माझ्या एका नातलगांकडे घडलेला हा खराखुरा प्रसंग! पण समस्त पालकवर्गासाठी उद्बोधक! या माझ्या नातेवाइकांच्या घरी एकदा काही पाहुणे मंडळी आली. यजमानांच्या कुटुंबीयांनी म्हणजे पती, पत्नी आणि त्यांचा  लहानगा ‘बिगरी’त शिकत असलेला मुलगा यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. वडील मंडळी गप्पांत रमली आहेत, असं पाहून त्या लहानग्याने मस्ती सुरू केली. मस्तीचं रूपांतर हळूहळू माकडचेष्टांमध्ये झालं. सोफ्यावरून खाली धप्पकन उडय़ा मारणं, जमिनीवर गडबडा लोळणं असेही प्रकार झाले. मुलाच्या आई-वडिलांनी त्याला एकदोनदा सावरण्याचा निष्फळ प्रयत्न केला. थोडय़ा वेळाने पाहुणे गेले. आता मुलाला ‘शिक्षण’ देण्याची वेळ आली होती. मुलाच्या वडिलांनी त्यासाठी एक नामी युक्ती केली. त्यांनी मुलाला ‘आपण ‘पाहुणे पाहुणे’ असा खेळ खेळू या,’असं सांगितलं. आता मुलाने पाहुण्याचा रोल करायचा आणि वडिलांनी त्या मुलाची भूमिका वठवायची होती. मुलगा पाहुण्यासारखा मोठय़ा ऐटीत सोफ्यावर विसावला आणि वडिलांनी माकडचेष्टा सुरू केल्या. वडिलांच्या प्रत्येक हावभावागणिक मुलगा ओशाळत गेला. आपण मगाशी करत होतो, त्या गोष्टी इतक्या विचित्र आणि हास्यास्पद दिसत होत्या, याची जाणीव झालेला हा मुलगा पुढे समाजाचा एक जबाबदार घटक बनला.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ग सुरू झाला की, माझ्या वर्गातला एक विद्यार्थी  थोडय़ा-थोडय़ा वेळाने उठून पुढे अगदी माझ्यापाशी येई आणि समोरच्या िभतीवरच्या घडय़ाळात किती वाजले ते पाहून जाग्यावर जाऊन बसे. हा सारखा असं अगदी पुढे येऊन घडय़ाळात पाहतो, म्हणजे आपलं शिकवणं याला कंटाळवाणं होतंय की काय, असं वाटून मी रोज अधिकाधिक मनोरंजक पद्धतीने विषय मांडायचा प्रयत्न करायला लागले. परिणामी, सगळेच विद्यार्थी अधिकाधिक रस घेऊन शिकायला लागले, पण हा पठ्ठय़ा ‘घडय़ाळ’ बघण्याचा नाद काही सोडेना. शेवटी एकदा मी त्याच्या आईच्या कानावर ही गोष्ट घातली. त्याला त्याबद्दल न रागावता, अलवारपणे तो असं का करतो, हे समजून घ्या, असं मी त्याच्या आईला सुचवलं. त्याच्या आईने सांगितलं, त्यानुसार त्या मुलाला म्हणे, आमच्या वर्गाचं वातावरण आणि अभ्यास एवढा आवडायचा, की सगळं लवकर संपणार तर नाही ना, या भीतीने तो घडय़ाळ पाहायचा. वर्ग सुटायला अजून खूप अवकाश आहे, हे समजलं की, त्याला बरं वाटायचं. हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. ‘बरं झालं, आपण त्या मुलाला कधी असं सारखं वर्गात उठून घडय़ाळ बघितल्याबद्दल रागावलो नाही!’, असं वाटून मी सुटकेचा निश्वास टाकला.
वरील प्रसंगांतून आपल्या असं लक्षात येईल की, घरात असो किंवा वर्गात, मुलं एखादी गोष्ट का करतात, हे जाणून घेऊन, मगच त्यावर त्याला ‘शिकवण्याची’ पद्धत ठरवावी. कारण हेच मूल पुढे जाऊन एक सुजाण नागरिक म्हणून समाजाची जबाबदारी घेऊ शकलं पाहिजे. एकदा एका गावात मी सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेत होते. प्रयोग मांडले गेले होते, ते कसे करायचे, याचं प्रशिक्षण आम्ही देत होतो. चांगला दिवसभरचा कार्यक्रम होता. एका विद्यार्थ्यांने दोन्ही कानांची भोकं गाणी ऐकायच्या यंत्राने साफ बंद करून ठेवली होती. त्याला ते कानातले ‘इयर फोन्स’ काढून आमच्या सूचनांकडे लक्ष द्यायला सांगा, असं आम्ही तिथल्या शिक्षकांना सांगितलं. त्यावर ‘जाऊ दे, असू दे, थोरामोठय़ा घरचा आहे तो.. त्याला काही बोलायला नको’, अशी सूचना आम्हालाच दिली गेली. मुलांना समाजाचा जबाबदार नागरिक घडवण्याच्या शिक्षकांच्या कार्यात जर अशा प्रकारे पालकांची दहशत असेल तर त्या समाजाचं आणि पर्यायाने देशाचंच भवितव्य धोक्यात येतंय, असं समजावं. एकदा एका ‘प्रतिष्ठित’ शाळेत आम्ही दुसरी-तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम घेत होतो. त्यातली दोन-तीन मुलं जमिनीवर झोपून आमच्या प्रश्नांना उत्तरं देत होती तर काही जण त्यांचे अत्यंत किमती आणि स्वयंचलित ‘कंपोस’ बॉक्स एकमेकांना दाखवण्यात आणि त्या कंपोस’ बॉक्सवर असलेले खेळ खेळण्यात दंग झाली होती. आडव्या पडलेल्या मुलांना बसायला सांगा किंवा मुलांना ‘कंपोस’ बॉक्स बाजूला ठेवून आम्ही दिलेलं काम करायला सांगा, असं आम्ही त्यांच्या शिक्षकांना विनवलं. त्यावर शिक्षकांनी, ‘‘असं काही आम्ही सांगू शकणार नाही.. we are answerable to their parents,,’’ असं मन बचेन करणारं विधान केलं. आपलं मूल शाळेत अयोग्य वागून शाळेची शिस्त तर बिघडवत नाही ना आणि त्यासाठी आपल्याला शिक्षक भेटायला तर बोलावणार नाहीत ना, अशी काळजी खरं तर पालकांना वाटायला हवी होती. अधिक चौकशी केली तेव्हा ज्या शाळेत प्रचंड शुल्क घेतलं जातं, तेव्हा तिथले अनेक शिक्षक, पालकांना उत्तर द्यायला लागेल या दबावाखाली वावरत, विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे अगदी कसेही वागू देताहेत, हे लक्षात आलं आणि अधिकच बचेन वाटलं. ही झाली शालेय शिक्षणाची एक बाजू!
दुसऱ्या बाजूला एक वेगळाच अनुभव आला. एकदा एका मध्यमवर्गीय शाळेत आम्ही ‘मॅट्रिक’च्या मुलांशी गप्पा मारत होतो. मुलं खूप उत्साही होती. आम्ही सांगत असलेल्या गोष्टी ती मुलं जिवाचा कान करून ऐकत होती. मग आम्ही त्यांना ‘काही गोष्टी आता तुम्ही घरी करून बघू शकता,’ असं सांगितलं. मग मात्र तिथल्या शिक्षकांनी, ‘‘विद्यार्थ्यांकडून जे काही करून घ्यायचं असेल ते आम्हालाच सांगा, आम्ही त्यासाठी कितीही कष्ट करायला तयार आहोत. कारण या मुलांच्या पालकांनी, त्यांची सर्व जबाबदारी आमच्यावरच सोपवली आहे. एकदा शाळेत दाखल केल्यावर, पालक फक्त आपल्या मुलाला न्यायला, सोडायला येतात. त्यांना त्यांच्या मुलाबद्दल काही सांगायला गेलं की, तुम्ही कशाला आहात मग. मुलाला तुमच्या शाळेत घातलंय तेव्हा आता काय ते सगळं तुम्हीच बघायचं,’’ अशी पालक – शिक्षक नात्याची एक वेगळीच बाजू त्यांनी आमच्यासमोर मांडली आणि यातली पालकांची अगदीच टोकाची भूमिका सोडली तर ती बाजू आम्हाला रास्तही वाटली.
शाळेत शिकताना विद्यार्थ्यांला आनंद वाटला पाहिजे, पण शाळेत आपण ‘मजा’ करायला आलो नाही आहोत, याचं त्याला भानही असलं पाहिजे. शाळेत पाठय़पुस्तकातल्या संकल्पना समजावून दिल्या जायला हव्यात, पण त्याचबरोबर बसावं कसं, उठावं कसं, शिक्षकांचा आणि मित्र-मत्रिणींचा मान कसा राखावा, हेही सांगितलं जायला हवं. शाळेमध्ये शिक्षकांनी घातलेल्या शिस्तीचा मान पालकांनी राखायला हवा, पण आपापल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची, पालकवर्गाची मानसिकता आणि अडचणी समजावून घेत, शाळेतल्या शिस्तीची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी व्हायला हवी. वरकरणी बघायला गेलं, तर सारं एकाच वेळी जमवून आणणं कठीण वाटतं. पण विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी आपापल्या जबाबदाऱ्या आणि भूमिका नेमक्या समजून घेतल्या तर शालेय शिक्षणाचा दर्जा अधिकच उंचावेल, हे निश्चित! आणि मग तेव्हाच बिगरी ते मॅट्रिक ही महत्त्वाची र्वष आपल्या समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अधिक परिणामकारक ठरतील!    
(समाप्त)