उमा बापट - umaajitbapat@gmail.com निस्सीम प्रेम आणि शिस्त यांचं घट्ट नातं अनेकदा पालकांना स्पष्ट सापडलेलं दिसत नाही. नात्यातलं प्रेम आणि दृढ विश्वास यांची जागा वस्तूंची मागणी-पुरवठा, ‘जर-तर’च्या अटी, वरवर वेळ मारू न नेणारी त्रोटक संभाषणं हे घेतात. ‘निस्सीम प्रेम’ या प्रेमाच्या खोल आणि सुंदर संकल्पनेची बहुविध रूपं उलगडायला हवीत. शुद्ध प्रेमाला मर्यादा नसतात, असं डोळस, समंजस आणि व्यापक प्रेमाचं बाळकडू मुलांना लहानपणापासून घरातूनच देऊ या. शाळेत एका बाकावर बसताना ‘बाकावरचा हा माझा भाग, हा तुझा भाग,’ अशी आखणी दोन मित्रांमध्ये साहजिकच होते. एकप्रकारे सीमा ठरवल्या जातात. लहान मुलाला आईच्या मांडीवर दुसरं कोणी बसलेलं चालत नाही. आईचं असणं मुलाला पूर्णपणानं हवं असतं. त्यात वाटणी, सीमा बसत नाही. निस्सीम प्रेम हे आई-मुलाच्या नात्याशी जोडलेलं एक घट्ट समीकरण ठरून गेलं आहे. आईची मुलांसाठी आंतरिक ओढ वगैरे या गृहीतकाच्या पलीकडे ‘आई’ एक व्यक्ती म्हणून तिच्या प्रेमाच्या भुकेकडे पण अधिक संवेदनशीलतेनं बघता येऊ शकतं. फक्त आईच्या प्रेमाची थोरवी गाण्यापलीकडे परस्पर नात्यातली निस्सीम प्रेमाची गरजही प्रकर्षांनं समोर यायला हवी. ‘आमचं सगळं झालं, की जमलं तर तुझ्यासाठी वेळ ठेवू ’- साधारण या धर्तीचा निष्कर्ष निघेल, असं कोणत्याही वयातल्या मुलाचं वागणंसुद्धा आई या समंजस भूमिकेनं कायम समजून घ्यायचं असतं. नव्हे, जी समजून घेते तीच खरी प्रेमस्वरूप आई. ‘निस्पृह देणं’ (१४ मार्च) या लेखात आपण पाहिलं, की अविरत देत राहाणं हे पालकत्वाच्या भूमिकेत सामावलेलं आहे. याचा अर्थ असा नाही, की मुलांनी पालकांशी संवेदनशीलतेनं वागू नये. प्रेम तर कोणालाही कु णावरही आणि कशावरही करता येऊ शकतं. कुसुमाग्रजांची ‘प्रेम कुणावरही करावं’ ही कविता या ठिकाणी आठवेल. त्यातील शेवटच्या ओळी आपल्या जीवनातलं प्रेमाचं अनन्यसाधारण स्थान दाखवतात. कुसुमाग्रज लिहितात, ‘प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव’. सद्य:स्थितीत मात्र समाज कुठे येऊन पोहोचला आहे, त्याबद्दलची आणि नात्यांतला दिखाऊपणा मार्मिकपणे टिपणारी वैभव जोशींची कविता या संदर्भात आठवली, ‘तुम्ही जर व्हॉटसअॅपवर असाल तर मी तुमचा आहे’ अशी ती कविता. अटीतटीच्या वाटाघाटी आणि नात्यांतला थिटेपणासुद्धा वास्तवाचा एक भाग बनला आहे. फिरून एकवार ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं वाटणाऱ्या मंगेश पाडगावकर यांनी वर्णन केलेल्या शुद्ध प्रेमाची संकल्पना जागी करूयात. प्रेम या अथांग सागराला जाणायचं ठरवलं तर लाटांमागून लाटा येत राहातात तसंच काहीसं होईल. काही आवडणं, कशाचं तरी वेड असणं, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं, यालाही प्रेम म्हणता येईल. ‘कामावर प्रेम’ अशी कार्यसंस्कृती ज्या कुटुंबात जपली आणि जोपासली जाते तिथे मनापासून कामात रमलेले आई-बाबा मुलं आपसूक बघतात. घराचा नकाशा ग्राहकाला पसंत पडेपर्यंत परत-परत बदल करून देणाऱ्या एखाद्या वास्तुविशारद आईचं नेटकं काम आणि त्यामागची प्रेमळ बांधिलकीची वृत्ती मुलांना कळू शकते. पक्ष्यांसाठी गच्चीत पाणी ठेवणारा, गुलाबाचे विविध प्रकार बागेत वाढवणारा, झाडांची न चुकता निगराणी करणारा बाबादेखील निसर्ग वेडाच्या अमर्याद प्रेमाची मुलांना नकळत झलक देत असतो. घरातलं कु णी कधीही बाहेरून दमून आलं, की ज्याच्या त्याच्या आवडीनुसार सरबत, खाणं, चहा-पाणी न मागता आपलेपणानं हातात देणारी आजी! आजीच्या या वागण्यातून मायेनं सांभाळ करणं, याचा मुलं साक्षात अनुभव घेतात. सौर ऊर्जेचा वापर करून, इतरांना त्याचं महत्त्व पटवणारे, वेगवेगळे प्रयोग करण्याचा ध्यास घेतलेले एखादे आजोबा सूर्यचुलीवरसुद्धा प्रेम करतात हे नातवंडं जाणून असतात. शुद्ध प्रेमाला विषयाच्या, वयाच्या, अमुक-तमुक मिळवण्याच्या मर्यादा नसतात, हे बाळकडू घरातून असं मिळू शकतं. आठ वर्षांच्या अंकिताला त्यांच्या नात्यातला एका आजीचा खूप लळा होता. अंकिताच्या आईला मात्र त्या आजींविषयी विशेष प्रेम नव्हतं. पण अंकिताच्या भावना आई जाणून होती. अंकिता कधी त्या आजींसाठी चित्र काढायची, तर कधी त्यांच्याशी गप्पा मारायला ‘त्यांच्या घरी मला सोड,’ असं आईला सांगायची. अंकिताचं त्या आजीवरचं प्रेम आणि तिच्या आईचं अंकिताच्या प्रेम व्यक्त करायच्या आड न येणं, हे निस्सीम प्रेमाचं द्योतकच! साकेतनं अगदी लहान वयापासून त्याच्याकडे असलेल्या गोष्टीच्या पुस्तकांवर जीवापाड प्रेम केलं. कु णी पुस्तकाचं पान जरी काळजीपूर्वक उलटलं नाही तरी त्याचा जीव हळहळायचा. एखादं वाचनालय किंवा पुस्तकांचं दुकान बंद करावं लागलं अशी बातमी वाचली, की पुस्तकांवरच्या प्रेमापोटी चौदा वर्षांच्या वयातही जुन्या वाचक पिढीसारखं त्याला वाईट वाटायचं. मुलांच्या प्रेम व्यक्त करायच्या पद्धतींनाही विशिष्ट चाकोरी असतेच असं नाही. प्रेमाचं प्रकटीकरण होताना कोणकोणत्या सीमांमध्ये जखडणं शक्य आहे? मुलांच्या मागणीनुसार लाड पुरवताना समाजानं तयार केलेल्या प्रतिष्ठेच्या सीमा? उदा. सायकलवर कसं पाठवणार? गल्लीतल्या सगळ्यांकडे स्वत:चं दुचाकी वाहन आहे. किंवा मुलाच्या लग्नात किती थाटमाट केला त्यावर ठरणार प्रेम? शिक्षण संस्थेचं यश टिकावं हे बंधन म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवणं ही शिकण्याच्या प्रेमाची सीमा? असे कधी, कसे कधी तरी, कसे तरी आखले गेलेले सीमित आणि तरीही राजरोस झालेले मार्ग. आड येणाऱ्या अयोग्य सीमांना ओलांडण्यासाठी धडपडण्यावरही प्रेम करायला लागलो तर निस्सीम प्रेमातलं समाधान लाभेल. प्रेम या अमूर्त संकल्पनेला माणसानं कायमच वेगवेगळ्या प्रतीकांची सोबत दिली. वस्तूरूपी प्रतीकं ही एक पद्धत. प्रेमळ स्पर्श, प्रेमाचे शब्द, प्रेमळ चेहरे, हावभाव, स्मित, प्रेमळ सोबत, अशा अजून किती तरी पद्धती आपण प्रेमपूर्वक स्वीकारल्या तर मुलंही त्यावर प्रेम करायला लागतात. ‘करोना’ विषाणूच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात घरातल्या कु णाचा तरी वाढदिवस आला. पुष्पगुच्छ आणि तत्सम भेटी विकत मिळत नव्हत्या. पण त्या मिळवाव्यात, असं नचिकेतला वाटलं नाही. कारण अशा प्रतीकांच्या मागची भावना त्याच्या घरातूनच त्याच्यापर्यंत लहानपणापासून पोहोचली होती. मुलांसाठी दरवेळी खूप उबदार बिछाना आणि आणि भारीतलं भारी पांघरूण आणून देणं पुरेसं असेल का? झोपताना मुलांना आई-बाबांच्या मायेचा विश्वस्त उबदार स्पर्श हवासा वाटेल. लहान वयात मुलांना प्रेमळ सहवास लाभणं ही त्यांची आयुष्यभर इतरांवर प्रेम करू शकण्याची जणू बेगमी असते. काही अनाथाश्रमात राहणाऱ्या आणि घरात वाढणाऱ्या बाळांवर परदेशात तौलनिक अभ्यास झाले आहेत. प्रेमळ सहवास, मायेचा स्पर्श मिळणं- न मिळणं याचा मुलांच्या वाढीवर अनेक अंगांनी परिणाम करत असतो, असं दिसून आलेलं आहे. सुरक्षित वाटणं, मेंदूची वाढ व्यवस्थित होणं, मुलांचा भाषाविकास होणं आदी गोष्टींवर प्रेमळ स्पर्श मिळालेल्या आणि न मिळालेल्या बाळांमध्ये फरक दिसतो. असुरक्षितता वाटणाऱ्या मानसिकतेच्या स्वरूपात ते त्यांच्या पुढील आयुष्यातही दिसू शकतात. तेरा-चौदा वर्षांच्या मुलांचे पालक काहीवेळा समुपदेशनसाठी येतात. मुलांच्या न संपणाऱ्या, वाढत जाणाऱ्या मागण्यांना आवर कसा घालायचा हे न उमजल्यानं आणि ते सगळं हाताबाहेर जायला लागलं की, अपरिहार्यता म्हणून का होईना, पण येतात. मुलांचे लाड आणि बेशिस्त याच्या सीमा पालकांनी ठरवलेल्या नसतात. निस्सीम प्रेम आणि शिस्त यांचं घट्ट नातं पालकांना स्पष्ट सापडलेलं नसतं. नात्यातलं निस्सीम प्रेम आणि दृढ विश्वास याची जागा वस्तूंची मागणी, पुरवठा आणि ‘जर-तर’च्या अटी, वरवर वेळ मारून नेणारी त्रोटक संभाषणं हे घेतात. रुक्ष, यांत्रिक, व्यवहारापुरतं सीमित नातं तयार होतं. प्रेमळ नात्याची पोकळी मुलांच्या आयुष्यात तयार होऊ शकते. ओळख, मैत्री, आकर्षण, सहवास हवासा वाटणं, प्रेम, या छटांबद्दल आपल्या पालकांशी कधी मोकळेपणे गप्पा झालेल्या नसतात. वस्तूंचा भडिमार असेलही, पण निव्र्याज प्रेम, आश्वासक आधार, मायेची फुं कर, चांगुलपणाचा प्रेमळ आग्रह, याचा वर्षांव मुलांनी घरून अनुभवलेला नसतो. याची परिणती घडू नये ते घडण्यात होऊ शकते. नको त्या वयात नको ते वागणं सुरू होतं. समुपदेशनातून सोळा-सतरा वर्षांच्या मुलामुलींना प्रेमाची भाषा त्यातील मुळाक्षरांसकट समंजस प्रेमानंच समजावून सांगता येते. डोळस प्रेम कोणत्याही वयातल्या मुलांच्या पालकांसाठी नितांत गरजेचं आहे. प्रत्येक टप्प्यावर डोळस प्रेम करायची पूर्वतयारी पालकांनी जरूर करावी. ‘लव्ह इज समथिंग इफ यू गिव्ह इट अवे, यू एंड अप हॅविंग मोअर,’ अर्थात प्रेम दिल्यानं वाढतं.. अमेरिकन लोकगीतकार मालविना रेनॉल्डस यांचं हे सहज, सोपं गाणं भौगोलिक अंतराच्या, काळाच्या सीमांना पार करत वैश्विक सत्याचं स्मरण देतं. प्रेम साजरं करायला कोणत्याही ठरावीक दिवसांची, फक्त रक्ताच्या नात्यांची तोकडी सीमा न आखता, माणुसकीवर, सत् मूल्यांवर प्रेम, देशप्रेम, अशी खोली नि व्याप्ती असलेलं, माणसाच्या जगण्यातील मूलभूत प्रेम निरामय घरटय़ात निस्सीम रूपात अनुभवूया.