मागील लेखात आपण पोर्तुगीजांच्या भारतातील आगमनाबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण डच आणि इंग्रजांच्या भारतातील प्रवेशाबाबत जाणून घेऊया.

डचांचा भारतातील प्रवेश

इ.स. १६०२ साली डचमध्ये ‘युनायटेड ईस्ट इंडिया’ या कंपनीची स्थापना झाली. डच सरकारने या कंपनीला भारतासह पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करण्यासाठी सनद बहाल केली. पूर्वेकडील एखादा प्रदेश काबीज करणं किंवा युद्ध करणं, असे अधिकार या सनदीद्वारे त्यांना देण्यात आले. या कंपनीने सुरुवातीला मलायाची सामुद्रधुनी आणि इंडोनेशियामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. यासाठी त्यांना पोर्तुगीजांशी मोठा संघर्ष करावा लागला. डचांनी इ.स. १६०५ मध्ये मसुलीपट्टणम तर इ.स. १६१६ मध्ये सुरत येथे वखार ( Factory ) सुरू केली. पुढे १७५९ मध्ये बेदारा येथे इंग्रजांबरोबर झालेल्या युद्धात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर डचांचा भारतातील प्रभाव जवळपास संपुष्टात आला.

ब्रिटिशांचं भारतातील आगमन

पोर्तुगीज आणि डचांप्रमाणेच ब्रिटिश व्यापाऱ्यांचीही आशियातील व्यापारावर नजर होती. इ.स. १५९९ मध्ये ‘मर्चंट ॲडव्हेंचर्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या एका समुहाने ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची स्थापना केली. इ.स. १६०० मध्ये राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीला भारत आणि पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करण्याचे एकाधिकार ( Trade Monopoly ) बहाल केले. त्यानुसार भारतात व्यापार करण्यासाठी विशेष सवलती मिळाव्यात या हेतूने ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने कॅप्टन हॉकिन्सला इ.स. १६०९ मध्ये मुघल बादशाह जहांगीर याच्या दरबारात पाठवलं. जहांगीरनेही त्याला भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली. त्यानुसार ब्रिटिशांनी इ.स. १६०९ मध्ये सुरत येथे आपली पहिली वखार ( Factory ) सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कारणांमुळे ही वखार प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येऊ लागल्या. यातच इ.स. १६११ हे वर्ष उजाडलं. ब्रिटिशांनी १६११ मध्ये मसुलीपट्टणम येथे प्रत्यक्षात पहिली वखार सुरू केली. त्यानंतर काही दिवसांतच सुरतमध्येही वखार सुरू करण्यात आली.

मुघलांकडून इतक्या सवलती मिळाल्यानंतरही ब्रिटिशांचं समाधान झालं नाही. त्यांनी इ.स. १६१५ साली सर थॉमस रो याला पुन्हा मुघल दरबारात पाठवलं. त्याने मुघल साम्राज्याच्या सर्व भागांमध्ये वखार सुरू करण्याची परवानगी मागितली. मुघलांनीही ब्रिटिशांना ही परवानगी दिली. याशिवाय इ.स. १६५१ साली ब्रिटिशांनी बंगालमध्ये व्यापार करण्यासाठी बंगालचा नवाब शुजाउद्दीनकडे परवानगी मागितली. शुजाउद्दीने काही कर आकारून ब्रिटिशांना बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली. पुढे इ.स. १६९१ साली मुघल बादशाह औरंगजेबने शुजाउद्दीनचा आदेश धुडकावत ब्रिटिशांना बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्यासाठी सनद बहाल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील महत्त्वाची व्यापारी केंद्रे

सुरत आणि मसुलीपट्ट्णममध्ये वखार सुरू केल्यानंतर ब्रिटिशांनी इ.स. १६३३ मध्ये ओडिशातील बालासोरमध्ये वखार सुरू केली. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये मद्रास, तर इ.स. १६५१ मध्ये हुगळी येथे वखारी स्थापन केल्या. याशिवाय १६५१ मध्ये ब्रिटिशांनी हुगळीजवळील सुतनाटी, कालिकत आणि गोविंदपुरी ही तीन गावं ताब्यात घेऊन एक वखार स्थापन केली. पुढे जाऊन हीच गावं कलकत्ता शहर म्हणून ओळखली जाऊ लागली. याबरोबरच ब्रिटिशांचं आणखी एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणजे बॉम्बे. इ.स. १६६२ साली पोर्तुगालची राजकुमारी कॅथरिन हिचं लग्न ब्रिटिश राजकुमार दुसरा चार्ल्सशी झालं. त्या वेळी पोर्तुगीजांनी बॉम्बे ब्रिटिश राजकुमारला भेट म्हणून दिलं. पुढे इ.स. १६६८ साली ब्रिटिश सरकारने बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्त्वावर दिलं. हेच बॉम्बे पुढे ब्रिटिशांचं महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलं.