खरोखरच आजच्या कोलाहलात माणूस एकटा पडत चालला आहे. व्हॉट्सअॅचप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांवर अनेक मित्र आहेत परंतु मनातल्या भावना बोलून दाखवण्यासाठी प्रत्यक्ष कोणी नाही अशी परिस्थिती झाली आहे. अनेक गैरसमजुतींमळेही विनाकारण मानसिक त्रास होतो. पण ते लक्षात येत नाही. या लेखांच्या निमित्ताने एकाकीपणावर मात करण्यास मदत होईल असे वाटते. -बागेश्री झांबरे, नाशिक मैत्रीचा मार्ग सोपा नसतो हेच खरे १३ जानेवारीच्या अंकातील आशुतोष जावडेकर यांचा ‘काय झाले गं बोटाला?’ हा विचारपूर्वक लिहिलेला लेख वाचला. आवडला. मैत्री ही दोन्हीकडून निखळ आणि निरपेक्ष अशीच हवी. काहीतरी उद्देशाने नसावी असे वाटते, मग ती मित्र-मैत्रीणीची असो की मैत्रीण-मैत्रिणीची असो. एकमेकांना जरूर तेव्हा मदत करणारी तर हवीच, पण काही गोष्टी सोडून द्यायची तयारीही हवी. ‘मैत्र’ हा शब्दच किती छान आहे. त्यात सगळे आलेच. एकमेकांबद्दल असलेला विश्वास आणि आदर त्याचा पाया आहे. मित्र-मैत्रिणींची खरी छान दोस्ती असेल तर इतरांकडे लक्ष द्यायचेही कारण नाही. आमचाही कॉलेजपासूनचा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप अजूनही छान आहे. या लेखात म्हटले आहे तसे मैत्रीचा मार्ग तसा सोपा नसतोच हेही खरेच आहे, पण सुखदही असतो. समाजात बदल जरी होत असला तरी तो खूप धिमा आहे. या सदरातून किती प्रामाणिक लेख वाचायला मिळतात ते बघणे खरेच औत्सुक्याचे आहे. -प्रीती पेठे वास्तवदर्शी विवेचन ‘सांदीत सापडलेले’ या सदरातील ‘दोन ध्रुवांवर दोन पिढया’ या लेखात आजच्या तीन पिढयांमधील संवाद, मानसिक स्थिती, वर्तन, तंत्रज्ञान, जागतिकीकरणाचा प्रभाव यांवर खूप छान, सुंदर, वास्तवदर्शी विवेचन केले आहे. आजी-आजोबा व त्यांची नातवंडे यांच्यात भावनिक आपलेपणा, जवळीकता आहे. पण मधली पिढी आणि त्यांची अपत्ये यांच्यात तितकासा संवाद जाणवत नाही. कारण या दोन पिढयांमधे सोशल मीडिया, आधुनिक तंत्रज्ञान, जागतिकीकरण दुरावा निर्माण करीत आहे. -शशिकांत शिंदे, सोलापूर