आराधना जोशी

करिअर म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर व्यक्तीनुसार बदलत जातं. कोणाला अधिक पैसा म्हणजे करिअर वाटतं तर कोणाला कामातून मिळणारं समाधान म्हणजे करिअर वाटतं. पण घेतलेल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून मानसिक समाधान, आर्थिक स्थिरता आणि गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता येत असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत असं समजावं. मात्र या करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या वाटचालीची सुरुवात शाळेची निवड आणि माध्यमापासून होते ही गोष्ट पालक म्हणून लक्षात घेतली पाहिजे. बेंजामिन फ्रँकलिन यांनी म्हटले आहे की, “An investment in knowledge pays the best interest”. ज्ञानात केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम फायदा देणारी असते.

Nagpur Central Jail, Inmates Meet Their Children, Inmates Meet Their Parents, Heartwarming Gathering Program, Nagpur Central Jail Inmates Meet Children, police, inmates, Nagpur news, marathi news,
रुसवे, फुगवे अन गोडवे! कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट
treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…
Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!

दहावीचा पाया आठवीपासून सुरू होतो असा आपल्याकडे समज आहे. तसंच करिअरच्या वाटचालीत शाळेचे माध्यम कोणते असावे या मुद्द्याचा विचार पालक म्हणून करणे अत्यंत गरजेचे आहे. मुळातच पाल्याच्या यशामध्ये पालकांचाही वाटा खूप मोठा असतो. मात्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले तरच आपल्या पाल्याचा पुढे निभाव लागेल असा विचार करणारे किती पालक आपल्या पाल्याचा अभ्यास स्वतः घेऊ शकतात? त्यांना अभ्यासात मदत करू शकतात? नर्सरी किंवा ज्युनिअर केजीमध्ये असणाऱ्या पाल्यांना कोचिंग क्लास का आवश्यक असतो? हा मला पालक म्हणून नेहमीच प्रश्न पडतो.

भाषा हे भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. घरात लहानपणापासून जी भाषा कानावर पडते त्याद्वारे लवकर व्यक्त होता येते. मात्र शाळेत जर भाषा बदलली तर त्याच्याशी जुळवून घेणं अडीच तीन वर्षांच्या मुलांना अतिशय अवघड जातं. आपल्याला हे जमत नाही हे त्यांना सांगता येत नाही आणि अनेकदा शाळेबद्दल, अभ्यासाबद्दल आवडच निर्माण होत नाही. पालक म्हणून या सगळ्या गोष्टी विचारात घेणं किंवा त्यावर उपाय शोधणं गरजेचं असतं. अशावेळी पालक पाल्य यांच्यात सुसंवाद व्हायला हवा. सुसंवादाचं वादात रुपांतर झालं तर घसरलेली गाडी रुळावर येणं किंवा अभ्यासाबद्दल गोडी लागणं अवघड होतं. करिअरच्या वाटचालीसाठी ही गोष्ट मारक ठरू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्याच्या शिक्षकांबरोबर नियमितपणे संवाद साधा. पाल्याच्या आपल्या लक्षात न येणाऱ्या गोष्टी शिक्षकांना दिसत असतात. त्याचाही खूप फायदा होत असतो. पाल्याची आवड, त्याचा कल, कौशल्य जाणून घ्यायला मदतच होते. करिअर निवडीचा विचार करताना या गोष्टी मदतीला येतात.

वाचन हा ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे हे पालक म्हणून मुलांना पटवून दिलं पाहिजे. सोशल मीडियाच्या आजच्या काळात गुगलवर हव्या त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात पण ती केवळ माहिती असते. ज्ञान नाही. Information (माहिती) आणि Knowledge (ज्ञान) यातला फरक पालकांनी मुलांपर्यंत पोहोचवायला हवा. त्यासाठी पालकांनी स्वत: मुलांसमोर ठराविक वेळ वाचनासाठी राखून ठेवायला हवा.

झोप हासुद्धा पाल्याच्या शिक्षणात महत्त्वाचा घटक असतो. पुरेशी झोप झालेला विद्यार्थी शाळेमध्ये अधिक चांगली कामगिरी करत असतो. त्यामुळे आपल्या पाल्याच्या झोपेकडे पालक म्हणून आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. जशी झोप आवश्यक तसंच पोट व्यवस्थित भरलेलं असणंही आवश्यक असते. मेंदू ताजातवाना ठेवण्यासाठी, मेंदूची ग्रहणक्षमता वाढवण्यासाठी पुरेशा, सकस अन्नाची गरज असते. त्यामुळे सकाळच्या शाळेत जाण्याअगोदर पोटभर न्याहारी किंवा दुपारच्या शाळेत जाण्याअगोदर पाल्य व्यवस्थित जेवणं महत्वाचं आहे.

आपल्या पाल्याने शाळेत सर्वोत्तम कामगिरी करावी अशी सगळ्याच पालकांची इच्छा असते. मात्र आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण पाल्यावर शारीरिक किंवा मानसिक अति दबाव तर टाकत नाही ना? याचाही विचार करायला हवा. यानिमित्ताने एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो. शाळेत सतत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या मुलीचा एका परीक्षेत दुसरा नंबर आला. सहावीत असणाऱ्या त्या मुलीला तिच्या डॉक्टर असणाऱ्या आईने रात्रभर घराबाहेर उभं राहण्याची शिक्षा केली. या शिक्षेचा मुलीला एवढा मानसिक धक्का बसला की त्यातून ती सावरूच शकली नाही. अभ्यास, परीक्षा या सगळ्याबद्दलची नावडच तिच्या मनात निर्माण झाली. एका चांगल्या मुलीच्या आयुष्याचं आईच्या अशा स्वभावामुळे नुकसान झालं. पालक म्हणून मुलांच्या अभ्यासाबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक आहे मात्र त्याचं रुपांतर अति काळजीत होऊ देऊ नका.

अनेकदा अभ्यास या एकाच मुद्द्यावरून दोन मुलांमध्ये तुलना केली जाते. ते टाळायला हवं. सतत दोन भावांची किंवा इतरांशी होणारी तुलना कोणालाच आवडणारी नसते आणि जर ती अभ्यास, परीक्षेतले गुण, एकूण प्रगती अशी असेल तर ती मुलांसाठी आणखी त्रासदायक ठरू शकते याचं भान पालक म्हणून आपल्याला असायला हवं.

हे ही वाचा >> पालकांनो, मुलांची स्मरणशक्ती कमी आहे का? अभ्यास करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, एकदा वाचले तरी राहील लक्षात

शाळा सुटल्यानंतर बाहेर आलेल्या मुलांच्या पाठीवरची बॅग खसकन ओढून ती उघडून वह्या पुस्तकं बाहेर काढून आज शाळेत काय काय शिकवलं? इतर मुलांनी वहीत काय काय लिहून आणलं आहे? आपल्या मुलाने ते का पूर्ण केलं नाही? त्याचं जे काही पोस्टमॉर्टेम होतं त्याची गरज काय? असा प्रश्न आई म्हणून मला कायम पडायचा आणि आताही पडतो. एकही आई शाळा संपवून आलेल्या पाल्याला आज तू काय केलंस? शाळेत आज वेगळं काय झालं? काय काय शिकलास? याची चौकशी करताना मला तरी दिसलेली नाही.

पालकत्वाची आपली शैली अशी असली पाहिजे जी पाल्याला स्वतंत्र विचार करायला, आपले विचार निर्भीडपणे मांडायला प्रोत्साहन देईल. हे विचार एकांगी असले किंवा पालक म्हणून आपल्याला न पटणारे असले तरी असे विचार करण्यामागे पाल्याची असणारी भूमिका लक्षात घेऊन मग त्यावर चर्चा करणे, पालक म्हणून आपले विचार काय आहेत हे त्यांच्यासमोर मांडणे आणि त्यांना अधिक विचार करायला भाग पाडणे पुढच्या आयुष्यात फायदेशीर ठरते. नोकरी, व्यवसाय सुरू झाल्यावर टीममध्ये काम करताना, लीडरशिप पार पाडताना अशा गोष्टी पाल्याला कायम उपयोगी पडतात.

हे ही वाचा >> पालकांनो, हा फॉर्म्युला १०० टक्के काम करणार, मुलांना असे बनवा आत्मविश्वासू आणि जबाबदार

काळानुरूप आपल्या पालकत्वाच्या शैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आपल्या आई वडिलांच्या काळात असणारी आव्हानं आणि आजच्या पालकांसमोर असणारी आव्हानं यात खूप मोठा फरक आहे. आजच्या पालकांना शिक्षण क्षेत्रात होणारे बदल, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम याबद्दल माहिती असायलाच हवी. पाल्याची परीक्षेतील प्रगती, विशिष्ट विषयांमध्ये मिळणारे कमी जास्त गुण यांचाही विचार करायला हवा. त्याचवेळी पारंपरिक करिअर पर्यायांऐवजी नवनवीन पर्यायांचीही माहिती हवी. अर्थात वय वाढत जाते तसतशा मुलांच्या आवडीनिवडी, विषयांबाबत असणारी गोडी, अभ्यासाकडे असणारा कल यात बदल होत असतात. पण तरीही लहान वयापासूनच सजगपणे पाल्याबाबत केला जाणारा हा सर्वांगीण विचार करिअर निवडीचा मार्ग थोडा सोपा करतो.