scorecardresearch

Premium

वळणिबदू: सिंगल, बाय चॉइस!

एखाद्यानं किंवा विशेषत: ‘एखादीनं’ लग्न न करण्यावर व्यक्त होणारी मतं बहुपदरी असतात.

chaturang 6
वळणिबदू: सिंगल, बाय चॉइस!

डॉ. अंजली जोशी

एखाद्यानं किंवा विशेषत: ‘एखादीनं’ लग्न न करण्यावर व्यक्त होणारी मतं बहुपदरी असतात. ‘बिचारीचं लग्न कसं नाही हो जुळलं!’ किंवा ‘अतिचिकित्सक असल्यामुळे, नाही तर हिच्यात काही तरी खोट असल्यामुळे हिला कुणी पसंत केली नसणार!’पासून ‘लेस्बियन असावी’ किंवा ‘ही कायम ‘उपलब्ध’ असणार!’ इथपर्यंतची टोकाची मतं एकल मुलींच्या कानावर पडत असतात;

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

पण लग्न न करण्याचा निर्णय तिनं पूर्ण विचारांती घेतला असेल तर? ‘मैं और मेरी तनहाई’ मनापासून आवडणाऱ्या अशांना आपण समजून घेऊ शकू का?..
‘‘गार्गी, बाबांचं बीपी एकदम वाढलंय. आताच ॲडमिट केलंय.’’ आईचा फोन आला तेव्हा मी ऑफिसमध्ये होते. मी सहकाऱ्यांना भराभर सूचना दिल्या. घरी येऊन बॅग भरली आणि मिळेल त्या फ्लाइटनं आईबाबांकडे निघाले. थेट हॉस्पिटलमध्येच पोहोचले. बाबांना बघून जीव भांडय़ात पडला.
‘‘डॉक्टर म्हणाले, वेळेवर आणलंत. नाही तर स्ट्रोक किंवा हार्ट ॲटॅकचा धोका असतो. आता फक्त देखरेखीसाठी ठेवतील. डिस्चार्जही लवकर मिळेल.’’ आई सुस्कारा सोडत म्हणाली.
पुढचे दोन-तीन दिवस धावपळीत गेले. बाबा सुखरूप घरी आले आणि माझी परतण्याची तयारी सुरू झाली. आदल्या रात्री आईशी बोलत बसले. आल्यापासून आता कुठे चार घटका निवांत मिळाल्या होत्या.

‘‘असं कसं वाढलं एकदम बीपी?’’ मी विचारलं.
‘‘काही कळलंच नाही. सगळं सुरळीत चालू होतं. डॉक्टर म्हणतात स्ट्रेस असणार.’’ आई म्हणाली.
‘‘बाबांना कसला स्ट्रेस? पराग अमेरिकेत सेटल झालाय. माझंही छान चाललंय.’’ मी म्हटलं. बोलताना वाटलं, की बाबांचा स्ट्रेस माझ्या लग्न न करण्याशी जोडला जाऊ नये म्हणजे मिळवलं!
पण नेमकं तेच झालं. आई म्हणालीच, ‘‘अगं, वरवर तर सगळं छान आहे; पण तुझा लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी मनाला लावून घेतलाय. त्याचे परिणाम कुठे ना कुठे तरी होतातच ना!’’
‘‘आपण अनेकदा यावर बोललो आहोत. आता परत तीच चर्चा नको.’’ मी विषय संपवण्यासाठी म्हटलं.
‘‘शेवटी आईवडिलांचं हृदय आहे. आम्हाला जे वाटतं ते सांगणारच ना? तुला वाटतं तसं लग्न झालं, की आमची जबाबदारी संपली म्हणून नाही सांगत! तुझ्यासाठीच सांगते. संसारसुख वेगळं असतं. आम्ही जे अनुभवलंय ते आपल्या मुलीला अनुभवता येत नाही, याचं वाईट वाटतं. इतरांच्या मुलींच्या लग्नाला गेलो की आणखीनच वाईट वाटतं.’’ आईचे डोळे पाणावले.

‘‘पण तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्यात मला नाही ना वाटत आनंद! आतूनच वाटत नाही लग्न करावंसं.’’
‘‘तेच तर विचारतो ना आम्ही.. का नाही करायचं लग्न? आतापर्यंत एकदा तरी नीट पटेल असं उत्तर दिलं आहेस का? मग आमच्याही मनात अनेक शंकाकुशंका येत राहतात. कितीदा विचारून झालंय, की प्रेमभंग झालाय का? लग्नाची भीती वाटतेय का? पुरुषद्वेष वाटतोय का? काही वाईट अनुभव आलेत का?..’’ आई म्हणाली.
‘‘म्हणजे काही समस्या असली तरच लग्न न करण्याचा निर्णय घेतात का? जोपर्यंत लग्न न करणं म्हणजे समस्या आहे, हा समज तुमच्या मनात कायम आहे, तोपर्यंत तुम्हाला पटेल असं कुठलंही कारण मी देऊ शकणार नाही.’’ मी तिथून उठत म्हणाले.
परतीच्या प्रवासात सगळं आठवायला लागलं. ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ कोर्स झाल्यानंतर नोकरी लागली, तेव्हा आईबाबांनी लग्नाचा विषय पहिल्यांदा काढला. माझी नोकरी माझी पॅशन आहे. लोकांशी प्रत्यक्ष भेटणं-बोलणं आवडतं. सतत वेगवेगळय़ा ठिकाणी फिरावं लागतं. नोकरीसारख्या ठरावीक वेळा नसतात. कधीही उठून कुठेही जायला लागतं, शिफ्ट्स कराव्या लागतात. हे सगळं मला गमवायचं नाही. संसाराची जबाबदारी म्हणजे मोठी कमिटमेंट आहे. ती मी निभावू शकेन असं मला वाटत नाही, हे मी स्पष्टपणे आईबाबांना सांगितलं होतं. तरी आईबाबाबांनी लग्नाचा पिच्छा सोडला नाही. ‘‘अगं, किती तरी लोक थेट तुझ्यासारखंच काम करतात. ते काय अविवाहित राहतात?’’
‘‘त्यांना वाटत असेल गरज लग्नाची! मला नाही वाटत. प्रत्येकाच्या गरजा वेगळय़ा असतात.’’

आई मग हलकेच म्हणाली, ‘‘शारीरिक गरज तर असतेच ना? तिचं काय?’’
मला मनातल्या मनात हसू आलं. शारीरिक गरजेसाठी लग्न करायचं, या समजुतीला आईबाबा अजूनही कवटाळून बसलेत. आमची पिढी याबाबत तर कधीच पुढे गेलीय! माझेही आतापर्यंत दोन-तीन प्रेमसंबंध होऊन गेलेत. पुढेही होतील. पुरुष-सहवास मला नवीन नाही; पण त्याला लग्नाचं कोंदण कशाला? लग्न ही मुख्यत: सामाजिक गरज आहे. सामाजिक मान्यता आणि सुरक्षितता ही तिची मुख्य उद्दिष्टं आहेत. ज्यांना ती महत्त्वाची वाटत असतील त्यांनी खुशाल लग्न करावं; पण माझ्यात त्या गरजा मुळातच कमी आहेत. त्यापेक्षा मला माझं स्वातंत्र्य जास्त प्रिय आहे. त्यावर बंधन आलेलं मला मानवणारं नाही. आयुष्यभर एकत्र राहणं मला एक्सायटिंग वाटत नाही. अर्थात हे सगळं आईबाबांना समजावून सांगणं कठीण आहे. लग्न हीच आयुष्याची इतिकर्तव्यता, असं मानणाऱ्या लग्नाळू समाजाचे ते एक प्रतिनिधी आहेत ना!

ते आपलं एकच पालुपद लावतात. ‘‘लग्न करूनही स्वातंत्र्य जोपासता येतं की!’’ म्हणजे हत्तीला साखळी बांधून सांगायचं, की साखळी पोहोचेल तितक्या जागेत फिरण्याचं तुला स्वातंत्र्य आहे. मुळात आपली लग्नसंस्था ही पुरुषप्रधान. लग्नात तडजोड महत्त्वाची असली तरी त्या तडजोडीचा जास्तीत जास्त वाटा स्त्रियाच उचलतात, हे इतकं ठळकपणे दिसतं आजूबाजूला. मी इतक्या ठिकाणी फिरते, बायकांशी बोलते, तिथेही हेच चित्र.
लग्नाची भलामण करणाऱ्या आईनंही लग्नासाठी किती तडजोडी केल्यात! आईच्या बँकेतल्या नोकरीत किती वेळा प्रमोशनच्या संधी आल्या; पण बाहेरगावी बदली होईल, म्हणून प्रत्येक वेळी तिनं त्या नाकारल्या. पूर्वी मी आणि भाऊ- पराग लहान होतो म्हणून, मग आमची शिक्षणं चालली होती म्हणून आणि आता बाबा एकटे पडतील म्हणून! आईला विचारावंसं वाटतं, की संसाराची जबाबदारी नसती तर आपल्या गुणवत्तेला न्याय मिळाला असता, वर्षांनुवर्ष एकाच पदावर काम करावं लागलं नसतं, हा विचार तुझ्या मनाला कधीच शिवला नाही? आणि बाबांनी का केली नाही कधी तडजोड? संसाराची जबाबदारी त्यांच्यावरही होती ना? पण आईला हे प्रश्न कधी पडत नाहीत किंवा तिनंही इतर बायकांसारखं लग्नातल्या आपल्या दुय्यम स्थानाला मुकाटपणे मान डोलावली असावी.

मी माझ्या अनेक मैत्रिणी बघते. लग्न टिकवण्याचं इतकं जबरदस्त दडपण असतं, की मग वाट्टेल त्या तडजोडी करत त्या ते टिकवून तरी ठेवतात आणि ज्या त्यातून बाहेर पडायचं ठरवतात, त्यांची प्रचंड ससेहोलपट होते. मला यातलं एकही करायचं नाही; पण आईबाबा त्यांची खिंड लढवतच असतात. ‘‘आता लग्नाला नाही म्हणतेस; पण पुढे जाऊन करावंसं वाटलं, की चांगले मुलगे शिल्लक कुठे राहणार? मग भलत्या तडजोडी करत बसायचं! वय वाढलं की मुलं होण्यातही समस्या येतीलच ना..’’
सगळय़ा मुलींना आई होण्याची हौस नसते आणि त्यात सामाजिक संस्कारांचा मोठा वाटा असतो, हे सांगितलं, तर आईबाबांच्या पचनी पडणार नाही. वंशपरंपरा पुढे नेणं, याच पारंपरिक दृष्टिकोनातून ते पाहतात. एकदा आईनं बिचकत बिचकत हेही विचारलं होतं, ‘‘गार्गी, लग्न न करण्यामागे तसलं काही नाही ना? म्हणजे लेस्बियन वगैरे?’’ मग मी सुनावलं, ‘‘हे बघ, मी स्ट्रेट आहे; पण समजा, मी लेस्बियन असते, तरी त्यात काही समस्या आहे, असं नाही वाटत मला!’’

मी माझं एकटेपण एंजॉय करते. स्वत:त रमणं मला आवडतं. सगळे निर्णय एकटीनं घेते. कुणाची ढवळाढवळ नाही, शेरेबाजी नाही. अधूनमधून सोलो ट्रिप्स करते. मी हे का करते, याचा जाब विचारणारं कुणी नाही. मला किती मोकळं वाटतं! कुणाच्या तरी सोबतीवर अवलंबून राहणं ही इतरांची गरज असेल, माझी नाही. पुस्तक वाचायला, सिनेमा पाहायला, फोटो काढायला सोबतीची गरज लागतेच असं नाही. बाहेरच्या जगात किंवा कामाच्या ठिकाणी वावरताना, अनिर्बंध स्वातंत्र्य मिळत नाही, हे मला माहीत आहे; पण स्वत:च्या जगात असताना तरी मनपसंत स्वातंत्र्य मी मनमुराद उपभोगते.
पण अविवाहित राहणं म्हणजे दु:खी असणं, ही समजूत आईबाबांच्या डोक्यात दृढ आहे. मी एकटं राहूनही आनंदी राहू शकते, हे त्यांना मान्यच होत नाही. ते सांगत राहतात, ‘‘आता चांगलं वाटतंय; पण वय वाढल्यावर एकटं वाटेल, त्याचं काय?’’ मीपण वाद घालते. ‘‘लग्न केलं तरी जोडीदाराची साथ कधी तरी संपतेच ना? मग त्या टप्प्यावर तरी एकटं राहणं भाग आहे ना? उलट मी आतापासूनच स्वत:ला तयार केलंय.’’ त्यावर ते म्हणतात, ‘‘पण एकटेपणाचं काय?’’ एकटं राहणाऱ्या माणसाला एकटेपणा येतो, हाही एक गैरसमज आहे. एकटं राहणं आणि एकटेपणा वाटणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. एकटं राहूनही मनुष्य जोडलेला राहू शकतो आणि माणसांच्या गराडय़ात राहूनही मनुष्याला एकटेपणा येऊ शकतो. अर्थात हे निभावून नेणं सोपं नाही, याची जाणीव आहे मला. इतरांना वाटतं, की हिचं लग्न झालं नाही म्हणजे ही अतिचिकित्सा करत असणार, नाही तर हिच्या अवास्तव अपेक्षा असणार.. किंवा लग्नाच्या बाजारात हिला मागणी नसणार किंवा ही सतत जोडीदार गटवण्याच्या मागे असणार, नाही तर कायम ‘उपलब्ध’ तरी असणार! किती जणांना सांगत बसणार, की अविवाहित राहणं हा माझा चॉइस आहे.

कामाच्या ठिकाणीही अतिरिक्त कामं माझ्याच गळय़ात पडतात. इतरांना वाटतं की, ‘एकटीच तर असते! हिला काय काम असतं?’ एकटय़ा माणसाला काम कमी असतं, हा आणखी एक गैरसमज. उलट कामं विभागून न्यायला कुणी नसतं, त्यामुळे कामाची जास्त जबाबदारी असते; पण किती जणांचे गैरसमज दूर करणार? एकटं राहणाऱ्यांची ‘स्वार्थी’, ‘फक्त स्वत:पुरतं पाहणारे’ अशी संभावना केली जाते; पण आता बाबांना बरं नव्हतं तर कोण धावून गेलं? पराग नाहीच ना येऊ शकला अमेरिकेतून? पण आईबाबा त्याबद्दल बोलणार नाहीत किंवा मी करिअरमध्ये एवढी प्रगती करतेय, त्याचं कौतुक करणार नाही. माझं चांगलं-वाईटपण मोजलं जातं ते लग्न करण्या-न करण्यावरून!

..घरी परतले तोवर अंधार दाटून आला होता. मी घराकडे एकवार नजर टाकली. हे माझं जग आहे, मी उभारलेलं. हा अख्खा पलंग माझा आहे. त्याच्या दोन्ही बाजू माझ्याच. झोपताना घोरणं सहन करावं लागत नाही. टीव्हीचा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात आहे. कुठलं चॅनल बघायचं यावरून वादावादी नाही. बाथरूममधून लवकर बाहेर ये, म्हणून आदळआपट होत नाही.. ही यादी वाढतच चालली आहे. एकदा तरी हे सुख सर्वानी अनुभवलंच पाहिजे! मग ते ‘शेअर’ करण्यासाठी मी सोशल मीडिया उघडून भराभर टाइप करायला सुरुवात केली- ‘# सिंगल,बाय चॉइस’.

anjaleejoshi@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chaturang articles about marriage single by choice author anjali joshi amy

First published on: 03-06-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×