कुटुंब व्यवस्था बदलली आणि मुलं एकेकटी वाढू लागली. त्यांच्यात दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, काळजी घेणं, नातेसंबंधांतले भावबंध समजून घेणं, समन्वयानं काम करणं, वस्तू वाटून देणं-घेणं, अगदी गरज पडेल तेव्हा भांडणही करणं या गोष्टी दिसत नाहीत अशी तक्रार अनेक पालक करतात. ते वास्तव आहे का? मुलांमध्ये जन्मत: स्वभावगुण असतात, त्यांच्या वाढीसाठी त्यांना अवकाश मिळतो का? समाज, शाळा ही त्यासाठी ओली माती असेल तर त्याची बिजं अंकुरायला पोषक वातावरण मिळतं का? जून महिन्यात शाळा सुरू होत आहेत. त्यानिमित्ताने मुलांच्या भावनिक विकासाची गरज सांगणारा लेख…
‘Every child is born with a capacity to be human, empathic and compassionate.’ प्रत्येक मूल जन्मत:च काही नैसर्गिक क्षमता घेऊन येतं. थोडक्यात, सत्य, प्रामाणिकपणा, निष्ठा, करुणा, प्रेम, शांती आणि सन्मान ही मानवी मूल्ये प्रत्येक मुलामध्ये जन्मत: असतातच, परंतु ही मूल्ये विकसित होण्यासाठी मुलांना स्वअवकाश मिळाला पाहिजे आणि त्यांच्या भोवतालच्या वातावरणातल्या इतरांकडूनही त्याला तसेच अनुभव त्यांच्याही वागण्यातून मिळाले पाहिजेत. शाळा ही मुलांच्या आयुष्यातली घरानंतरची महत्त्वाची वास्तू, जिथे मुलांचा सर्वाधिक वेळ व्यतित होतो. तिथले शिक्षक, सहाध्यायी यांच्या सोबतीने तेही अनेक गोष्टी शिकत असतात.
मुलांमधल्या या उपजत मूल्यांची जाणीव आम्हाला आमच्या शाळेच्या ‘कामाचा वर्ग’ वातावरणात वेळोवेळी होते. हा कामाचा वर्ग म्हणजे मुलांचा ‘सहज शिक्षण वर्ग’ तर मोठ्यांचा मूल ‘का, कसं आणि काय शिकतं’ हे जाणून घेण्याचा अभ्यासवर्ग होय. ‘मुलांचे खेळणे’ असं आपण जे समजतो त्यांना आम्ही ‘मुलांची कामे’ म्हणतो. या वर्गात ‘आम्ही मोठे’ त्या कामांचा अभ्यास करताना आम्ही फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत असतो. मुलांच्या कामात अजिबात मध्यस्थी, सूचना वगैरे करत नाही. त्यातून मुलांच्या सर्वांगीण विकासक्षेत्रांतल्या कित्येक क्षमता आपसूक दिसतातच, पण नैतिक, सामाजिक आणि भावनिक विकासाची अचंबित करणारी वर्तणूक दिसते.
पाच वर्षांची जिया, काडी-काडी जमवून जसा संसार उभा करतात त्याप्रमाणे, वर्गभर फिरून तिला उपयोगी वाटणाऱ्या वस्तू जमा करत होती. एका कपाटाच्या दाराचा उपयोग ओट्यासारखा करून त्यावर त्या वस्तू मांडत होती. आणलेल्या वस्तूंची एकाग्रतेने मांडणी करून झाली की, दुसऱ्या वस्तू आणायला परत वर्गभर फिरायचं असं तिचं काम चाललं होतं. तिच्याच बाजूला तीन-चार मुलं त्यांचं काम करत होती. ती मुलं बहुदा एक गाडी तयार करत होती. माझे त्यांच्या कामाकडे फारसं लक्ष नव्हतं. जिया वस्तू गोळा करायला गेली असताना त्या मुलांपैकी एकाने म्हटलं, ‘‘अरे, आपल्याला दार हवंय,’’ आणि त्याचं लक्ष जियाच्या दाराकडे गेलं. मला काही कळायच्या आत त्याने ते दार त्यांच्या कामाला घेतलं. जियाचा संसार क्षणार्धात खाली आला. तेव्हढ्यात जिया काही वस्तू गोळा करून आली. तिच्या प्रतिक्रियेचे मी निरीक्षण करत होते. मला वाटलं, आता ही रडणार. अर्थात आपल्या वस्तू जमिनीवर पडलेल्या पाहून तिला धक्का बसला. तिनं आजूबाजूला पाहिलं. तोपर्यंत त्या मुलांनी ते दार अतिशय कल्पकतेनं त्यांच्या गाडीसाठी वापरलं होतं. आपलंच दार या मुलांनी घेतलं हे तिला कळलं. तिने फक्त ‘अ ssरे’ असं म्हटलं, पण आकांडतांडव न करता दुसऱ्याच क्षणी वेगळी मांडणी करण्याचं काम सुरू केलं.
काहीही उलथापालथ झाली, तरी आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आणि पुढे जायचं हे तिने तिच्या वागण्यातून अगदी सहज दाखवून दिलं. कोणीही न शिकवता. तसंच तिने बहुदा त्यांची गरज जाणून घेतली. त्यांना त्याची जास्त आवश्यकता आहे हेही समजून घेतलं. परत नव्याने सहज सुरुवात करता येते, दुसऱ्यांची गरज जाणून समंजसपणा दाखवायचा ही नैतिकता, भावनिक सक्षमता जियाने सहज दाखवली. त्या मुलांबाबतही त्यांनी दुष्टपणा म्हणून ते दार हिसकावून घेतलं नव्हतं तर त्यावेळची ‘गरज’ आणि समोर ‘ती वस्तू’ दिसली म्हणून ते घेतलं होतं. जिया असती तर नक्कीच त्यांनी तिची परवानगी घेऊन ते वापरलं असतं. तीन वर्षांचा राया, एके दिवशी वर्गात मिसळत नव्हता. त्याच्याच वयाच्या दोघींना ते जाणवलं. त्या त्याच्याजवळ न बोलता शांत बसून होत्या. केवळ स्पर्शाच्या भाषेतून त्यांचा संवाद सुरू होता. हळूहळू रायाचा हिरमुसलेला चेहरा हसरा झाला आणि तो त्या दोघींबरोबर वर्गात मिसळून गेला. भावनिक विकासाची क्षमता ‘दुसऱ्याच्या भावना समजून घेणे’ मुलांमध्ये उपजत असते याचे उत्तम उदाहरण अनुभवायला मिळालं.
याचबरोबर दुसऱ्यांची काळजी घेणं, एकमेकांना सहकार्य करणं, अनेक नातेसंबंध प्रत्यक्ष जगून पाहणं, त्यातले भावबंध समजून घेणं, आईच्या भावना जगून पाहाणं, गटात समन्वयाने काम करणं, दुसऱ्याचं म्हणणं एकून घेणं, एकमेकांचं म्हणणं समजून घेणं, एकमेकांच्या वस्तू वाटून घेणं, गरज पडेल तेव्हा भांडणं करणं पण ती मनात न ठेवणं, कशाचाही राग मनात न धरणं या आणि अशा भावनिक विकासाच्या विविध पैलूंची अनुभूती मुलांच्या वागण्यातून या वर्गात सतत येते. इथे कधीही लिंगभेद जाणवत नाही. कोणता तरी समारंभ होता. एका मुलीच्या हातात कुंकवाच्या करंड्यासारखं काहीतरी होतं. त्यातून ती सगळ्यांना कुंकू लावत होती. (बहुधा तिने ते घरी किंवा अन्यत्र पाहिलं असावं) तिच्यापुढे मुलगे, मुली सगळे जण रांगेत कुंकू लावायला उभे होते. जोपर्यंत तू मुलगा किंवा मुलगी आहेस, तू असं करायचं नाही असं सांगितलं जात नाही, तोपर्यंत अशी वर्गवारी करणं हा मुलांचा स्वभाव नसतो हे इथे वारंवार जाणवतं.
बहुतेक वेळा मुलं गटानेच काम करतात. त्यामुळे ‘सहकार्य’ आणि ‘समन्वय’ त्यांच्या कामात सतत जाणवतो. त्यावेळी त्यात अनेक गोष्टी आश्चर्यचकित करतात. त्यांच्यात कधीही ‘मी सांगतो आणि तू ऐक’ असा भाव नसतो. एकमेकांचं नेतृत्व ती सहज स्वीकारतात. तसंच अनेक वेळा एकमेकांना सूचना न करता किंवा न बोलताही कामांमध्ये समन्वय साधतात. ‘एकमेकांबरोबर समन्वयाने काम करणे’ या भावनिक विकासाच्या नियोजित कृतींच्या कक्षेपलीकडचा हा भावनिक विकास मुलांमध्ये उपजत आहे, असं मला नेहमी वाटतं. यातच आणखी एक पैलू जाणवतो तो म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगाची वस्तू सहज देणं. जेव्हा मुलं वेगवेगळ्या गटात काम करत असतात, तेव्हा एखाद्याला सापडलेली वस्तू ज्या गटातल्या कामासाठी आवश्यक आहे असं त्याला वाटतं, ती तो त्या गटाला नेऊन देतो. त्याबाबत प्रौढी किंवा ‘मी कशी तुला मदत केली’ अशी काही भावना नसते. चांगला माणूस म्हणून घडण्याचा यापेक्षा मोठा गुण कोणता, नाही का? मुलांना नैतिकतेचे धडे देणारे अनेक जण मात्र दुसऱ्याच्या कामाला उपयोगी पडेल, अशी वस्तू आपल्याकडे असली तर ती दडवून ठेवतात आणि जर दिलीच तर आपल्यामुळे त्याचा कसा फायदा झाला हे सतत सांगतात. मुलांचं हे वागणं पाहून वाटतं आपण या मुलांचा भावनिक विकास करायचा की मुलांच्या या वागणुकीतून आपण धडे घ्यायचे!
जून २०२५पासून ‘शैक्षणिक धोरण २०२०’च्या प्रत्यक्षअंमलबजावणीसाठी ‘नैतिक बंध आणि मूल्यांसह चांगला माणूस घडवणे’, हा शिक्षणाचा उद्देश साध्य करण्यासाठी शाळेच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढील वर्षांमध्ये अभ्यासक्रमात ‘नैतिकतेचे घटक’ समाविष्ट केले आहेत. पायाभूत अभ्यासक्रम आराखड्यानुसार मुलांमध्ये (३ ते ८ वयोगट) भावनिक बुद्धिमत्ता विकसित करताना काही क्षमतांवर सखोल काम करायचे आहे. उदा. स्वत:च्या भावना समजून त्यांचं व्यवस्थापन करणं, सामाजिक नियमांचं पालन करणं, कुटुंब आणि समाजामध्ये स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:ला ओळखणं, इतर मुलं आणि प्रौढ यांच्याशी सहजतेनं संवाद साधणं, इतर मुलांबरोबर सहकार्य वृत्तीनं वागणं, प्राणी आणि वनस्पतींची काळजी घेऊन दयाभाव दाखवणं, इतर मुलांचे विचार, त्यांचे प्राधान्य व भावनिक गरजा लक्षात घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणं वगैरे. यापूर्वीही ‘बालशिक्षणा’मध्ये या क्षमतांवर काम केलं जात होतं. आराखड्यातली सविस्तर मांडणी कदाचित जास्त मार्गदर्शक ठरू शकेलही, पण वर दिलेली ‘कामाच्या वर्गा’तली उदाहरणं पाहिली तर असं लक्षात येतं की, मुलांच्या भावनिक विकासाच्या कक्षा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त रुंद आहेत. म्हणूनच असं वाटतं की, मुलांमधला भावनिक विकास साध्य करताना आधी मुलांमध्ये उपजत असलेल्या नैसर्गिक मानवी मूल्यांची जपणूक करायला हवी. यासाठी अगदी जन्मापासूनच आणि पुढे शाळेतही त्यांच्यातील उपजत मूल्यं आपोआप बहरतील अशी सवड द्यायला हवी. त्याचबरोबर पालक, शाळा आणि मुलांच्या भोवती वावरणाऱ्या इतर समाज घटकांची वर्तणूक मानवी मूल्यांची जास्तीत जास्त जपणूक करणारी असायला हवी. पण त्यासाठी सद्या:परिस्थितीत आपल्यासमोरही अनेक आव्हानं आहेत. आसपास अनेक भावनाहीन घटना घडत आहेत. त्या मुलांच्या कानावर सहज पडत असतात.
खोटं बोलणं हा मुलांचा मूळ स्वभाव नसतो. पण खोटं बोलणं, नियम तोडणं याचा सतत अनुभव त्यांना येत असतो. घरोघरचे मोबाइल फोन, टीव्ही मालिका, याशिवाय विविध समाज माध्यमे मुलांच्या भावनिक विकासातले मुख्य अडथळे ठरत आहेत. आपल्या कामात व्यत्यय नको म्हणून मुलांच्या हातात मोबाइल फोन देणारी, स्वत: त्यात अडकलेली, एकमेकांशी न बोलणारी घरे आहेत. नातेवाईकांशी क्वचितच संपर्क आल्याने मुलांची नातेसंबंधांशी ओळख नाही. घराघरांतले एकुलते एक मूल, त्याच्याभोवती फिरणारे सगळे यामुळे मुलाला मिळायला हवा तसा ‘स्वअवकाश’ मिळत नाही. सगळं आपल्या मनासारखंच होत राहणार, असं मुलाच्या मनावर बिंबवणारं वातावरण असतं. त्यातून मग हट्टीपणा आणि नकार न पचवता येणं हे येतं. त्यामुळे मुलांचे उपजत असलेले ‘sharing, caring’ विरून जाते. या सगळ्या आव्हानांना पेलून मुलांच्या भावनिक, सामाजिक विकासासाठी पोषक वातावरण कसं तयार करता येईल याचा गंभीर विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा. ‘Humane caregiving expresses child’s capacity to be humane.’ केवळ शाळा आणि अभ्यासक्रमातले धडे गिरवून किंवा काही कृती करून तो साध्य होईल असे गृहीत धरता येणार नाही. ही सर्व समाज घटकांची सामूहिक जबाबदारी आहे आणि ती सर्वांनीच मिळून उचलायला हवी.