‘संघर्षमग्न’ नायक किंवा नायिका नेहमी गरीब, निष्पाप, भोळ्याभाबड्या आणि खलनायक मात्र कायम श्रीमंत, रागीट, सतत कटकारस्थान रचणारे…, असं काहीसं चित्र असणाऱ्या ‘लोकप्रिय’ डेली सोप नेमकं काय सांगू पाहतात? संघर्षाचा नेमका अर्थ यांना कळलेला आहे का? की आपण कुठल्याही गोष्टीला ‘संघर्ष’ म्हणू लागलो आहोत? माणूस जातीच्या प्रगतीचे लढे त्यांना कळलेच नाहीत का?
एक दैनंदिन मालिका असते, तिच्यात एक नायिका असते. नायिका सत्यवचनी, निष्पाप, मनमिळाऊ आणि परिस्थितीने गांजलेली असते. नायिकेच्या आयुष्यात रोज, म्हणजे अक्षरश: रोज एक नवीन संकट येतं, पण नायिका ‘नायिका’ असते त्यामुळे ती खचून जात नाही. तीव्र संघर्ष करते. आणि त्यातून मार्ग काढते. तोच दुसरं संकट येतं. संघर्ष सुरू राहतो…
याच मालिकेत नायिकेचे वडील असतात, त्यांनी त्यांच्या लहानपणापासून अतोनात संघर्ष केलेला असतो. नायिकेच्या आईलाही पुढे नवरा गेल्यावर संघर्ष करावा लागतो. तिचे भाऊबहीणसुद्धा विविध पातळ्यांवर सतत ‘संघर्षमग्न’ असतात. नायक श्रीमंत असतो. आणि त्यामुळे अर्थातच मालिकेत त्याचं कुटुंबं वाईट्ट असतं. हीच गोष्ट उलट असेल तर नायक आणि त्याच्या घरची मंडळी सतत परिस्थितीशी संघर्ष करत असतात. आणि नायिकेच्या घरची श्रीमंत माणसं ऐतखाऊ आणि खलप्रवृत्तीची असतात. काहीही झालं तरी गुणी माणसं पैशाने आणि स्वभावानेही गरीब असतात आणि अवगुणी माणसं श्रीमंत असतात हे ठरलेलं असतं. नीतीमूल्य गरीब माणसं जपतात, माणुसकी, सहवेदना, सत्याची चाडही त्यांनाच असते. श्रीमंतांना यातलं काहीही नसतं. ते फक्त भारी भारी कपडे घालतात आणि हाताखालच्या माणसांवर डाफरतात. गरीब सुखात असतात, श्रीमंत कायम चिडलेले असतात. थोडक्यात काय, पैसा माणसाला सुख देऊ शकत नाही. विचार उत्तम आहे, योग्य आहे. पण नायिकेला घरातल्या सगळ्यांचे कपडे धुवावे लागले, किंवा नायकाला खलनायकाची गाडी धुवावी लागली, हेसुद्धा मालिकांमध्ये संकट किंवा संघर्षमय प्रसंग असतात.
जितकी संकटं आणि संघर्ष जास्त तितके मालिकेचे भाग वाढतात. म्हणून मग संघर्ष निर्माण करणाऱ्या व्यक्तिरेखा आणि प्रसंग वाढत जातात. आर्थिक संकट आलं, करा संघर्ष. नात्यात फूट पडली, करा संघर्ष. हे खलनायक किंवा खलनायिका गर्भश्रीमंत असतात, म्हणजेच त्यांच्या वाडवडिलांनीही दुष्टपणा करूनच पैसा जमवलेला असतो. दुसऱ्यांना लुबाडलेलं असतं. पण आपल्याकडे न्याय उशिरा मिळत असल्यामुळे अनेक पिढ्या काहीही संघर्ष न करता लोकांना लुबाडत राहिलेले असतात. एवढा पैसा कमावण्यासाठी याही मंडळींनी घाम गाळला असेल, अमर्याद कष्ट केले असतील, यावर आपण प्रेक्षक म्हणून विश्वासच ठेवायला तयार नसतो. श्रीमंत म्हणजे गुंडगिरीने जमवलेला पैसा आणि गरीब म्हणजे चांगुलपणामुळे अडचणीत आलेला, हे आपण गृहीत धरून टाकलेलं असतं.
मला एकच प्रश्न पडतो, गरिबी, दुबळेपणा, गबाळेपणा, व्यवहारचातुर्य नसणं, या गोष्टींचं उदात्तीकरण प्रेक्षक का बघतात? का त्यांना या व्यक्तिरेखा आपल्या जवळच्या वाटतात? त्या तशा वाटतात म्हणूनच त्या व्यक्तिरेखा आणि मालिका बघितल्या जातात आणि टीआरपी वाढतो वगैरे वगैरे. सतत संघर्षमय आयुष्य जगणारे नायक-नायिका जवळचे वाटताना आपण खरोखरच रोजच्या जगण्यात एवढा संघर्ष करत असतो का? की आता आपण कुठल्याही गोष्टीला ‘संघर्ष’ म्हणू लागलो आहोत?
माझा अजिबात गरिबी, दुबळेपणा किंवा संघर्षावर आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे तो सतत त्याचं भांडवल करण्यावर. मध्यंतरी मी एक मुलाखत ऐकली. मुलाखत घेणारा उत्साही तरुण, त्या दिग्गज व्यक्तीला त्याच्या कामातल्या यशाविषयी विचारत होता आणि तो गडी पुन:पुन्हा त्यानं कशा खूप खस्ता खाल्ल्या आहेत, कसे शून्यातून वर आलो आहोत, कसा सातत्याने आमच्यावर अन्याय झाला तरीही न खचता काम करत राहिलो आहोत, यावरच येत होता. आणि मग माझ्या लक्षात आलं की, समाजमाध्यमांवर सध्या एकूणच ‘संघर्षगाथां’ची चलती आहे. मला हे चित्र जरा गंभीर वाटतंय. अनेक कारणांमुळे.
मुळात आपण ज्याला संघर्ष म्हणतो, तो खरंच असतो का, याचा विचार करायला हवा. कष्ट कुणाला चुकले आहेत! कष्ट केल्याशिवाय काहीच साध्य होत नाही हे तर वैश्विक सत्य आहे. आपण कितीही म्हटलं तरीही कोणत्याही यशामागे फक्त नशीब, केवळ लबाडी, गुंडगिरी आणि दुष्टपणा नसतो. भरपूर कष्ट असतात. शिवाय प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाच्या शर्यतीचा ‘स्टार्टिंग पॉइंट’ वेगळा. टप्पे वेगळे, ध्येयं वेगळी, धडपड वेगळी. जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे धावत असतो. कुणाच्या खांद्यावर मोठं ओझं असतं, कुणाच्या पायात ताकद कमी असते, कुणाला लवकर दम लागतो तर कुणी ‘लंबी रेस का घोडा’ ठरतो. सुटका कुणाचीच नाही, त्यामुळे संघर्ष प्रत्येकच जण करत असतो. कुणीच कुणाचे कष्ट कमी समजण्याची चूक करू नये. बच्चन साहेब एका चित्रपटात म्हणाले तसं ‘तुम्हारा खून… खून, हमारा खून… पानी?’ असं आपण म्हणू शकत नाही. कारण एकाची अंतर्गत लढाई काय असते हे दुसऱ्याला माहीत नसतं. महालात राहण्याची सवय असणाऱ्याला वन रूम किचनमध्ये राहावं लागणं हा संघर्ष वाटू शकतो. त्यामुळे आपला प्रवास खडतर आहे, आपण खूप कष्टातून वर आलो आहोत, आपण जवळ जवळ राखेतले फिनिक्स पक्षी आहोत, असं बहुतेकांना कधी ना कधी तरी वाटलेलंच असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या तरी टप्प्यावर अधिकचे कष्ट, अधिकची मेहनत, वेगळी कौशल्यं शिकण्याची गरज, अपयश, अपमान, अपेक्षाभंग, निराशा हे आलेले असतातच. कठीण प्रसंगांना तोंड द्यावंच लागलेलं असतं. आयुष्यात कायम फक्त सगळं मनासारखंच घडलंय असा एकही माणूस या पृथ्वीवर अस्तित्वात नाही आणि कधीच नव्हता. म्हणूनच आपण काहीतरी जगावेगळा संघर्ष केला आहे असं लोक बोलायला लागले की मला अत्यंत मनापासून कंटाळा येतो. विशेषत: त्यांनी, ज्यांना त्यानंतर का होईना पण यश, पैसा, नाव, किंवा जे काही अपेक्षित होतं, ते मिळालेलं आहे. हा झगडा सोपा आहे असं नाही, पण तो जीवनमरणाचा प्रश्न नाहीये हे नक्की.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, बाबासाहेब आंबेडकर,रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, बाबा आमटे अशा कित्येकांनी केलेला संघर्ष, लक्ष्मण माने यांच्या ‘उपरा’मध्ये दिसतो तो संघर्ष, उर्मिला पवारांच्या ‘आयदान’मध्ये दिसतो तो संघर्ष, हे खरे थेट जगण्याला भिडलेले प्रश्न आहेत. हे माणूस जातीच्या प्रगतीचे लढे आहेत. दृष्टिहीन माणसाने वाचायला शिकणं हा संघर्ष आहे, जन्मत: काहीतरी असाध्य आजार असणाऱ्यांनी, विकलांगांनी स्वत:च्या पायावर उभं राहणं हा संघर्ष आहे. परवा, जीव मुठीत धरून खोल विहिरीत उतरणाऱ्या एका बाईचा व्हिडीओ पाहिला. एक कळशी पाण्यासाठीचा हा संघर्ष होता. दुर्गम भागातल्या शाळेतली मुलं नदी ओलांडताना दप्तर डोक्यावर घेऊन जातात, कारण कपडे भिजले तर चालतील पण पुस्तकं नको भिजायला, हा संघर्ष आहे. आमच्या घराच्या गल्लीत एक ८० वर्षांचे आजोबा सकाळी आणि संध्याकाळी किटलीत थोडा चहा घेऊन येतात आणि पाच पाच रुपयांना आजूबाजूच्या सोसायटीतल्या रखवालदारांना विकतात, हा जगण्यासाठीचा संघर्ष आहे. संघर्ष कुणाचा… ज्यांना जगत राहण्यासाठी, सत्यासाठी, न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावं लागलं त्यांचा. छोट्या अडथळ्यांना संघर्षाचं स्वरूप देऊन त्यांना प्रचंड मोठं करण्याचा हा दैनंदिन मालिकांचा कारभार पडद्यावरच ठीक असतो. प्रत्यक्षात नाही. प्रत्यक्षात याहून फार भयानक परिस्थितीतून मार्ग काढत वर आलेली माणसं असतात. कुठेतरी याचा परिणाम मुलांच्या, तरुणांच्या मानसिकतेवर होत असावा. नाहीतर ‘ताण सहन होत नाही’ म्हणून आयुष्य संपवल्याच्या घटना एवढ्या वाढल्या नसत्या.
पुन्हा एकदा आपले आदर्श काय, यावर आपली संघर्षाची व्याख्या ठरते. कुणीतरी एक नटी शूटिंगला जाताना गाडीतून मध्येच उतरून जिन्याच्या दहा पायऱ्या चढत गेली, याचं आपण कौतुक करतो, की कुटुंबाला हातभार म्हणून लहान वयात वर्तमानपत्रं विकणाऱ्या, भारताचे अकरावे राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांचं ‘इग्नायटेड माइंड’ वाचून, आणि वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं ‘एक होता कार्व्हर’ वाचून आपण भारावले जातो? शेवटी कष्ट न करताच जगायचं असेल तर मग आयुष्य निवांत आहेच. काहीतरी मिळवायचं असेल, कमवायचं असेल, तर कष्ट करावेच लागणार आहेत. मन मारावं लागणार आहे, स्वत:वर बंधनं घालावी लागतील, प्रसंगी मोह आवरावे लागतील, लक्ष्य ठरवावं लागेल, चित्त विचलित होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील, अडथळे येतील, मानसिक दडपण येईल, शारीरिक थकवा येईल, पण मग जे मिळेल ते सुंदरही असेल. त्यातून झालेली उन्नती फक्त आपली असेल. काही गोष्टी या अनुभवातूनच शिकता येतात. बघून ऐकून स्फूर्ती मिळते, प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव नाही.
हल्ली प्रत्येक ‘रीयालिटी शो’मध्ये प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्याची कहाणी दाखवण्याचा प्रघात पडून गेलाय. जेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली, तेव्हा उत्तम कलाकार कुठे आणि कशा परिस्थितीत आपली कला जोपासतात, किती प्रतिकूल वातावरणातून जिद्दीनं पुढे येतात हे दाखवणं हा हेतू होता. त्यानंतर मात्र प्रत्येक स्पर्धक हा एक ‘संघर्षकथा’ झाला. एक वेळ कला सादर करायला वेळ कमी पडला, तरी चालेल पण काळजाला हात घालणारी गोष्ट दाखवलीच पाहिजे याची चुरस लागली. प्रश्न असा पडतो की आर्थिकदृष्ट्या सक्षम, उच्चशिक्षित घरांमध्ये चांगले कलाकार नसतातच का? का केवळ त्यांच्या ‘स्टोऱ्या’ होऊ शकत नाहीत म्हणून त्यांना दाखवलं जात नाही?
संघर्ष महत्त्वाचा नाही का तर नक्कीच आहे. पण तो कुणी, कुठे, कुठल्या काळात, कशासाठी आणि कोणत्या स्वरूपाचा केला हेही सापेक्षपणे बघता यायला हवं. नाहीतर कुणीही कुठेही संघर्ष केला म्हटलं की भावनिक होऊन कढ काढण्यामुळे आपलीच दृष्टी धुरकट होते. तुम्ही-आम्ही जे करतो ते आपापल्या जगण्याच्या प्रवासातले छोटे छोटे मैलाचे दगड आहेत. दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवायचा कंटाळा आला की स्वत:साठीही जरूर वाजवाव्या पण आपले संघर्ष छोटे आहेत, याचं भान असावं असं अलीकडे फार वाटायला लागलं आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो.
उद्या पुढच्या पिढ्यांना आपल्या तुलनेनं सुखवस्तू आयुष्यातली रडगाणी हेच प्रचंड संघर्ष वाटायला लागतील आणि खऱ्या पराक्रमाच्या कथा त्यांच्यापर्यंत पोहचणारच नाहीत, यांची भीती वाटायला लागली आहे, अर्थात तसं होणार नाही याची खात्री आहेच.