ऋषिकेश बामणे

‘लेडी कॅप्टन कूल’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ३८ वर्षीय मितालीनं काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन विक्रम रचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणं आणि  एकदिवसीय सामन्यांत ७ हजार धावा करणं, अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला क्रिके टपटू. स्वत:बरोबरच अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवणाऱ्या मिताली राजविषयी..

जगात प्रामुख्यानं दोन प्रवृत्तींची माणसं आढळतात.  एक अशी, ज्यांना स्वत:चं मत इतरांसमोर सतत व्यक्त करावंसं वाटतं. आयुष्यातील चांगल्या किंवा वाईट अनुभवांना ते समाजमाध्यमांवर सहजपणे वाट मोकळी करून देतात. त्याउलट अशीही काही माणसं असतात जे इतरांमध्ये सहज मिसळू शकत नाहीत. आपल्या भावना कुणाकडेही, के व्हाही व्यक्त करण्यापेक्षा ते त्यावर नियंत्रण ठेवण्यात भलं मानतात. प्रवाहाच्या विरोधात जाऊन असामान्य कर्तृत्व करण्याची क्षमता अशा माणसांमध्ये असते. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही या दुसऱ्या गटातली.

‘लेडी कॅप्टन कूल’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ३८ वर्षीय मितालीनं काही आठवडय़ांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन विक्रम रचले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरण्याबरोबरच तिनं एकदिवसीय सामन्यांत ७ हजार धावांचं शिखर सर केलं. अशी कामगिरी करणारी ती तूर्तास एकमेवच; परंतु मितालीला लाभलेल्या या यशामागे अनेक वर्षांचे कठोर परिश्रम, तपश्चर्या तसंच जिद्द आहे. मुळात जवळपास दशकभरापूर्वी महिला क्रिकेटला देशामध्ये फक्त नावापुरती किंमत होती. अशा परिस्थितीतही मितालीनं चाहत्यांना भारतीय महिला क्रिकेटकडे आकर्षित करून त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडलं. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासात तिचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल, यात शंका नाही.

राजस्थानमधील जोधपूर शहरात ३ डिसेंबर, १९८२ रोजी मितालीचा जन्म झाला. साधारणपणे कोणत्याही लहान मुलाप्रमाणे मितालीलासुद्धा झोप खूप आवडायची. दुपार होईपर्यंत झोपून राहाण्याची मितालीची सवय तिचे भारतीय वायुदलात कार्यरत असणारे वडील दोराय यांच्यासाठी फारच त्रासदायक ठरत होती. तिची ही सवय मोडून काढण्यासाठी त्यांनी तिचा मोठा भाऊ मिथुनच्या साथीनं तिला सिकंदराबादला क्रिकेट प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. कालांतरानं संपूर्ण राज कुटुंबही हैदराबाद येथे स्थायिक झालं. तिथूनच मितालीच्या वेगळ्या दिशेच्या जडणघडणीला प्रारंभ झाला. वयाच्या  १० व्या वर्षी मितालीनं हातात क्रिके टची बॅट धरली. मात्र क्रिकेटबरोबरच नृत्याचीही तिला तितकीच आवड होती. भरतनाटय़ममध्ये शालेय पातळीवर सहभाग घेणाऱ्या मितालीनं अनेक पारितोषिकं जिंकली. मात्र दोन्ही विभागांत सारखं नैपुण्य असलं तरी कारकीर्द घडवण्यासाठी एकाच क्षेत्राला प्राधान्य देणं गरजेचं होतं. त्यामुळे मितालीनं १२ व्या वर्षी क्रिकेटकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रशिक्षक संपत कुमार आणि पालकांनीही मितालीच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच १९९९ मध्ये आर्यलडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दमदार शतक झळकवून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केल्यावर मितालीनं मागे वळून पाहिलं नाही. फलंदाज म्हणून छाप पाडण्यात यशस्वी ठरल्यामुळे लवकरच मितालीच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघहिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या मितालीनं २००५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं, परंतु ऑस्ट्रेलियापुढे भारतानं शरणागती पत्करली. पराभवानंतर खचून न जाता आणखी एका तपासाठी मितालीनं भारतीय महिला क्रिकेटसाठी सर्वस्व झोकून दिले. यादरम्यान तिनं अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली, तर तिच्याबरोबरीनंच सुरुवात करणाऱ्या अनेकींना निवृत्त होतानाही पाहिलं. मिताली मात्र एकलव्याप्रमाणे एकनिष्ठ राहून विश्वचषकाच्या प्राप्तीसाठी झटत राहिली.

दरम्यानच्या काळात भारतात झालेल्या महिलांच्या विश्वचषकासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देऊनही चाहत्यांनी सामन्यांकडे पाठच फिरवली. पुरस्कर्त्यांचा अभाव आणि पुरुषांच्या क्रिके टशी के ल्या जाणाऱ्या तुलनेमुळे महिलांच्या क्रिकेट सामन्यांचं थेट प्रक्षेपणही क्वचितच करण्यात यायचं. त्यामुळे भारतीय संघाच्या यशापयशाची पुरेशी माहितीही चाहत्यांपर्यंत पोहोचायची नाही. अशा परिस्थितीत देशात महिला क्रिकेटच्या प्रगतीची मशाल पेटवण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणं गरजेचं होतं.

सुदैवानं मितालीनंच हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. कोणाच्याही खिजगणतीत नसताना भारतानं २०१७ मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात चकित करणाऱ्या कामगिरीची नोंद करताना थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मितालीनं या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करत असतानाच संघाला ज्या प्रकारे विजयाची दिशा दाखवली, ते वाखाणण्याजोगं होतं. झुलन गोस्वामी, पूनम राऊत या अनुभवी खेळाडूंसह स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर यांसारख्या युवांची योग्य मोट बांधून मितालीच्या संघानं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यांसारख्या तुलनेनं बलाढय़ संघांना साखळीत धूळ चारली. इंग्लंडविरुद्धच्याच अंतिम लढतीत भारतीय संघ जेतेपदाच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचला, परंतु कामगिरी उंचावण्यात आपण किंचित कमी पडलो आणि  जेतेपद आपल्या हातून निसटलं.

मात्र हेच हुकलेलं जेतेपद देशातील महिला क्रिकेटचं रूप पालटणारं ठरलं. या प्रवासातील सर्वात मोठा अविभाज्य घटक म्हणजे मिताली. जवळपास दोन दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटची सेवा केल्यानंतरही मितालीची बॅट आजही तेजानं तळपते आहे. ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने, १० हजार धावांच्या इमल्याबरोबरच शतक-अर्धशतकांचा कित्ता, महिला क्रिकेटमध्ये दुर्मीळ मानलं जाणारं कसोटी सामन्यातील द्विशतक, क्रमवारीत वर्षांनुवर्ष टिकवून धरलेलं अग्रस्थान हे तिच्या मोठेपणाची साक्ष देतात. मितालीच्या यशोगाथेची दखल आता चित्रपटसृष्टीनंसुद्धा घेतली असून लवकरच तिच्यावर आधारित चरित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एक क्रिकेटपटू, फलंदाज, कर्णधार अशा सर्व पातळ्यांवर छाप पाडणाऱ्या मितालीची भारतासह अन्य देशांतील खेळाडूंशीसुद्धा सातत्यानं तुलना करण्यात येते; परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात, याप्रमाणे मितालीलाही कारकीर्दीतील एका टप्प्यावर टीका आणि विवादांना सामोरं जावं लागलं. २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषका- दरम्यान प्रशिक्षक रमेश पोवार यांनी आपली मानहानी केल्याचं मितालीनं सांगितलं. पोवार यांनी प्रत्युत्तर देताना मितालीच्या हट्टी स्वभावामुळे संघाचं नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यापूर्वीचे प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्याशीही मितालीचे संबंध ठीक नसल्याचं वृत्त त्या वेळी पसरलं होतं. त्यामुळे संघाच्या खालावलेल्या कामगिरीसाठी मितालीला जबाबदार धरण्यात आलं; परंतु मितालीनं या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.

मितालीच्या कारकीर्दीतून प्रेरणा घेत भविष्यात भारताला अनेक उदयोन्मुख खेळाडू गवसतील, यात शंका नाही. कारण महिला क्रिकेटसाठी आजही पुरस्कर्ते आणि पुरेशी संधी यांची कमतरता असूनही मितालीनं घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. पुस्तकांच्या विश्वात रमणारी मिताली मात्र आजही एका स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आफ्रिकेविरुद्धची मालिका वैयक्तिकदृष्टय़ा लाभदायक ठरली असली तरी ती सांघिक कामगिरीमुळे निराश आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक मितालीच्या कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक असेल. ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती पत्करल्यामुळे मिताली या विश्वचषकासाठी सर्वस्व झोकून देईल, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे गेल्या २२ वर्षांपासून क्रिकेटवर राज्य गाजवणाऱ्या मितालीची कहाणी अधुरी राहू नये, हीच तमाम क्रीडाचाहत्यांची इच्छा आहे.

rushikesh.bamne@expressindia.com