प्रत्येक व्यक्तीचे विशेषत्व टिपण्यासाठी त्याच्या कर्तृत्वाचा अभ्यास करावा लागतो. वक्ते आणि प्रेक्षक यांच्यामधला ‘पूल’ असलेल्या संवादकाला प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ देणारं सूत्र शोधावं लागतं. यासाठी भावनिक आरोग्याचे वेगवेगळे आयाम पुढे आणणारे संवाद साधताना स्वत: कोणताही अभिनिवेश न धारण करणे हे संवादकाचे महत्त्वाचे कौशल्य आहे.
मुंबईतल्या ‘ताडदेव एअरकंडिशन्ड मार्केट’ या ठिकाणाचे नाव घेतले, तरी वातानुकूलित वाटायचा काळ होता तो. या प्रतिष्ठित इमारतीमध्ये, पावले आत रुततील अशा गालिचावरून आम्ही पोहोचलो ते दादा कोंडके यांच्या खोलीत. ‘आम्ही’ म्हणजे दादांचे मित्र आणि माझे गुरू डॉ. रवी बापट आणि मी. तो काळ हिंदीत राजेश खन्नाचा आणि मराठीत दादांचा होता. जी. एस. मेडिकल महाविद्यालयाच्या ‘मराठी वाङ्मय मंडळा’च्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण त्यांना दिले. बापट सर बरोबर असल्याने लगेच होकार मिळाला.
‘‘आपल्याला भाषन -बिशन नाय जमणार…. गप्पा मारू’’, असे दादांनी जाहीर केल्यावर बापट सरांनी आत्मविश्वासाने सांगितले, ‘‘हा घेईल तुमची मुलाखत.’’ मी बावचळलो, पण लगेच सावरलो. पाहुण्यांबद्दलची माहिती गोळा करणे त्या वेळी कठीण होतं. पण बापटसरांच्या कृपेमुळे शिरीष कणेकर आणि इसाक मुजावर या दोघा ज्येष्ठ सिनेपत्रकारांनीही मदत देऊ केली.
मुलाखतीला आठवडा राहिला असताना मला स्वप्न पडलं की मी मुलाखत घेतोय. आणि प्रेक्षक मला नाही तर दादांच्या विनोदाला हसताहेत. तिथपासून आजपर्यंत उणीपुरी ४८ वर्षं (आणि अंदाजे १४०० मुलाखती) ही सवय स्वत:ला लावली आहे. मनाच्या डोळ्यांसमोर संवाद पाहण्याची तालीम करायची. काळ पालटला तसे जगातील कोणत्याही वक्त्यांपर्यंत ‘ऑनलाइन’ भेटण्याची सोय झाली. पूर्वी आवर्जून प्रत्यक्ष भेटायचो. अशा भेटीत ती व्यक्ती कशी बोलते, वागते ते मी शोषून घेत असतो.
व्यक्तीच्या सर्व ‘उपाधि’ लक्षात घ्यायच्या नाहीत. माणूस म्हणून असलेले विशेषत्व टिपत जायचे. समांतरपणे सुरू करायचा कर्तृत्वाचा अभ्यास. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला अर्थ देणारे एक सूत्र असते. ते गवसणे महत्त्वाचे. उदाहरणार्थ सोनम वांगचुक ‘लडाखची भूमी’ जगतात. बंगळूरुचे ‘तलावपुरुष’ आनंद मल्लिगावड हे ‘पाणी’ या शब्दाभोवती श्वास घेतात. गंगूबाई हंगलांचा प्राण होता ‘सूर’. पी. साईनाथ यांचे जगणे फिरणे ‘ग्रामीण भारता’सोबत. अतुल पेठे म्हणजे ‘शोध’. रेणुताई गावस्कर म्हणजे ‘गोष्ट’. प्रतिभा रानडे म्हणजे ‘पिकलेली विद्वत्ता’. कधी कधी एखादी भावनाच मार्ग बनतो त्या व्यक्तीला समजून घेण्याचा. डॉ. भरत वाटवानी यांचे कार्य चालते ‘करुणा’ या भावनेचा केंद्रबिंदू पकडून. उस्ताद तौफिक कुरेशींची भावना आहे ‘तन्मयता’. डॉ. सदानंद दाते म्हणजे ‘शौर्य’ आणि ‘आपुलकी’. जळगावचे जहांगीर शेख म्हणजे ‘जिज्ञासा’ आणि ‘निष्ठा’.
अशी शेकडो व्यक्तिमत्त्वे सहवासात आली, कारण गेली ३४ वर्षं सुरू असलेला उपक्रम म्हणजे ‘वेध’. वेगवेगळ्या व्यवसायांची ओळख विद्यार्थी, शिक्षक, पालकांना व्हावी यासाठी हे संवाद सुरू झाले. विकसित होत होत आज ती ‘जीवन की पाठशाला’ बनली. त्या व्यक्तीचा गाभा, चैतन्य, त्याची जीवनमूल्ये सर्वांसमोर ठेवणारे हे संवाद. ‘मुलाखत’ हा शब्द या वाटेवर गळून पडला. ‘संवाद’ आणि ‘संवादक’ असे शब्द रेखीव होत गेले. वक्ते आणि प्रेक्षक यांच्यामधला ‘पूल’ म्हणजे संवादक. स्वत:ला प्रथम ठेवायचे वक्त्यांच्या भावनांमध्ये. त्या भावनांच्या बरोबरीने चालायचे. एकही भावना ‘चॅलेंज’ करायची नाही. प्रसंगी आपल्या शब्दात मांडायची पण तीही हळुवारपणे.
समोरच्या व्यक्तीची संभाषणलय बिघडू न देता. सलमा या प्रसिद्ध तमिळ साहित्यिक आहेत. तमिळनाडूच्या ग्रामीण भागात वाढलेली, परंपरांनी जखडलेली परंतु ज्ञानसक्त अशी मुस्लीम स्त्री. त्या बोलत होत्या त्यांच्या इंग्रजीमध्ये. सुरुवातीला मी अनुरूप मराठी रूपांतर करत होतो. एका टप्प्यावर माझ्या लक्षात आलं की त्यांची इंग्रजी सभागृहामध्ये उतरते आहे. काही गरज नाही माझ्या भाषांतराची… ‘ये हृदयीचे ते ह्रदयी’ हा प्रवास सुरू झालाय. अशा वेळी संवादकाने स्वत:ची शाब्दिक खुमखुमी गुंडाळून ठेवायची. त्या अवकाशाचा भाग बनायचे. बोलणाऱ्यासहित जसे जायचे तसे श्रोत्यांच्या समूहात मनाचा सतत कानोसा घेणं महत्त्वाचे आहे.
संवादासाठीचा उपलब्ध समय दुपेडी असतो. एक आहे घड्याळातली वेळ. दुसरी आहे भावनिक वेळ. रंगलेला संवाद पटकन ‘संपला’ असं वाटलं. लय रेंगाळली की कंटाळा येतो. संवादकाला समोरच्या श्रोत्यांसोबत सतत सहवास आणि शब्दांविना संवाद साधायचा असतो. व्यासपीठावरच्या प्रकाशयोजनेमुळे कधी कधी सभागृह म्हणजे धूसर आकृत्या बनतात. पण ते छानच. कारण त्यांचे श्वास, त्यांचे हुंकार, त्यांची दाद, त्यांची चुळबुळ हे सारं मला जाणीवपूर्वक अनुभवायचं असतं. संवादकाची नजर चार पैलूंवर एकाच वेळी असायला हवी. सतारीच्या तारांवरून बोटे फिरतात त्या सहजतेने…पहिले दोन पैलू आपण पाहिले. संवादक-वक्ता, संवादक-श्रोता!
तिसरा पैलू आहे संवादकाचा स्वत:च्या भावना-विचारांसोबत चाललेला प्रवास. आणि चौथा भाग सगळ्यात महत्त्वाचा… प्रत्यक्ष संवादाचा प्रवाह. ही प्रक्रिया जरी आम्हा सर्वांपासून जन्म घेत असली तरी ती ‘स्वयंभू’ होऊ लागते. संवादक म्हणून मला पुढचे वाक्य, तरंगताना दिसू लागते. संवाद हा अर्थपूर्ण, लयबद्ध, गतिशील झाला की तो सुसंवाद. म्हणून संवादकाने स्वत:ला इतर तीन पैलूंमध्ये विरघळून टाकायचे. आपली हुशारी, हुकमत इत्यादी गोष्टी विरून जायला हव्यात. आपण फक्त ‘क्षपणक’ मध्यस्थ अर्थात कॅटेलिस्ट.
अभिनेता भरत जाधवशी संवाद साधत होतो. आम्हा दोघांसमोर होता आमच्या ओळखीचा चार दशकांचा प्रवास. दोन जुने मित्र भेटताहेत. एकाला दुसऱ्याच्या वाटचालीबद्दल अपार कुतूहल आहे. आणि दुसरा स्वत:चं जगणं ‘शेयर’ करतोय मित्रासोबत. मला संवादाचा गाभा मिळाला. आता त्यात स्वत:ला अलगद सोडायचं फक्त. आम्ही दोघांनी तो तासभर यथेच्छ ‘एन्जॉय’ केला. आणि त्यामुळेच श्रोत्यांनीही.
कधी कधी पाहुण्यांकडून (फॅकल्टी) नवी माहिती आणि वेगळा दृष्टिकोन अपेक्षित असतो. आहारतज्ञ ऋजुता दिवेकर असोत किंवा सैन्यदल अधिकारी मोहिनी गर्गे-कुलकर्णी असोत. अशा वेळी संवादक म्हणून माझे कुतूहल श्रोत्यांनाही उत्सुक बनवणारं हवं. अशा संवादाचा प्रवाह आधी झालेल्या चर्चेमध्ये मी पाहुण्यांसोबत बोललेलो असतो. म्हणजे पाहुणे काय बोलणार हे मला ठाऊक असतं. अशा वेळी मी, त्या-त्या क्षणाच्या नवीनपणाला महत्त्व देतो. त्या व्यक्तीचा अभ्यास करताना आपण ते ऐकलं-पाहिलं ते ‘त्या’ वेळचं होतं. आत्ताचा क्षण अगदी ताजा आहे. काय आणि कसं सांगणं होईल आताचं?… मन मस्त टवकारून सज्ज होतं. याचा फायदा असा होतो की वक्त्यांनासुद्धा एक मोकळीक मिळते. साधारणपणे ७० टक्के नियोजनपूर्ण अभ्यास आणि मन:चक्षूंसमोरची तालीम. पण ३० टक्के ठेवायचे ते त्या-त्या क्षणांसाठी. नियोजित आणि उत्स्फूर्त ही हळूहळू टक्केवारी राहात नाही. एकमेकांत मिसळतात त्या दोन्ही गोष्टी.
‘वेध’च्या एका सत्रामध्ये आरती अंकलीकर यांच्यासोबत गप्पा होत्या. त्या छान रंगल्या. शेवटी ‘भैरवी’ म्हणावी असं ठरलं होते. ‘मी गाते आणि तू पाठून लय दे आनंददादा’ ती अचानक म्हणाली. म्हणजे एका माईकवर मी ‘अवघा रंग एक झाला’ हे धृपद त्याच लयीत घट्ट धरून ठेवायचं. गायनाच्या ओघात आरती सफाईने स्वरपुष्पे फुलवत होती आणि मी ‘शिस्तबद्ध’पणे हा सुरांचा लहेरा धरून होतो. कठीण होतं, पण निभावलं.
डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहजीवनाबद्दलचा संवाद सुरू होता. गणित म्हणजे बुद्धी. तर्कनिष्ठ विचारांशी सततची सोबत आणि संसार म्हणजे भावनांचा समुद्रच. ‘‘जयंतला कधी कधी त्याची भावना शब्दांच्या चिमटीत पकडून सांगावी लागते.’’ मंगलाताई म्हणाल्या होत्या. ‘‘आणि या भावनिक निष्कर्षाला मी आजवर ‘प्रमेय’ मानत आलो आहे.’’ चेहऱ्यावरचे मिश्कील भाव न लपवता जयंतसर म्हणाले. मंगलाताईंच्या आई, त्या संवादाला हजर होत्या. ‘‘आज तुझ्यामुळे माझा जावई मला नव्याने कळला.’’ त्या हसत हसत मला म्हणाल्या. मोठेच सर्टिफिकेट मिळाले मला.
स्वत: कोणताही अभिनिवेश न धारण करणे हे संवादकाचे महत्त्वाचे कौशल्य आहे. माणूस समजून घ्यायचा तर खोचक आणि भोचक वृत्ती पूर्ण बाजूला ठेवायला हवी. व्यक्तीचा विनाअट, संपूर्ण स्वीकार, हीच एक अट. गौरी सावंत, दिशा शेख, (तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या) बिंदुमाधव खिरे (एलजीबीटीक्यू हक्क कार्यकर्ते) अशा चाकोरीबाहेरची लैंगिकता असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे संवाद हा माझ्यासाठी व्यापकता शिकवणारा अनुभव ठरला. कधी कधी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान वक्त्यांबरोबर संवाद असतो. अशा वेळी त्यांचे शारिरीक वय मी माझ्या जाणिवतेतूनच वजा करतो.
माझ्या वयाचा फायदा घेऊन मी त्यांना एकेरीमध्ये संबोधित करतो खरा, परंतु आमचं नातं असतं ‘काका-पुतण्याचं.’ स्वत:ला ‘पोक्त’ समजण्याच्या मर्यादेपासून माझे हे तरुण मित्र मला नेहमी दूर ठेवतात. भारतीय संविधानासारख्या विषयावर राहीशी (राही श्रुति गणेश) गप्पा मारायच्या होत्या. पत्रकारितेबद्दल पार्थ एम.एन. सोबत, खगोल शास्त्रावर श्वेताशी (कुलकर्णी) तर पर्यावरणाबद्दल प्राचीसोबत (शेवगावकर). नव्या पिढीला नकारात्मक लेबले लावण्यापासून आपण सर्वांनी का दूर राहिले पाहिजे हे मला कळलं आणि वळलं आहे ते या सर्वांमुळे.
भावनिक आरोग्याचे वेगवेगळे आयाम पुढे आणणारे हे संवाद. भावनांच्या काजव्यांनी लगडलेलं संभाषणाचं झाड. निष्फळ निराशा हा परवलीचा शब्द बनतोय की काय असे वाटणाऱ्या कालखंडातील ही प्रकाशाची बेटे. रसरशीत मानवी जगण्यातून शिकूया सुदृढ मन कसं आकार घेतं ते. त्याच वेळी ही सारी ‘माणसे’ आहेत हेसुद्धा लक्षात ठेवायला हवं. जीवनमूल्यांमुळे शब्दांना येणारी प्रामाणिक झळाळी आगळी आणि स्वत:ची प्रतिमा पुढे रेटण्यासाठी केलेली माध्यम अनुनयाची धडपड वेगळी.
कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला ‘सादर’ करणं हे माझं ध्येय नसतं. या मानवग्रंथांकडून जितकं शिकता येईल ते शिकावं हा त्यातला हेतू असतो. आणि हा नैवेद्या समाजमनाच्या चरणी ठेवायचा. पूर्वी सारे संवाद ‘लाइव्ह’ व्हायचे. तिथेच विरून जायचे. गेली काही वर्षं आम्ही त्यावर निगुतीनं चित्रीकरण संस्कार करून त्यांना महाजालावर विराजमान करतो.
संवाद ऐन रंगात येतो तेव्हा काही क्षणांचा पैस अगदी वेगळाच असतो. आश्वासक किरमिजी प्रकाशाचा अनुभव असतो तो. भावार्थ-मथितार्थ एकरूप होऊन वाहात असतात. ती सारी प्रक्रियाच स्वत:ला पुढे नेत असते…
‘साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची…’ हा अनुभव ‘मला’ येतो तेव्हा संवाद संपल्यानंतरची संपृक्त शांतता असते…‘आपुलिया बळे नाही मी बोलत’ हा तुकोबांचा अभंग गुणगुणत मन लागते पुढच्या संवादाच्या तयारीला…
(या लेखामध्ये दिलेले बहुतेक संवाद, ‘ AVAHAN IPH’ या यू-ट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. त्यांची संख्या साडेचारशेच्या घरात आहे. ) anandiph@gmail.com