देशाची अर्थव्यवस्था जेव्हा विकसित होते, तेव्हा वित्त क्षेत्राचीही प्रगती होते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत वावरत असाल तरी सुद्धा तुम्ही वित्त क्षेत्रांत येऊ शकतात. एवढी लवचीकता वित्त क्षेत्रांत आहे. पैसा हा सर्वजण कमावतात, परंतु पैसे कशा पद्धतीने खर्च केले जातात हे महत्त्वाचे ठरते. पैसा हा पैशाला खेचत असतो. गुंतवणूक विषयक आणि बँकेशी निगडित प्रॉडक्ट आपल्याला पटवून देऊन ते प्रॉडक्ट्स विकणारी माणसे बरीच आहेत. सध्या भारतातील बँकिंग वित्त क्षेत्राचा मोठा विस्तार होऊन सध्या गुंतवणूक विषयक प्रॉडक्ट समजून घेऊन सल्ला देणे, वित्तीय सेवांची विक्री करणे, शेअर बाजाराशी संबंधित कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून काम करणे, असे रोजगार उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली विविध कौशल्ये संपादन करणे आवश्यक आहे. वित्तक्षेत्रांत आल्यानंतर आपण संशोधन टीम, निधी व्यवस्थापक, परकीय चलन बाजारमंच, क्रेडिट अधिकारी म्हणून काम करू शकतो. एमबीए वित्त, एमबीए विपणन, सीए, सीएफए, सीएफपी, राष्ट्रीय शेअर बाजारचा (एनएसई) एनसीएफएम अभ्यासक्रम आदी विविध अभ्यासक्रम हे वित्त क्षेत्राशी संबंधित आहेत.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात बँकिंग क्षेत्रातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला कोणत्या पद्धतीचा विमा लागणार आहे, हे पटवून देता आले पाहिजे. जिथे कोणी नसते आणि त्याच ठिकाणी जेव्हा आपण पाय रोवतो, तिथेच आपल्याला खूप पैसा मिळतो. हा व्यवसायाचा पहिला महत्त्वाचा नियम आहे. लॉकडाउनच्या काळात चार कोटींहून अधिक ‘डी-मॅट’ खाती उघडली गेली. गुंतवणूक विषयक सल्लागारांच्या संख्येतही वाढ होऊन लोकांना त्यांची गरज भासू लागली. विपणन, विक्री आणि ग्राहक सेवा ही आयुष्यभर उपयुक्त ठरणारी कौशल्ये अवगत केली पाहिजेत. आपल्याला आत्मविश्वासाने बोलता आले की आपण कोणतेही प्रॉडक्ट सहज विकू शकतो, ग्राहकाला ते प्रॉडक्ट पटवून देऊ शकतो. ग्राहकांना कोणत्याही गोष्टीबाबत स्पष्टता हवी असते. विक्रीविषयक कौशल्ये असायलाच हवीत, मनात भाषेबद्दल कधीही न्यूनगंड बाळगू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपले पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरणारी पाच कौशल्ये अवगत केलीच पाहिजेत. तुम्हाला आत्मविश्वासाने बोलता आले पाहिजे, जर तुम्ही तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी गप्पाच मारू शकला नाहीत, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून कसे घेणार. तुम्ही नोकरी कसे कराल. ग्राहक सेवेत मानसिकरित्या थकता येत नाही, दुकानही बंद करता येत नाही. कारण तुमच्याकडे कधीही माणूस येऊ शकतो, जो तुमचा व्यवसाय वाढवेल. तुम्ही वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असतात. वित्त क्षेत्रांत आल्यानंतर सुट्टीबहाद्दर लोक हे शिस्तबद्ध होतात आणि ते व्यवसायात गुंततात. लोकांचे पैसे कसे गुंतवायचे हे शिका आणि लोकांना गुंतवणूकविषयक सल्ला द्या. हे क्षेत्र दहा वर्षांनंतर चांगलेच फळफळणार आहे.