प्रवीण निकमउच्च शिक्षण घेत असताना विशिष्ट विषयांमध्ये पदवी संपादन केल्यानंतर नक्की काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं कारण असं की पदवी संपादन केल्यानंतर नक्की पुढील शिक्षण घ्यावं की, मग नोकरीचा शोध घ्यावा याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांच्या मनात असतात. अर्थात हे उत्तर शोधताना बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुभव आणि कौशल्याच्या स्तरावर देखील आपल्याला स्वत:ला पडताळून पाहणं आवश्यक ठरतं. कारण जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी मुलाखतीला जातो, नोकरीची संधी शोधतो तेव्हा अर्थात पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे अनुभवाचा. तुम्हाला एखाद्या गोष्टींमध्ये अनुभव असेल तर तुमची नोकरीची संधी अधिक प्रबळ होते. त्यामुळेच अनेकदा पदवीनंतर उच्च शिक्षण घ्यावं की मग नोकरी करावी या विचारात विद्यार्थी असतात. अनेकदा असं होतं की आपलं शिक्षण, आपलं कौशल्य विकसन आणि कामाचा अनुभव या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मानलं जातं. परंतु खरं बघायला गेलं तर आपल्या शिक्षणावर कामातील अनुभव अवलंबून असतो आणि कामाच्या अनुभवावरती शिक्षण अवलंबून असतं. तुम्ही घेत असलेले शिक्षण, तुमचं कौशल्य विकास आणि तुमचा कामाचा अनुभव हे जर एका सम पातळीवरती असतील तर तुम्ही घेतलेलं महाविद्यालयीन शिक्षण हे तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा सुद्धा आनंद देऊ शकणार आहे, त्यामुळेच आपण या सर्व गोष्टींना एका सूत्रामध्ये बांधू शकतो का? याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा. अनेकदा असही लक्षात येतं की, तुम्ही निवडलेल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये खरंतर उच्च शिक्षण महत्त्वाचा आहे परंतु आर्थिक परिस्थिती, योग्य मार्गदर्शन नसणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असणारी सामाजिक आणि आर्थिक दरी यामुळे समान संधी उपलब्ध होत नाहीत. यावरती उपाय म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेताना कौशल्य व रोजगार निर्मितीचा पाया मजबूत करणं महत्त्वाचं ठरतं. सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की वाढत्या स्पर्धेमुळे आपल्याकडील बेरोजगारीच प्रमाण वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टी ही स्पर्धा अधिकच गडद करत चालले आहेत. एआय सारखी नव्याने विकसित झालेली तंत्रप्रणाली किंवा इतर तंत्रप्रणाली यांचं ज्ञान असणं हे तुमच्या नोकरीच्या संधी मधील शाश्वतता वाढवणारी ठरतात थोडक्यात काय तर त्या त्या क्षेत्रातील कामाचा किमान अनुभव आणि त्या त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या नवनवीन येऊ घातलेल्या गोष्टी आणि कौशल्य ही सर्व विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत. उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत अर्धवेळ नोकरी करणं हा एक उत्तम पर्याय असू शकतो. विद्यार्थ्यांनी याबाबत मात्र निश्चितपणे सजग असायला हवं की ते घेत असणारे शिक्षण ते आत्मसात करत असणारे कौशल्य आणि ज्या ठिकाणी ते नोकरी करतात किंवा करू इच्छित आहेत ते हे सर्व एकाच समपातळीवरती आहेत ना? याने होईल काय तर विद्यार्थ्यांना नोकरी केल्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पण आर्थिक स्थैर्य मिळेल. त्याचबरोबर विविध पद्धतीची कौशल्य विकसित करता येतील. आणि त्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटचालीमध्ये देखील खंड पडणार नाही अनेक विद्यार्थी त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रम यात योग्य नियोजन करू शकत नाहीत आणि मग अक्षमतेमुळे ताण-तणाव आणि मागे पडल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत राहतो. तेव्हा विद्यार्थी दशेत असल्यापासूनच तुम्ही हा समतोल राखण्यासाठी पर्यटनशील असायला हवं. जिथे अडचण वाटेल तिथे जाणकार व्यक्तीची मदत घेऊन वाटचाल करत राहायला हवं. आपल्या भारतात देखील उच्च शिक्षण घेत असतानाच अर्धवेळ नोकरी किंवा इंटर्नशिप करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल, विद्यार्थ्यांना स्व जाणीव होईल आणि त्या क्षेत्रातला अनुभव घेतल्यामुळे कौशल्य आत्मसात केल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना रोजगाराच्या संधी अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या पदवीच्या कालखंडामध्ये महाविद्यालयांमधून घेतल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये असाइनमेंट असू देत, परीक्षा असू देत किंवा मग विविध शिबिरांमधला सहभाग असू दे या सर्व गोष्टी त्यांना एक उत्तम विद्यार्थी आणि उत्तम नागरिक बनवण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त अशाच आहेत. या सर्वातच इंटर्नशिप करताना किंवा अर्धवेळ नोकरी करत असताना खूप गोष्टी आवाहन म्हणून ठरू शकतात परंतु हे सर्व व्यवस्थितरित्या जुळवून आणले तर आपल्याला उच्च शिक्षणाचा प्रवास करता-करता नवं काही शिकण्याचा आणि स्वत:ला कौशल्यपूर्णरित्या तयार करणे सहज शक्य आहे. ज्यायोगे भविष्यामध्ये आपल्याला सहज नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अनेक महाविद्यालयांमध्ये तिसऱ्या वर्षानंतर कॉलेज प्लेसमेंट अशा पद्धतीने विविध कंपन्यांमध्ये संस्थांमध्ये नोकरीच्या संधी दिल्या जातात अशा पद्धतीच्या पर्यायांना देखील तोपर्यंत आपण सक्षमरित्या तयार झालेलो असू. एक लक्षात ठेवा की पदवी प्राप्त करत असतानाच्या कालखंडामध्ये तुम्ही करत असलेल्या विविध गोष्टी अध्ययन कौशल्य विकसन या तुमच्या आत्मविश्वास नेतृत्व कौशल्य आणि जीवन कौशल्य याला मदत करणाऱ्या आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी आधारभूत ठरणाऱ्या अशाच गोष्टी आहेत. तेव्हा या सर्व गोष्टींबाबत निश्चितपणे विचार करा आणि योग्य मार्गदर्शन घेत अनुभवा आधारित असा शिक्षणाचा प्रवास करण्याचा प्रयत्न करा.