एकदा का नोकरीतून निवृत्ती घेतली की हातात वेळच वेळ उरतो… कसा घालवायचा तो वेळ? निवृत्ती ही विरक्ती न मानता ती प्रवृत्ती मानली तर खूप काही करता येऊ शकतं.

‘निवृत्त मी झालो, पण निवांत ती झाली’ अशी सुरुवात असलेली, वास्तव असं असायला हवं असं सांगणारी एक गोड कविता नुकतीच वाचनात आली. प्रयत्न करूनही कवी कोण ते समजू शकलं नाही, मात्र या कवितेत अनेकांच्या भावकथा-व्यथा व्यक्त झाल्यात असं वाटलं. निवृत्तीनंतर त्याचं घरी राहणं सक्तीचं झालंय आणि ती काही कामं हक्काने त्याच्यावर सोपवून रोजच्या धावपळीतून स्वत:ला निवांत करत गेलीय… अशी ती कविता. सगळ्यांच्या घरी अर्थातच अशी परिस्थिती नसेल, उलट निवृत्तीनंतर नवरा पूर्णवेळ घरी राहिल्याने अनेकींचं आयुष्य निवांत होण्याऐवजी अशांतसुद्धा झालेलं असू शकतं. पण समंजसपणा यातच आहे की दोघांसाठी ती निवृत्ती आनंददायी ठरायला हवी, मग ती त्याची निवृत्ती असो वा तिची.

फार वर्षांपूर्वी अशोक पाटोळे यांचं ‘आई रिटायर होतेय’ हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. भक्ती बर्वे यांनी रंगवलेली आई आजही मनामध्ये ठाण मांडून आहे. नवरा निवृत्त होतो आणि मी आता काहीही करणार नाही असं जाहीर करत आरामात आयुष्य घालवू लागतो. पण घरातल्या तिला मात्र ‘सकाळपासून तेच ते’ म्हणत कोणत्याच गोष्टीपासून मुक्तता नाही. त्यावर ‘मला निवृत्ती हवी आहे’ असं ठामपणे म्हणण्यासाठी लागणारं धैर्य असणारी ती आताच्या काळातली स्त्री आहे. बाईला घरातून निवृत्त होता येतच नाही, ती कायम घरातच अडकलेली असणार, मग ती नोकरी करणारी असो वा पूर्णवेळ गृहिणी, या गृहीतकाला छेद देणं बाईला जमलंय का? जमणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.

खरं तर आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रमाचा उल्लेख आहेच. त्याचा आताच्या काळात कसा अर्थ लावायचा हे प्रत्येकानं ठरवायला हवंय. मात्र नोकरीतली निवृत्ती म्हणजे आयुष्यातल्या महत्त्वाच्या, परंतु फक्त एका व्यवधानातून मोकळीक असते, त्यामुळे अनेक गोष्टींना पूर्णविराम मिळत असला तरी तो मिळणार आहे याची कल्पना आपल्याला आधीच असते, परंतु जगण्यातली निवृत्ती मिळवायची तर कशाकशाला स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायला हवा, याचं येणारं नेमकं भान मनाला परिपक्व करणारं असतं आणि त्यातून येणारं समाधान मनातल्या वानप्रस्थाश्रमाकडे आपसूक घेऊन जातं. आज आयुष्याची वयोमर्यादा खूप वाढलीय, पूर्वी ‘साठी’ ही वृद्धत्वाची सीमा मानली जायची. त्याच्या पलीकडे माणूस गेला की तो वृद्धच. परंतु आजकाल साठीच्या पुरुषाला ना कुणी आजोबा म्हणणार, ना बाईला आजी म्हणणार, इतका बदल वाढत्या जीवनशैलीमुळे नक्कीच झाला आहे, मग जर शरीराला वृद्धत्व येणार नसेल तर मनही ताजतवानंच असायला हवं. साठीपर्यंत आयुष्य जगलेला माणूस खूप काही अनुभव गाठीशी राखून असतो. अनेक उलथापालथीतून गेलेला असतो, काहींचं आयुष्य तर वेगवान रोलर कोस्टरसारखं वरती-खाली, आडवं-तिडवं होऊन हळूहळू स्थिर होत आलेलं असतं. अशा वेळी अनेकदा माणसं दु:खीकष्टी झालेली दिसतात. एक तर त्या कटू, वाईट अनुभवांना छातीशी कुरवाळून दु:खाचे कढ काढत बसतात किंवा मग आपल्यावरच्या अन्यायाला दुसऱ्या कुणा व्यक्तीला किंवा त्या त्या प्रसंगांना जबाबदार ठरवतात. यातून तात्पुरतं समाधान मिळेलही, पण ते कायमस्वरूपी असेल का? खरं तर अशा वेळी वयही जगण्याशी संघर्ष करत राहायला नाखूश असतं. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ ही विरक्तीची भावना मनाला वेढायला लागते.

इंग्रजीतील ‘हिलिंग’विषयक साहित्यात अनेकांनी आयुष्यातल्या कटू घटनांना ‘लेट गो’ करता आलं पाहिजे, हे सांगितलेलं आपण ऐकलेलं असतं. पण म्हणजे काय हे अनेकदा कळत नसतं. अनेक जणांचं बोलणं ऐकल्यावर, बरंच काही वाचल्यावर जे संचित हाती आलं त्यातून सांगायचं झालं तर मन:शांतीसाठी, आधी मन स्थिर करायचं. मनाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या घटनेला समोर घेऊन बसायचं. आपण नेमकं कशामुळे दुखावलो गेलोय हे शोधायचं. त्यात आपल्याला काही जबाबदारी घेता येत असेल तर घ्यायची, स्वत:ला माफ करायची गरज असेल तर ते करायचं. दुसरी एखादी व्यक्ती त्याला कारणीभूत असेल तर तिच्या नजरेतून त्या घटनेचा विचार करून पाहायचं. त्या व्यक्तीशी बोलता येईल असं वाटत असेल तर ताबडतोब बोलून मोकळं व्हावं. त्याने गैरसमज दूर होतात. (ते अनेकदा गैरसमजच असतात.) नसेल बोलायचं तर त्या व्यक्तीला माफ करून टाकायचं. पुढचं संपूर्ण आयुष्य दावणीला लावण्याइतकी ती घटना, ती व्यक्ती मोठी नाही हे मनाला ठामपणे सांगायचं आणि झालं-गेलं सारं सरळ मनाच्या गंगेत विसर्जित करायचं.

आयुष्य सुंदर आहेच, ते जगायचं. छोटे-मोठे कटू प्रसंग आपल्या आनंदापेक्षा मोठे करायचे नाहीत, ते सोडून द्यायचे, छान हसायचं… आणि नवा डाव खेळायला सुरुवात करायची, वयाच्या साठीनंतरची सेकंड इनिंग खेळायचीच, सोडून नाही द्यायची मोबाइल फोन आणि टीव्ही बघत.

काय करता येईल त्यासाठी? शोधलं तर खूप पर्याय समोरच दिसतील. सत्तरीच्या मधुराताईंना बागकामाची हौस. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांच्या गच्चीवरच्या बागेत मोगरा, जाई, जुईला बहर येतो. त्यांना कुरवाळताना, त्यांचा सुगंध मन भरून घेताना त्यांना जणू समाधीच लागते. हलक्या हाताने त्या या फुलांना टिपतात. दोन-चार ओंजळी भरून आलेली फुलं त्या बाजूलाच असलेल्या नाना-नानी पार्कमधल्या कुणा एकट्याने बसलेल्या त्याच्या किंवा तिच्या ओंजळीत टाकत जातात. त्यांना त्यासाठी ना ओळख लागते, ना काही. पण या कृत्याने त्यांना आता सारे जण ओळखू लागले आहेत. त्याही दोन मिनिटं थांबून सर्वांशी गप्पा मारतात. आणि दिवसभरासाठी लागणारा ऊर्जेचा दरवळ मनात साठवून घेतात. काही दिवसांपूर्वी ‘मॉर्निंग वॉक’ला सुवर्णा आन्टी भेटल्या. सगळ्यांच्या त्या आन्टीच. ७२ वर्षांच्या. एकदम सडसडीत, काटक आन्टी ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्ट घालून रोज बॅडमिंटन खेळायला मैदानात येतात. त्यांच्या बरोबरीच्या लोकांबरोबर तर त्या खेळतातच, पण अगदी तरुण मुलांबरोबरही मस्त मजेत खेळतात. त्यांचं सारं आयुष्य मुलांना शिकवण्यात गेलं. तो त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा अमोघ ठेवा. अलीकडेच त्यांना त्यांच्या शाळेतून बोलावणं आलं. सुट्टीत मुलांसाठी कुठलासा कार्यक्रम ठरवला होता. त्यासाठी त्यांना मार्गदर्शक आणि निरीक्षक म्हणून येणार का, विचारत होते. ‘हॅपी गो लकी’ असणाऱ्या आन्टींना नाही म्हणायचं कारणच नव्हतं. त्यात भर म्हणजे त्यासाठी अनपेक्षितपणे मानधन मिळणारे दिवसाला सात हजार रुपये… ‘लव्ह यू जिंदगी…’हेच गुणगुणलं असणार त्यांनी त्या वेळी. अर्थात ते मिळाले नसते तरीही त्यांनी ते काम सोडलं नसतंच. खूप खूश वाटल्या. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचं कृतार्थपण नजरेत भरलं. कुणाचंच आयुष्य सरळ, सोपं, सुरळीत नसतंच. पण त्या प्रवाहावरच स्वार होऊन पुढे जायचं असतं, सुवर्णा आन्टींना ते फार लवकर कळलं असावं.

अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांत ‘कम्युनिटी सर्व्हिस’ किंवा स्वयंसेवा हा बहुतांश लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्या छोट्याशा कृतीमुळे कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येणं किती सुंदर आहे ना. तिथं अशी सेवा देणं कर्तव्याचा भाग वा जबाबदारी मानली जाते. तुम्ही स्वतंत्रपणे, एकट्याने करा, मित्रमैत्रिणी एकत्र येऊन करा किंवा गटाने एकत्र काम करा. स्वेच्छेने अनेक गोष्टी करू शकता. फक्त स्वत:ची शारीरिक, आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन करा, मग ते मुलांना शिकवणं असो की समर कॅम्पसारखे उपक्रम असोत. झाडं लावणं असो वा समुद्रकिनारा- बाग साफ करणं असो, कुणा गरिबांना जेवण देणं असो, आजाऱ्यांची सोबत करणं असो, आरोग्य शिबिरं आयोजित करणं असो वा मातीकाम, चित्रकला-शिल्पकला शिकवणं,शिकणं असो, छंद हवेतच. त्याचं महत्त्व जाणवलं तर आताही नवीन आवड शोधणं शक्य असतं. असं काम दुसऱ्यांसाठी असलं तरी समाधान मिळतं ते आपल्याला.

तीच ऊर्जा मग आयुष्याला पुरून उरते. तुमच्या आयुष्यात आहे असा ऊर्जेचा पॉवर हाऊस? आम्हाला नक्की कळवा.

निवृत्ती एक विचार

विशिष्ट वयानंतर येणारी निवृत्ती असो वा स्वेच्छानिवृत्ती. त्यानंतरचं तुमचं आयुष्य तुम्ही कसं घालवता यावर तुमच्या पुढच्या आयुष्यातला आनंद अवलंबून असतो. तुम्ही जर काही ठोस काम हाती घेतलं असेल मुलांसाठी, मोठ्यांसाठी, समाजासाठी स्वतंत्रपणे असेल वा गटाने केलेलं काम असेल त्याचा कुणाकुणाला आणि कसा फायदा होतोय ते आम्हाला कळवा फक्त आणि फक्त २०० शब्दांत. त्यापेक्षा मोठ्या पत्रांची निवड केली जाणार नाही. नेमक्या आणि प्रेरणादायी पत्रांना ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. पत्र एकाच इमेलवर पाठवावीत. – chaturang@expressindia.com, chaturang.loksatta@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रं टंकित वा ऑपरेट केलेली असावीत. arati.kadam@expressindia.com