श्रीकांत जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उत्सव या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे काही वेळा विशिष्ट माहितीला गृहीत धरून विचारले जातात म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहिती अचूकपणे अभ्यासावी लागते.

गतवर्षीय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न व या प्रश्नांची उकल करण्यासाठी आवश्यक  दृष्टिकोन

‘सुरुवातीच्या भारतीय शिलालेखामध्ये नोंद करण्यात आलेल्या ‘तांडव’ नृत्याची चर्चा करा.’

* हा प्रश्न संकीर्ण माहितीबरोबरच तांडव नृत्याची माहिती या दोन बाबी लक्षात घेऊन विचारण्यात आलेला आहे, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. या कलेची माहिती शिलालेखामध्ये तर मिळतेच पण लेणी, मंदिरे, तसेच साहित्यात पण माहिती उपलब्ध आहे.

* या प्रश्नामध्ये शिलालेख यामधील माहितीच्या आधारे चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच या शिलालेखाची माहिती म्हणजे कोणत्या कालखंडातील शिलालेख, त्याचे नाव इत्यादी विशिष्ट माहिती देऊनच चर्चा करावी लागते.

‘आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्या वेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवित नसून त्यामधील सुरेख सौंदर्यही दर्शविते.’ या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा.

* या प्रश्नाचे व्यवस्थित आकलन केल्यास असे दिसून येते की, मध्याश्म युगातील कलेचा सर्वात आधी आढावा घ्यावा लागतो. या काळातील मानवाने नैसर्गिक गुहांमध्ये चित्रकला केलेली आहे आणि या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन जीवनाचे रेखाटन केलेले आहे व याचे सद्य:स्थितीतील पुरावे भारतातील भीमबेटका येथे उपलब्ध आहेत.

* या चित्रकलेची वैशिष्टय़े आणि यातील सुरेखपणा आणि याची तुलना आधुनिक चित्रकलेशी करून आधुनिक चित्रकलेची वैशिष्टय़े पण नमूद करावी लागतात. तसेच या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून मूल्यमापन करावे लागते. अर्थात यामध्ये यातील समानता आणि भिन्नता अशा अनुषंगाने चिकित्सा करणे अपेक्षित आहे.

‘गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी नंतरच्या काळात मुळीच लक्षणीय नाही. तुम्ही या मताला कशाप्रकारे योग्य सिद्ध कराल?’

* भारतात नाणीशास्त्रामध्ये जी प्रगती झालेली होती याचे महत्त्वाचे कारण, गुप्त काळाच्या अगोदरपासूनच भारताचे युरोपमधील ग्रीक व रोमन साम्राज्यासोबत संबंध प्रस्थापित झालेले होते व युरोपमधील नाणीशास्त्र हे भारताच्या तुलनेत अधिक विकसित होते आणि याचा प्रसार भारतातही झाला आणि येथील सत्तेनेही या नाणीशास्त्राचे अनुकरण केले.

* गुप्त कालखंडाच्या शेवटी भारताचा रोमन साम्राज्यासोबत व्यापार संपुष्टात आलेला होता आणि भारतात गुप्त नंतरच्या काळात सरंजामशाहीचा उदय झालेला होता ज्यामुळे नंतरच्या काळात गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी पाहावयास मिळत नाही, असे मानले जाते. अशा पद्धतीने संकीर्ण माहितीचा आधार देऊन उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चायनिज आणि अरब प्रवासी यांच्या वृत्तांताचे महत्त्व, याचे मूल्यांकन करा.

* हा प्रश्न भारतीय इतिहासाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाशी संबंधित आहे.

* प्राचीन भारतात म्हणजेच गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंडात फाहीयान, ह्य़-एनत्संग, इ-त्सिंग या चायनिज प्रवाशांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या. तसेच तत्कालीन भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर त्यांनी भाष्य केलेले होते आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत.

* मध्ययुगीन काळात  भारतात अरबांची आक्रमणे सुरू झालेली होती. यामुळे अनेक अरब प्रवाशांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या. यामध्ये अल्बेरुनी, अल मसुदी इत्यादी प्रसिद्ध अरब प्रवासी होते. त्यांनी तत्कालीन भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य केले होते आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये चायनिज आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अरब प्रवासी यांची यादी देऊन त्यांनी केलेल्या नोंदी, भाष्य व त्यांची पुस्तके याची उदाहरणे देऊन भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेमध्ये चायनिज आणि अरब प्रवासी यांच्या वृत्तांताचे महत्त्व अधोरेखित करून मूल्यांकन करणे गरजेचे आहे.

उपरोक्त विश्लेषणावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उकल करण्यासाठी नेमक्या कोणत्या पैलूंचा विचार करावा लागतो याची एक स्पष्ट समज येते.

या विषयाचा आवाका मोठा आहे आणि बहुतांश प्रश्नांना संकीर्ण माहितीचा आधार द्यावा लागतो म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहितीचाही अभ्यास आवश्यक आहे. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो.

इयत्ता ११वीचे An Introduction to Indian Art Part–I   हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे, तसेच १२वीचे Themes in Indian History part-I  आणि कक, जुन्या  एनसीईआरटीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. या विषयावर बाजारामध्ये अनेक गाइड्स स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत ज्याद्वारे सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam 2020 how to prepare for upsc and ias exam zws
First published on: 05-06-2020 at 03:41 IST