाना पटायला हवी. यासाठी समाजातील सर्वच घटकांकडे संवेदनाशीलता हवी; जाणीव हवी; नसल्यास त्यासाठी अथक प्रयत्न करायला हवेत. हा लेख चांगला, विचार व आचारप्रवृत्त करणारा असा आहे.