आधुनिक स्त्रियांचे ताणतणाव आणि त्यामुळे येणारं नैराश्य हा विषय नवीन नाही, मात्र तरीही सातत्याने त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. कारण नैराश्यग्रस्त स्त्रियांच्याच काय पुरुषांच्याही प्रमाणात वाढ होते आहे. ते टाळण्यासाठी भावनेला बळी न पडता काही ठाम निर्णय घेणं, ते तेवढय़ाच कठोरपणे अमलात आणणं हे आजच्या काळात गरजेचं आहे, मन प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे; त्यातच निरोगी समाजाचं रहस्य दडलेलं आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. त्यानिमित्ताने..

कल्पना साधारण पस्तिशीतली. विवाहित. दोन मुलांची आई. नोकरी करून घरही व्यवस्थित सांभाळणारी. आई, पत्नी, गृहिणी या तीनही भूमिका काटेकोरपणे पार पाडण्यात व्यग्र. पण तरीही तिला वाटतं, तिचं आयुष्य निर्थक आहे. का, तर ती जे काही करते त्याबद्दल एखादा साधा कौतुकाचा शब्दही कोणाच्या तोंडून निघत नाही. उलट नवऱ्याकडून सतत उद्धारच होतो. उपेक्षाच वाटय़ाला येते. मुलंही फक्त आपल्या वडिलांचाच आदर करतात. आपली नणंद मात्र नोकरी-कुटुंब कसं व्यवस्थित सांभाळते, स्वत:लाही छान वेळ देते, मग आपल्यालाच का नाही जमत, असा सलही तिच्या मनात कायम असतो. ती म्हणते, प्रत्येकाच्या मनानुसार वागताना, मला माझं मन,
माझी मतं, याचा साधा विचारही करायला मिळत नाही. जे वाटतं-आवडतं ते करताच येत नाही. आपलं पूर्ण आयुष्य हे असंच जाणार, कुटुंबासाठी.. तिला खूप एकाकी वाटतं. कोणाचाच आधार नसल्यासारखं वाटतं.

दुसरी, जान्हवीचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी असतो. ती तिच्या सासू-सासऱ्यांसोबत राहते. तिला एक मुलगाही आहे. पण तरीही तिला एकटं वाटतं. नवरा आपल्याला सोडून गेल्याची भावना तिच्या मनात इतकी तीव्र आहे की, तिला तिच्या सासू-सासऱ्यांसोबतही मनमोकळेपणानं राहता येतं नाही. त्यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. दुसरं म्हणजे, प्रत्येक गोष्टीत त्यांचेच निर्णय योग्य व ते सांगतील तसंच वागा, राहा.. नवरा इथे नसल्यानं कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी तिच्या एकटीवर आलीय त्यामुळे तिला तिच्या स्वप्न, ध्येयांकडे दुर्लक्ष करावं लागतंय.

ही दोन उदाहरणं पाहिली की लक्षात येतं, हल्लीच्या स्त्रियांना पूर्वीपेक्षा फारच वेगवेगळ्या ताणाला सामोरं जावं लागतंय. शिवाय ‘आमच्या वेळी तर यापेक्षा किती तरी अधिक त्रास सोसावा लागत होता,’ ‘तुम्हाला तर सगळं आयतं मिळालंय’, अशी शेलकी वाक्यं ऐकली की मग प्रश्न पडतोच, खरंच बायका ताण हाताळण्यात कमी पडताहेत का? तसं बघायला गेलं तर तंत्रज्ञानातील प्रगती आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जगणं एकीकडे सहज बनत चाललंय. बालपण अधिक सुखदायी आणि आरामदायक झालंय. अशा स्थितीतून प्रौढावस्थेत जात असताना अवघं जग बदलत जातं. ‘मी पेक्षा आपण’ किंवा ‘मौजमजेपेक्षा जबाबदारी’ असा भूमिकेतला बदलही होत असतो. स्त्रियांच्या बाबतीत तर हे स्थित्यंतर अधिक आव्हानात्मक असतं.

घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पार पाडताना स्त्रियांना कित्येक तास घराबाहेर राहावं लागतं. त्यानुसार त्यांच्या भूमिकेत बदल होत असताना, पुरुषांची भूमिका बदललीय का? अर्थात अलीकडे पुरुषही बदलती परिस्थिती लक्षात घेऊन घरातल्या कामांत स्त्रियांना ‘मदत’ करत असल्याचं दिसतं. मुलांच्या संगोपनाकडेही तो लक्ष देतो. मात्र, स्त्रियांवर वाढलेल्या जबाबदारीच्या तुलनेत अशा ‘मदती’चं प्रमाण खूपच कमी आहे. आणि ती फक्त ‘मदत’ असते. जबाबदारी फक्त स्त्रीचीच असते. साहजिकच कामाच्या आणि जबाबदारीच्या ताणामुळे थकलेल्या स्त्रीच्या शरीरात आणि मनात पुरेशी शक्ती, ऊर्जा उरतच नाही. त्यामुळेच मुलं किंवा घरातल्या व्यक्तींवर चिडणं, दुरुत्तरं करणं असे प्रकार वाढत आहेत. तिची सहनशक्ती कमी झाल्याचा त्रास इतरांना होतोच, पण मागाहून त्या स्त्रीच्या मनालाही टोचणी लागून राहते. त्याचा वेगळा ताण असतोच. शिवाय भरपाई म्हणून मुलांच्या मागण्या पूर्ण केल्या जात असल्याने त्यांच्याबाबतच्या भावनिक आणि व्यावहारिक
अपेक्षा अधिक उंचावत जातात. सरतेशेवटी या सगळ्या प्रकरणाचा शेवट तिच्या मनावरचा ताण वाढण्यातच होतो.

आज स्त्री पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. पण तरीही समाज पुरुषी मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. श्रम, कौशल्य, जबाबदारी या सर्व बाबतींत सारखं काम करत असतानाही त्याचं मूल्यांकन करताना पुरुषाला स्त्रीपेक्षा झुकतं माप मिळतं. एखाद्या पुरुषानं मांडलेल्या मताला स्त्रीच्या मतापेक्षा अधिक किंमत असते. उलट स्त्रीचा आवाज, तिचे विचार अनेकदा आजही निर्थक, फुटकळ मानले जातात. साधीशी गोष्ट पण आपल्या मुलांचं संगोपन करणाऱ्या पुरुषाचं आसपासच्या लोकांकडून कोण कौतुक केलं जातं! उलट हेच काम नोकरी सांभाळून करणाऱ्या स्त्रीसाठी मात्र ते नेहमीचंच कर्तव्य असतं.

समाजाकडून, कुटुंबाकडून वाटय़ाला येणारी ही उपेक्षाच खरं तर तिच्या मनातली खदखद, असंतोष वाढवण्याचं काम करताहेत. पण हे कोणाच्याही लक्षात येत नाही. उलट दिवसभरच्या कामांमुळे थकलेल्या बाईनं थकवा किंवा उद्वेग व्यक्त केला की ‘झेपत नसेल तर नको करू नोकरी’ अशी उत्तरं तिच्या तोंडावर फेकली जातात. जणू घर आणि नोकरी यामध्ये समतोल साधण्याचं कर्तव्य फक्त स्त्रीचंच आहे. त्याहूनही पुढे, अशा पद्धतीने व्यक्त होणाऱ्या स्त्रीच्या मनावर, ती अपयशी किंवा अकार्यक्षम असल्याचं िबबवलं जातं. घरातली एखादी गोष्ट कमी-जास्त झाली किंवा मुलांच्या बाबतीत काही उलटसुलट घडलं की त्याला जबाबदार केवळ स्त्रीलाच धरलं जातं. प्रत्येक पातळीवर उत्तम कामगिरी करण्याच्या अपेक्षांचं हे ओझं स्त्रियांना अधिकाधिक कष्ट करण्यासाठी प्रवृत्त करतं. परिणामी तिच्यावरील ताण वाढतच जातो.

कौटुंबिक स्तरावर केली जाणारी अवहेलना सामाजिक स्तरावर तरी कशी चुकेल? स्त्रियांवर होणारे अत्याचार किंवा लैंगिक शोषणाच्या तक्रारींची आकडेवारीच सारं काही सांगून जाते. चारचौघांमध्ये ऊठबस करताना स्वत:ची सुरक्षा करण्याची तसंच मर्यादा न ओलांडण्याची जबाबदारीही तिची एकटीचीच असते. त्यामुळे साधा बसमधला प्रवास असला तरी तिला तो दक्षतेनंच करावा लागतो. बरं, एखाद्याच्या नजरेचा किंवा जाणूनबुजून होत असलेल्या स्पर्शाचा निषेध नोंदवावा तरी आजूबाजूच्या लोकांमधून हेटाळणीच ऐकावी लागते. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणासोबतच होणारे अन्य भेदाभेद स्त्रीवर अधिक दडपण आणतात. या दडपणामुळेच अलीकडे स्त्रियांमध्येही आक्रमकता आल्याचे दिसते. मात्र, त्यासोबतच सामान्य तडजोड आणि स्त्री असल्यामुळे करावी लागणारी तडजोड, यातील फरक ओळखणं तिला कठीण जातंय.

याचा अर्थ पुरुषांमध्ये नैराश्य येत नाही, असा नाही. किंबहुना स्त्रीपेक्षा पुरुषासाठी नैराश्य अधिक आव्हानात्मक असतं. एखाद्या स्त्रीसाठी आपल्या अडचणी, नैराश्य व्यक्त करणं सोपं असतं. उलट समाजात ‘खंबीर’ मानला जाणारा पुरुष आपली हतबलता व्यक्त करतो, ते नामर्दपणाचं लक्षण मानलं जातं. पुरुषांनी आपल्या वेदना, कमकुवतपणा, अश्रू, दु:ख दाखवू नये अथवा व्यक्त करू नये, असं अपेक्षित असतं. दुसरं म्हणजे, लैंगिक भेदामध्ये पुरुष हा नेहमीच खलनायकी मानला गेला
आहे. अनेकदा तर चांगल्या भावनेनं किंवा स्वच्छ मनानं स्त्रीशी बोलणाऱ्या पुरुषालादेखील ‘खलनायकां’च्या पंक्तीत आणून बसवलं जातं. अशा गोष्टी स्त्री आणि पुरुष यांच्यातील ताण वाढवण्यास अधिक कारणीभूत ठरतात.

आजच्या ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनशैलीमुळे कित्येकांचं मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. धकाधकीच्या दिनचर्येमुळे माणसामाणसांत पूर्वीइतका संवाद उरलेला नाही. साहजिकच एकमेकांजवळ व्यक्त होणं किंवा सुखदु:ख वाटून घेणं, आता जमेनासं झालंय. शिवाय रोजच्या जगण्याच्या स्पर्धेत प्रत्येक जण दुसऱ्याला मागे टाकण्यासाठीच धावत असल्याचं चित्र आहे. अशा आयुष्यात दुसऱ्यासाठी वेळ कुठे मिळणार? एकीकडे, अधिक चांगली नोकरी, अधिक पैसा, मोठं घर या सर्व गोष्टी वेगानं मिळवण्यासाठी चाललेली धडपड आणि दुसरीकडे प्रत्येकाभोवती उभ्या राहिलेल्या अदृश्य भिंती यामुळे ताण आणि त्यामुळे येणारं नैराश्य दूर करण्याचा मार्गच सापडत नाही.
यावर उपाय एकच, तो म्हणजे वास्तवाचं भान ठेवणं. स्वत:कडून किंवा इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं थांबवलं पाहिजे. ‘मी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करणार’ असं तत्त्व पाळण्याऐवजी ‘जे महत्त्वाचं आहे, ते मी आता करेन. कमी महत्त्वाच्या गोष्टी नंतर करेन’ अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. एक दिवस कामवाली बाई आली नाही म्हणून तुमचं घर अस्वच्छ किंवा गचाळ दिसत असेल, तर त्याबद्दल स्वत:ला दोष देण्यात तर अर्थ नाहीच शिवाय शक्य नसेल तर एक दिवस ते तसंच राहिलं तरी हरकत नाही. मनाचा तोल सांभाळणं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे, काही जबाबदाऱ्या नाकारायलाही शिकलं पाहिजे. मुलांच्या परीक्षांच्या दिवसांत घरी येऊ घातलेल्या पाहुण्यांना आदरयुक्त नकार कळवणं, हा काही गुन्हा नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वत:च्या भावना जाणून घेऊन त्यानुसार काम करणं, हेदेखील ताणनियंत्रणासाठी महत्त्वाचं आहे. एखाद्या सहकाऱ्यानं त्याचं काम तुमच्यावर ढकललं आणि तुम्ही ते निमूटपणे स्वीकारलं तरी तुमची चिडचिड होणारच. तो संताप तुम्ही घरी जाऊन मुलांवर वा कुटुंबीयांवर काढू लागलात तर ते गैर ठरेल. त्याऐवजी आपल्या भावना स्पष्ट व ठाम शब्दांत मांडणं कधीही चांगलं. अनेकदा आपण किरकोळ गोष्टींसाठीही मुलांच्या अंगावर खसकन ओरडतो. एखाद्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण नाही, असं जाणवतं तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा त्वेषाने बाहेर पडते. अशा वेळी परिस्थिती सांभाळता येणं शिकलं पाहिजे. आपण परिस्थिती बदलू शकणार नाही. मात्र, तिला सामोरं कसं जायचं, हे तर नक्कीच ठरवू शकतो. अगदी वरच्या उदाहरणात सांगायचं झालं, तर स्वत:ची कामं आपल्यावर ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहकाऱ्याच्या स्वभावात बदल होण्याची अपेक्षा करण्यापेक्षा तशा परिस्थितीत आपण वेगळय़ा पद्धतीने काय मार्ग काढू शकतो, याचा विचार करायला शिकलं पाहिजे. विश्रांती ही आपल्या शरीरासोबत मनासाठीही अत्यावश्यक आहे. आपल्या शरीराचा गाडा हाकणाऱ्या भावना आणि शक्तीच्या ‘बॅटऱ्या’ रिचार्ज करायला शिकणं, हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. व्यायाम आणि संतुलित आहाराचं महत्त्व आपल्याला समजू लागलं आहे. त्यामुळे आता दिवसभराच्या व्यग्र वेळापत्रकातूनही या गोष्टींसाठी पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. स्वत:ची काळजी घेणं म्हणजे केवळ व्यायाम आणि संतुलित आहार नव्हे. तर यामुळे भावना व्यक्त करता येणं, परिस्थितीशी उगाच झगडत न बसणं, स्वत:च्या जबाबदारीचं व्यवस्थापन करणं आदी गोष्टी करता येतात. वेळ किंवा वाढत्या वयामुळे शरीराची काळजी घेण्याच्या अपरिहार्यतेला तोंड देण्यापेक्षा आतापासूनच या गोष्टींसाठी वेळ देणं सुरू केलं पाहिजे. आपण स्वत: शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम वा तंदुरुस्त राहू तेव्हाच एकाग्र वृत्तीने ताणावर नियंत्रण आणणं शक्य होईल.
aavishkar93@gmail.com
भाषांतर – अर्चना राणे-बागवान