मी अमेरिकेत असताना जेव्हा यूपीएससीची परीक्षा द्यायचं ठरवलं तेव्हा साधारणपणे पाच तास अभ्यास करत होतो. पण भारतात आल्यावर मात्र दहा ते बारा तास अभ्यासाला देत होतो. मला असं वाटतं की, या परीक्षेसाठी अभ्यासातील हुशारीपेक्षा मेहनत, सचोटी, सातत्य महत्त्वाचं असतं. आपल्या यशाचे सूत्र सांगताहेत साहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, मडिकेरी उपविभाग, कुर्गचे विनायक नरवडे. मी नगरमधल्या एका सामान्य कुटुंबातला मुलगा. शिकून परदेशात नोकरी करायची, हेच स्वप्न अनेक वर्षं उराशी बाळगलं होतं. त्यावेळेस मला परदेशातलं शिक्षण आणि नोकरी या दोन्हींचं आकर्षण होतं. ठरवल्याप्रमाणे पुण्यात सीओईपीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केलं, त्यानंतर तीन वर्षं अमेरिकेत कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एनर्जी सिस्टीम्स अँड मॉडेलिंगमध्ये मास्टर्स केलं. एक वर्षं पॉलिसी रिसर्चर म्हणून अमेरिकन सरकारसोबत काम केलं. पण २०१९ मध्ये मी भारतात परत आलो. ही माझी सुरुवातीची करिअरकथा. पण पुढे या कथेला वेगळं वळण मिळालं. हेही वाचा >>> ICSE 2024 Results Out: १० वी, १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी! कुठे व कसा पाहाल आयसीएसईचा निकाल? अमेरिकेतल्या नोकरीमुळे आयएएस बनण्याची प्रेरणा मी आयएएस बनण्यास प्रेरित झालो ते अमेरिकेतील नोकरीमुळे. अमेरिकन सरकारच्या एका प्रोजेक्टवर काम करत होतो. त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने भारतातील काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांशी बोलणं होत असे. त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट लक्षात आली की, हे लोक भारतातील लोकांसाठी विशेषत: सामान्य लोकांसाठी खूप काही करू शकतात, करत आहेत. माझ्या मनाला ही गोष्ट इतकी भावली की, माझ्या मनात आयएएस होण्याचं बीज रुजलं ते तिथेच. हळूहळू आयएएसविषयी आकर्षण निर्माण होऊ लागलं. सामाजिकदृष्ट्या या पदाची ताकद काय आहे याची जाणीव होत गेली आणि त्याचवेळी मी भारतात जाऊन आयएएस व्हायचं असं मनाशी पक्कं केलं. आयएएस होऊन समाजासाठी काहीतरी चांगलं काम करायचं हे ठरवलं. तसं मी अमेरिकेत कायम स्थायिक होण्याचं ठरवलं नव्हतंच म्हणा, भारतात परतायचंच होतं. अमेरिकेत प्रोजेक्टवर काम सुरू असतानाच आयएएसबाबतची माहिती घेतली आणि त्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मी ही परीक्षा उत्तीर्ण होईन असा विश्वास वाटल्यावर आणि अमेरिकन प्रोजेक्टवर पाच-सहा महिने काम करून मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आणि मी भारतात परतलो. हेही वाचा >>> Mumbai Job Recruitment 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ८० हजारांहून अधिक पगार; जाणून घ्या अर्जाची पद्धत माझ्या निर्णयाला पालकांचा पाठिंबाच जेव्हा मी माझ्या पालकांना माझा हा निर्णय सांगितला; तेव्हा वडिलांच्या मनात थोडी साशंकता होती. त्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. पण आम्ही दोघांनी यावर खूप चर्चा केली आणि माझा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यात मी यशस्वी झालो. त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला, आईने तर आधीच ग्रीन सिगभनल दिला होता. पालकांच्या पाठिंब्यामुळे मी माझी अर्धी लढाई येथेच जिंकली. दहा ते बारा तास अभ्यास मी अमेरिकेत असताना जेव्हा यूपीएससीची परीक्षा द्यायचं ठरवलं तेव्हा साधारणपणे पाच तास अभ्यास करत होतो. पण भारतात आल्यावर मात्र दहा ते बारा तास अभ्यासाला देत होतो. मला असं वाटतं की, या परीक्षेसाठी अभ्यासातील हुशारीपेक्षा मेहनत, सचोटी, सातत्य महत्त्वाचं असतं. अमेरिकेतला अनुभव कामी आला अमेरिकेत शिकत असताना मी नोकरी आणि अभ्यास अशा दोन्ही गोष्टी सांभाळल्या. या दोन्हींचा योग्य मेळ कसा साधायाचा हे मी तिथेच शिकलो. तिथे तुम्हाला घरच्या कामासाठी कोणी मदतनीसही मिळत नाही, मग घरच्या कामांची जबाबदारीही सांभाळावी लागते. म्हणजे घर, शिक्षण आणि नोकरी यांचा मेळ साधण्याचा मोलाचा अनुभव अमेरिकेतल्या शिक्षणाने दिला. आपल्याकडचे पैसे जबाबदारीने सांभाळण्याचा किंवा ते कमावण्याचा संस्कारही अमेरिकेतल्या वास्तव्याने दिला हे मला इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं. एक जबाबदार व्यक्ती म्हणून घडण्याचा हा काळ पुढे यूपीएससीची परीक्षा आणि आता आयएएस झाल्यानंतर खूप उपयोगी पडत आहे. अमेरिकेतल्या प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षणाचा तर खूप फायदा झाला. एखाद्या अभ्यासक्रमाला लागणारा प्रॅक्टिकल दृष्टिकोन इथेच रुजला. एका असायनमेंटसाठी ४-५ तास काम करण्याची सवय लागली. दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे अमेरिकेत लवकर नोकरी मिळणं थोडं अवघड असतं, विशेषत: अमेरिकेबाहेरील लोकांना. त्यामुळे नोकरीत नकार पचवणं आणि ते स्वत:च्या गळी उतरवणं हेही मी शिकलो. त्यामुळे मला पहिल्या अटेम्प्टमध्ये जेव्हा अपयश आलं तेव्हा फार निराश झालो नाही, बिथरलो नाही; पुन्हा दुसऱ्यावेळी नव्याने प्रयत्न करण्यासाठी हिरिरीने तयारीला लागलो. अभ्यासाचे ताणतणाव आणि आहार भारतात आल्यावर मी यूपीएससी देत आहे याविषयीही फारशी कुणाकडे वाच्यता केली नव्हती. मी नेमाने माझा अभ्यास करत होतो. विशेष म्हणजे समाजमाध्यमांपासून दूर होतो. यूपीएससीची परीक्षा हेच ध्येय मी ठेवलं होतं आणि त्यादृष्टीने अभ्यास करत होतो. अभ्यासाच्यावेळी कधी ताण-तणाव आला तर आई-बाबा, बहीण आणि अगदी जवळचे मोजकेच मित्र यांच्याशी संवाद साधत होतो. हा संवाद माझ्या मनावरचा ताण हलका करण्यास मदत करत होता. माझ्या अवतीभोवती मोजकीच, पण खूप चांगली माणसं होती, ही माणसं मला यूपीएससीसाठी सहकार्य करणारी ठरली. कमी, पण चांगली माणसं एवढंच माझं विश्व होतं. या परीक्षेसाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते. तुमच्या शरीराला आणि मनाला व्यायाम ही एक उत्तम सवय ठरू शकते. मेडिटेशन, होम वर्कआऊट आवश्यक असतं. जंकफूड पूर्णपणे बंद, फक्त घरच्या जेवणावर भर देणं गरजेचं वाटतं. ‘प्लॅन बी’ हवाच मी जेव्हा अमेरिकेतली नोकरी सोडली तेव्हा तिथल्या नोकरीचा पर्याय खुला होताच. नोकरी सोडताना ‘तू परत आलास तर तुला आम्ही पुन्हा नोकरीत सामावून घेऊ,’ असं त्यांनी सांगितलं होतं. माझ्या शिक्षणामुळे माझ्यासाठी तो पर्याय खुला होताच म्हणा, तरीही यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस होणं हे मनाशी पक्कं केलं होतंच. त्यामुळे मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. पण फक्त दोन अटेम्प्ट कष्टाने द्यायचे, त्या पलीकडे या परीक्षेत मानसिकदृष्ट्या फार गुंतायचं नाही हेही मनाशी ठरवलं होतं. जर या परीक्षेत यश मिळालं नाही तर ‘गड्या आपुला गाव बरा’ हीच भूमिका होती. ही परीक्षा देण्यासाठी प्लॅन बी महत्त्वाचा असतोच, असं मी सांगेन. फार फार तीन वर्षं या परीक्षेसाठी प्रयत्न करावेत असं माझं प्रामाणिक मत आहे. पुणं, दिल्ली गाठणं आवश्यक ही एक मिथ मला यूपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांना आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, यूपीएससीसाठी दिल्ली आणि एमपीएससीसाठी पुणं गाठणं ही जी खूणगाठ मनाशी बांधलेेली असते ती एक मिथ आहे, असं मला वाटतं. तुम्ही जिथे आहात तिथून या परीक्षांचा अभ्यास केलात तरीही तुम्हाला यश मिळू शकतं. या परीक्षांसाठी तुमची मेहनत, अभ्यासातली नियमितता, नियोजन महत्त्वाचं असतं. ‘आयएएस’ म्हणजे सामान्य माणसांसाठी काम करण्याची संधी आयएएस होणं म्हणजे उत्तम पगाराची नोकरी, मानमरातब इथपर्यंत सीमित नाही. तुम्ही जेव्हा आयएएस होता तेव्हा तुम्हाला सामान्य माणसांसाठी, उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध होते आणि त्या संधीचं सोनं करणं महत्त्वाचं असतं. समाजासाठी एक चांगली व्यवस्था निर्माण करणं हेच आमचं मुख्य काम आहे. इथे मी एक उदाहरण देईन. मी ज्या कुर्गमध्ये काम करत आहे, तिथे आदिवासी समूह मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या लक्षात आलं की या लोकांकडे आधारकार्ड नाही, त्यामुळे सरकारी योजनांपासून हे लोक दूर आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही दोन दिवस एक शिबीर आयोजित केलं. त्यात त्यांना आधारकार्डची माहिती देऊन ती बनवून दिली, ही संख्या जवळजवळ पाच हजार इतकी होती. आधारकार्ड मिळाल्यानंतर आता हे लोक मुख्य प्रवाहातील उपाययोजनांचा फायदा घेऊ शकतील. हे काम करण्याचं एक वेगळंच समाधान असतं. ते मला अन्य नोकरीत मिळू शकणार नाही. रोजचं वर्तमानपत्र वाचाच वाचन हा या परीक्षेतला महत्त्वाचा घटक आहे. रोजचं वर्तमानपत्र वाचणं गरजेचंच आहे, कारण त्यामुळे आपल्या अवतीभोवती काय घडतंय याविषयी तुम्ही जागरुकच राहता. अवांतर वाचन आवश्यक आहे, पण ते नेमकं हवं, संदर्भ पुस्तकं जास्तीत जास्त वाचा. ढीगभर पुस्तकं वाचण्यापेक्षा जी पुस्तकं वाचाल ती मन लावून वाचा. नेमका अभ्यास हेच या परीक्षेचं मुख्य सूत्र आहे असं मला वाटतं. क्लासशिवाय यश यूपीएससीच्या परीक्षेसाठी मी कुठलाही क्लास लावला नाही. स्वत:च अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण झालो. मला वाटतं, आपण मनाशी पक्कं ठरवलं तर या परीक्षेसाठी क्लासची गरज नाही. तुम्ही स्वत: प्रामाणिकपणे अभ्यास करून ही परीक्षा देऊ शकता. स्वत: केलेल्या अभ्यासावर माझा जास्त विश्वास आहे, कारण कोणत्याही क्लासमधल्या अभ्यासापेक्षा स्व-अभ्यास जास्त महत्त्वाचा असतो असं माझं मत आहे. माझे अनेक मित्र ही परीक्षा देत असल्याने त्यांचंही सहकार्य मिळालं. भारतात आल्यावर मी दोन महिन्यांत प्रीलियम दिली त्यात मी उत्तीर्ण झालो, पण मेन्स क्लिअर झाली नाही. मी मेन्सच्या परीक्षेला बसलो तेव्हा माझ्या अनेक मित्रांना माहीतही नव्हतं की मी यूपीएससीची परीक्षा देत आहे. मला परीक्षेला बघून त्यांना आश्चर्यच वाटलं. माझ्या मित्रांमध्ये एक आयपीएस होता आणि तो आयएएससाठी प्रयत्न करत होतो. या सगळ्यांकडून मला मार्गदर्शन मिळत गेलं आणि मी दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्यात यशस्वी झालो. शब्दांकन : लता दाभोळकर