विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची रणनीती, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, अभ्यासक्रम आणि त्यानुसार अभ्यास करण्यासाठी कोणत्या पायऱ्या वापराव्यात याची चर्चा केली. आत्तापर्यंत आर्थिक व सामाजिक विकास या घटकांवर विचारले गेलेले प्रश्न आणि ते सोडविण्यासाठी वापरावे लागणारे स्रोत पाहू या. गेल्या पाच वर्षांत आयोगाने प्रामुख्याने पुढील घटकांवर प्रश्न विचारले आहेत. १) लोकसंख्या - यामध्ये हम दो हमारे दो धोरण, १९५२चा कुटुंबनियोजन कार्यक्रम, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण २०००ची उद्दिष्टे; तसेच त्यामधील तातडीची, अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे, नवीन लोकसंख्या धोरण २०११, या धोरणांनुसार लोकसंख्या स्थिरीकरणाची उद्दिष्टे, २०११च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्रय़रेषेखालील लोकसंख्येच्या सहगुणकाचा अन्वयार्थ, सकल प्रजनन दर, दशलक्ष शहरे, स्त्री साक्षरता दर, शहरी व ग्रामीण स्तरावरील शेकडा लोकसंख्या बदल, भारत व महाराष्ट्रातील तसेच ग्रामीण व शहरी स्तरावरील लिंग गुणोत्तर आणि २००१च्या लोकसंख्येच्या तुलनेत २०११मधील चढउतार, माल्थसचा लोकसंख्या सापळा आणि त्याचा लोकसंख्या वाढ व विकासाशी संबंध, २०४५साला पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाची राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्टे, लोकसांख्यिकी लाभांश मिळविण्यासाठी आवश्यक परिस्थिती, या घटकांवर प्रामुख्याने प्रश्न विचारले गेले आहेत. या अनुषंगाने लोकसंख्या या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला १९५१, २००१ आणि २०११ या तीन वर्षांची तुलनात्मक लोकसंख्येची तसेच लिंग गुणोत्तर, साक्षरता, घनता, या घटकांची महाराष्ट्र तसेच भारताची आकडेवारी आणि या संदर्भातील संकल्पनांचा अन्वयार्थ यांचा विशेष अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी www.censusindia.gov.in हे भारत सरकारचे अधिकृत संकेतस्थळ लक्षपूर्वक पाहणे नक्कीच उपयोगी ठरेल. २) भारतीय नियोजनाचे टप्पे - यामध्ये एक ते बारा पंचवार्षकि योजना, या योजनांच्या कालावधीतील किंमत वाढीचा दर, या योजनांची प्रमुख उद्दिष्टे, योजना कालावधीत सामाजिक विकासासाठी अमलात आणल्या गेलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण, शिक्षण हक्क कायदा २००९ अशा योजनांची व कायद्यांची उद्दिष्टे व ध्येय्ये, वित्तीय समावेशनासाठी राबविली गेलेली जनधन योजना, नियोजनाच्या आरंभीची रणनीती, योजनेला अवकाश दिलेले कालावधी, अशा घटकांवर प्रश्न विचारले आहेत. या घटकांचा अभ्यास करण्यासाठी एक ते बारा पंचवार्षकि योजना, त्यांची प्रमुख ध्येये, योजना कालावधीत सामाजिक व आर्थिक विकासाच्या अनुषंगाने उचललेली पावले, नीती आयोग आणि त्याचे कार्य या बाबींवर प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ३) दारिद्रय़ - यामध्ये दारिद्रय़ तफावत गुणोत्तर आणि शीर गणती गुणोत्तर या संकल्पनांचा निरपेक्ष दारिद्रय़ मापनाशी संबंध, नियोजन आयोगाने भारतीय दारिद्रय़ संबंधी लावलेले अंदाज आणि त्या संदर्भातील नेमलेल्या समित्या आणि त्यांचे अंदाज व निरीक्षणे, Multy Dimentional Poverty Index, वंचितता निर्देशांकसारखे महत्त्वाचे दारिद्रय़मापनाचे निर्देशांक या घटकांवर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने भारतीय दारिद्रय़ासंबंधी विविध अभ्यासगट, त्यांचे अंदाज आणि त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे तसेच दारिद्रय़ संबंधित विविध संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वरील प्रमुख मुद्दय़ांबरोबरच भारतीय मध्यवर्ती बँक (NBJ), तिची वित्तीय तरतूद, काय्रे, वित्त उभे करण्याच्या पद्धती, भाववाढीस कारणीभूत ठरणारे घटक, १९९१चे आर्थिक अरिष्ट, त्याचे कारण आणि त्यानंतर उदारीकरणाचे धोरण आणि त्याचे परिणाम, शहरीकरण आणि आर्थिक विकास, IDBI, IIBI, ICICI, IFCI सारख्या विकास वित्त संस्था त्यांची स्थापना वष्रे, सुती कापड गिरण्यांमधील कामाचे स्वरूप, भारतातील करपद्धती त्यामध्ये आयकर न भरण्याचे कारण आणि त्याचा काळ्या पशाशी संबंध याचबरोबर भूसुधारणा आणि तिचे परिणाम, ध्येये, त्यामधील समाविष्ट बाबी या घटकांवर ही प्रश्न विचारण्यात आले आहेत. एकंदरीतच अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचे योग्य विश्लेषण आणि आयोगाने दिलेला अभ्यासक्रम योग्य त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वरील घटकांचा अभ्यास करून निश्चितच या विषयात अधिकाधिक गुण मिळविणे सहज साध्य आहे. यासाठी भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत. पूर्वपरीक्षेच्या जय्यत तयारीसाठी राष्ट्रचेतना प्रकाशनाचे ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ मधील सराव चाचण्या उपयुक्त ठरतील.