'A wave in the ocean is at the cost of hollow elsewhere' हे स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध वचन आहे. आपल्या देहातील प्राणशक्तीलाही हेच वर्णन लागू पडते. प्राणशक्तीची सामावस्था म्हणजे ‘सम + आ + धी’, जिथे बुद्धी समत्वदृष्टीने प्रस्थापित होते. याउलट व्याधि म्हणजे वि + आ + धि - म्हणजेच to disintegrate or separate. विचार, कृती व भावना, यांच्यात सुसूत्रीकरण व एकरूपता नसेल तिथे व्याधी आलीच म्हणून समजा.आपल्या देहातील प्राणशक्तीचा सुसूत्र वापर करण्याऐवजी आपण तिचे असमान विघटन करतो. चिंता व काळज्यांसाठी मेंदू अधिक ऊर्जा खेचून घेतो. उरलीसुरली ताकद हृदय व स्नायूंना पुरविली जाते. आता बाकी साऱ्या संस्थाकडे प्राणऊर्जेची ओहोटी लागल्याने व्याधी बळावायला मदत होते. म्हणजेच व्याधी होण्यास प्राणाचे ‘अजीर्णत्व’, ‘कुजीर्णत्व’ अथवा ‘अतिजीर्णत्व जबाबदार असते असे ‘योगवासिष्ठ’ ग्रंथात म्हटले आहे.आज आपण चंद्राभ्यासाचा सराव करणार आहोत.उदरश्वसन कुठल्याही सुखासनात बसा. डोळे मिटून घ्या. पाठकणा समस्थितीत ठेवा. दोन आवर्तने प्राणधारणा केल्यावर उजव्या हाताच्या अंगठय़ाने उजवी नाकपुडी बंद करा. सावकाश डाव्या नाकपुडीने पोट भरून श्वास घ्या व डाव्या नाकपुडीनेच श्वास सोडून द्या. श्वास घेताना पोट बाहेर येईल. श्वास सोडताना पोट आत जाईल, यालाच उदरश्वसन म्हणतात. उदरश्वसनासह चंद्राभ्यास केल्याने हृदयाची गती, रक्तदाब कमी होतो. मन शांत होते.