प्रियंका पाटील

गावचा गावगाडा, पाटीलकीचा तोरा सोडून पुढं निघून येणं, जे शिकलोय ते रुजवणं फार महत्त्वाचं वाटतं. स्वत:च्या शोधार्थ भटकताना स्वत:ला घडवणंही गरजेचं नसतं का? अर्थात तेच जास्त महत्त्वाचं असतं. आयुष्यात संघर्ष असा म्हणावा तसा नव्हताच. सामाजिक, आर्थिक संघर्ष नव्हता पण वैचारिक संघर्ष कुणाला चुकतो? आणि त्यातूनच न संपणारा शोध सुरू होतो, मी कोण?

इरावती कर्वेच्या ‘युगांत’ या कादंबरीतल्या कर्णावरच्या प्रकरणाचं शीर्षक आहे,

‘मी कोण?’ आयुष्यभर तो याच प्रश्नाभोवती फिरत राहतो. तुम्ही आणि मी तरी काय करत असतो?

‘स्व’च्या शोधार्थच तर जगत असतो. अमक्या-तमक्याची लेक, यांची सून, त्यांची वहिनी, याची बायको, त्याची बहीण, अमक्याची आई, तमक्याची आजी.. किती विशेषणं! आयुष्यभर अशी अनेक नाती चिकटत जातात आणि ‘मी कोण?’ हा प्रश्न अधिकच अवघड होत जातो. आजीनं अर्धशेकडा देवांना तरी साकडं घातलं असावं आणि मम्मी-पप्पांनी जिल्हाभरातले अनेक दवाखाने पालथे घातले असावेत, त्यानंतर माझा जन्म झाला. अन् आजी सांगते, गावजेवण घातलं होतं तेव्हा. लग्नानंतर तीन-चार वर्षे मुलं न होणं हे आत्ता ‘कुटुंब नियोजन’ आहे पण २०-२५ वर्षांपूर्वी चिंतेचा विषय होता. चिंता मिटली. दुकान टाकलं, ‘प्रियंका किराणा अँड जनरल स्टोअर्स.’‘पहिली बेटी धनाची पेटी झाली,’ हेही आजीसाठीच. हा विचार त्या काळासाठी खूप मोठा होता. या विचारांमधून जन्म झाला हे खूप चांगलं होतं.

जन्माचा प्रश्न तर सुटला. वाढणं, शिकणं आणि जगणं. हे फारसं अवघड नसतं म्हणतात. पाटलांच्या पोरींसाठी असावं कदाचित. बोट दाखवील ती गोष्ट हजर होते, पण जगण्यातलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं नाही होत अनेकदा. वडील पुरोगामी असल्यानं मनासारखं जगता आणि शिकता आलं. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी घरापासून वेगळं होण्याची भूमिका घेतली. आणि परिस्थितीची, समाजाची पर्वा न करता शिकण्यासाठी मुलगी बाहेर गावी पाठवली. ‘तरणीताठी पोर बाहेर गावी पाठवणं म्हणजे जिवाला घोर’ हे समीकरण होतं गावचं. दगडाचं काळीज केलं आणि बाहेर पडले मी. नऊ वर्षांचं होस्टेल लाइफ, नोकरी, लग्न करताना माझ्या होकाराची वाट पाहणं, माझ्या पसंतीनेच लग्न करून देणं, ही बंडखोरी घडली बापाच्या हातून आणि याबद्दल अभिमान वाटतो..

हे तर सगळीकडंच असतं, मग यात स्वत:चा शोध कुठं आला? जेव्हा जेव्हा ‘मी कोण?’ या प्रश्नाचं उत्तर शोधत असते तेव्हा इथूनच सुरुवात होते. गावचा गावगाडा, पाटीलकीचा तोरा सोडून पुढं निघून येणं, जे शिकलोय ते रुजवणं फार महत्त्वाचं वाटतं मला. स्वत:च्या शोधार्थ भटकताना स्वत:ला घडवणंही गरजेचं नसतं का? अर्थात तेच जास्त महत्त्वाचं असतं. आयुष्यात संघर्ष असा म्हणावा तसा नव्हताच. सामाजिक, आर्थिक संघर्ष नव्हता, पण वैचारिक संघर्ष कुणाला चुकतो? आपण जे काही शिकत असतो शाळेत, वाचत असतो ते सगळं-सगळं वास्तवापासून पुरतं वेगळं असतं. ही समज येणंही गरजेचं असतं ना..

‘यह जवानी है दिवानी’मधला बनी, ‘क्वीन’मधली राणी, यांना बघून स्वत:मधला जिप्सी जागा होतो. उडावंसं वाटतं, पळावंसं वाटतं, ओरडत भटकावंसं वाटतं बनीसारखं.. ‘क्वीन’सारखं एकदा तरी स्वत:ला भेटावसं वाटतं.. जर्मनीत पीएच.डी. करायची आहे, अर्धअधिक जग बघायचं आहे, जिप्सी बनून भटकायचं आहे, आयुष्याच्या शेवटी कोणतीही गोष्ट राहिली करायची ही खंत राहू नये, असं वाटतं. जगण्याची प्रत्येक फँटसी पूर्ण करावीशी वाटते. पण जगण्याच्या अनेक फँटसीमध्ये एक फँटसी मरणाची असावीशी वाटते..

हा विचार थोडासा ‘मी कोण?’ च्या उत्तराजवळ जाणारा वाटतो. ‘प्रियंका रमेश पाटील’ ही जन्मताच मिळालेली ओळख, आजोबाची छकुली, मत्रिणींची प्रिडी, दादु, पल्या, नराची बहीण पियु, ओमीने दिलेलं नाव प्रि, सासरी प्रियंका आकाश चटके.. कुणाची बिंगो, कुणाची पिरी.. या सगळ्यांचं मिश्रण होऊन बनते ती ‘प्री पाटील’. माझी अशी स्वतंत्र ओळख! हसून, बोलून, मत्री करून, थोडंफार लिहून बनवलेली ओळख. पण एवढय़ानंही ‘मी कोण?’ पूर्ण होत नाही. शेवटी काय तर हा शोध कधीच पूर्ण होणारा नाही..

त्या शोधार्थ लिहिलं होतं, पहिलीच्या पुस्तकातली ‘मगन बदक पकड.’ ही ओळ मला जशीच्या तशी चित्रासह आठवते. मला आठवतो तो पंचतंत्राच्या गोष्टीतला बोलणारा कोल्हा आणि सिंह. दुसरीच्या ‘छान-छान गोष्टी’मधला  मांडी कापणारा शिबी राजाही आठवतो आणि आठवतो महाभारतातला ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ही. मला सीतेच्या आठवणीत व्याकूळ झालेला राम आठवतो तसंच आठवते ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी ‘मुंगी उडाली आकाशी’मधली मुक्ता. तिसरीची ‘मला व्हायचंय अंतराळवीर’ कविता आकाशात घेऊन जायची. तर चौथीतला गोविंदपूल बांधणारा गोविंद व्हावंसं वाटायचं. पाचवीतली ‘दमडी’ शेवेचा भारा घेऊन कशी बरं दिसत असेल? सहावीतलं, ‘मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही’ म्हणणारं चिमुकलं गवतफूल किती ठाम असेल? दहावीतली बाबुराव बागुलांची ‘भूक’मधली तवलीतल्या मटणात सापाचे तुकडे दिसले म्हणून रडणारी आणि तिथंच गारठय़ात मेलेली आई आठवते मला. सोबतच ‘रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनी क्रुसावरचे’ हे कुसुमाग्रजही आठवतात. दादाचं पुस्तक चोरून वाचलेली ‘स्मशान’ही आठवते. पाचवी ते दहावी शाळेची लायब्ररी सहा वेळा वाचून काढली. शेकडो पुस्तकं.. पण त्यातली काहीच आठवतात. बाबा कदम यांचा पाकीटमार सना, सिंगलमदर एल्सा, सख्ख्या बापाच्या अनैतिक वागण्याची कोर्टात कबुली देणारी आणि पद्धतशीर गोळी घालूनही आत्महत्या दाखवणारी ‘रानजाई’ जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते. विभावरी शिरुरकरांची ‘शबरी’ पूवार्धात प्रेमात पडलेली आणि उत्तरार्धात प्रेमाविषयी घृणा निर्माण केलेली, विसरता येत नाही. वीणा गवाणकरांचा पूर्णवेळ प्रयोगशाळेत राहणारा, फाटक्या कोटामध्ये परिषदांना उपस्थिती रहाणारा, आणि शेंगदाण्यापासून तीनशेच्या वर वस्तू तयार करणारा ‘काव्‍‌र्हर’ मनात रुततो तर ‘अग्निपंख’मधला, समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळू, यात्रेकरूंचा विश्वास, रामेश्वरचा रस्ता, सर्व एकात्म होऊन जातं. ‘माझी आई’ म्हणत क्षेपणास्त्रं बनवणारे कलाम ‘माइंडला इग्नाइट’ करतात. त्याचदरम्यान वाचण्यात आलेला ‘अमृत’ दिवाळी अंक, त्यातली ‘कामसूत्र लिहिणाऱ्या भारतात माझ्या उघडय़ा मांडय़ा आणि हलणाऱ्या उरोजांकडे बघणारी वासना कुठून आली?’ असं विचारणारी परदेशी युवती, अल्बूच्या गावाचं सुंदर वर्णन करून मला अल्बूच्या प्रेमात पाडणारा लेखक, कॉम्रेडची पहिली ओळख करून देणाऱ्या लेखातला महागडी सिगारेट पितो म्हणून अटक करणारा पोलीस, इराणी कॅफे आणि चित्रपटसृष्टी यांची सांगड घालणारा लेख.. उगीचच का आठवत राहतात? बारा वर्षे रोज नवी स्त्री उपभोगणारा ययाति, मनाला भुरळ घालणारा राधेय, इरावती कर्वेच्या ‘युगांत’मधला शेवटी ‘द्रौपदीला काय हवंय?’ विचारणारा भीम आणि ‘पुढच्या जन्मी पाचातला मोठा हो,’ म्हणणारी द्रौपदी. ‘संभाजी’, ‘छावा’मधला तडफदार संभाजी आणि त्याच्या कैदेतल्या पोरीला स्वातंत्र्य बहाल करणारी औरंगजेबाची लेक झेबुन्निसा. ‘मृत्युंजय’, ‘श्रीमान योगी’, ‘युगंधर’सोबतच जयंत नारळीकरांच्या अंतराळकथा.. हे सगळं सगळं डी. डब्ल्यू. ग्रिफिथच्या ‘इन्टॉलरन्स’सारखं तुकडय़ात विभागूनही एखाद्या कथेसारखं प्रवाही डोळ्यासमोर

आठवत राहतं. आठवायला यातले कोणतेही संदर्भ परत तपासायची गरज नसावी इतके ठळक आठवत राहतात. ‘तमाशा’ चित्रपटातल्या पीयूष मिश्राच्या कहाणीसारखी ही कहाणी मनाच्या सिनेमागृहात अव्याहत सुरू असते. नकळत वाटून जातं, आपल्याही आयुष्याची अशीच कहाणी असावी का?

लहानपण, त्यातली मजा, भवतालानं झिरपवलेला जातीयवाद, मुरलेला धर्मवाद..

वय वाढलं, पुस्तकं वाचली, शिकलो आणि डार्वनिच्या उत्क्रांतिवादानुसार जशी शेपटी गळाली तसे हे सारे अनावश्यक वाद गळत गेले. आलेली समज, माणूस म्हणून जगण्याची धडपड, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची धडपड आणि पहिलं-वहिलं अपयश. त्या वेळी खचलेलं, उभारलेलं मन.. जग बघण्याची इच्छा आणि त्याच वेळी आवडणारा एकांत. समुद्राच्या गुडघाभर पाण्यात, माणसांच्या गर्दीत खेळणारी मी खरी, की दारं खिडक्या बंद करून, बेडवर भिंतीला टेकून शांतता अनुभवणारी मी खरी? काहीच चांगलं घडत नाही म्हणून टेरेसवर वेळ घालवणारी मी खरी की ‘अ‍ॅम्बिशियस व्हायलेट’मधल्या फुलासारखं एक दिवसाचं आयुष्य घेऊन मनासारखं जगण्याची इच्छा करणारी मी खरी.. या सगळ्या कहाण्या ऐकून, वाचून त्यात रमणारी मी खरी, की या कहाण्यांना माझ्यात मुरवत माझीच कहाणी माझ्यात शोधणारी मी खरी? शेवटी एकच शोध उरतो..!

– इरावती कर्वेच्या युगांतमधल्या कर्णाच्या प्रकरणाचं शीर्षक. ‘मी कोण?’

pppatilpriyanka@gmail.com

chaturang@expressindia.com