१७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘भयभूती’ या सदरातील मंगला आठलेकर यांचा ‘भीती माणसांचीच’ हा लेख आवडला. माझा अनुभव असा- मी पशुवैद्यकीय पदवीधर (१९७१ चा). पशुवैद्यकी करताना मला एकाही प्राण्याची भीती वाटली नाही. पण हाच अनुभव मनुष्यप्राण्याच्या बाबतीत मात्र आला नाही! -डॉ. मधुकर घारपुरे नात्यांतील अवघड प्रश्नांना हात ‘सांधा बदलताना’ हे डॉ. नंदू मुलमुले यांचं सदर मी नेहमी वाचतो. ते सहज शैलीत माणसांच्या स्वभावाचे विविध पदर उलगडतात आणि यातल्या कथा वाचताना ती-ती व्यक्तिमत्त्वं समोर लख्ख उभी राहतात. रुढी-परंपरा, माणसांत रुतलेले स्वभाव आणि त्यावर काळाचे घाव, अशा खाचखळग्यांतून जाणाऱ्या या कथा वाचताना आपल्याभोवती रिंगण घेतात असं वाटतं. व्यक्तीवैविध्यानुसार समाजात फारच थोडे लोक आपले स्वभाव सैल करुन सुवर्णमध्य गाठत असतात. स्व-परिघाबाहेर जाऊन विचार करणं सगळयांनाच जमतं असं नाही. त्यामुळे न पेलवलेली नाती-संघर्ष पुढे अवघड वळणं घेतात. अशा वेळी आपल्या अनुभव-कथांमध्ये डॉ. मुलमुले यांनी पात्रांना स्वभाव-गुंत्यांतून अलगद बाहेर काढताना दाखवलेली वाट जरी खडतर असली तरी प्रवास सुखाचा करणारी आहे. त्यांनी स्वभाव-नात्यांतील अवघड प्रश्नांना हात घालून, ठाम विचारसरणीस नरमाईचं वंगण घातलं आहे. -विजय भोसले वास्तवदर्शी लेख ‘सांदीत सापडलेले’ या सदरातील डॉ. भूषण शुक्ल यांनी लिहिलेला ‘एका जगण्यात दोन आयुष्यं!’ (१० फेब्रुवारी) हा लेख अगदी अचूक, बिनतोड, जळजळीत आणि वास्तवदर्शी आहे. लेखकानं तीन पिढयांचा आयाम विस्तारानं सांगितला आहे. आम्ही आजचे पालक कोणत्या मानसिकतेत जगत आहोत, ती बरोबर चिमटीत पकडून मोठया भिंगातून त्यांनी दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार! त्यांच्या लेखांतून बरेच न सुटलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं समोर आली. वेगळा विचार मिळाला. -वैभव अंधारीकर ‘.. जीवनाचा कथाकार’ हे पटले ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा कथाकार’ हा संकेत पै यांच्या लेखाचा (१० फेब्रुवारी) सारांश बऱ्याच अंशी खराच मानावा लागेल. मी पदवी घेतल्यावर अनुभव म्हणून एका खासगी कंपनीत दोन वर्ष काढली. रोजगार केंद्रातून मला नोकरीच्या संधींची दोन पत्रं आली होती, एक तेल कंपनीचं आणि दुसरं बँकेचं. परीक्षा पास करून दोन्हीकडून नेमणुकीची पत्रं मिळाली. थोडीशी द्विधा मन:स्थिती झाली. पण घरच्यांच्या विचारानं दोन्हीकडे मिळणाऱ्या सुविधांचा विचार करून तेल कंपनीत नोकरी करायचं ठरवलं. नोकरीच्या पहिल्या दिवशीच माझ्या लक्षात आलं, की मला इंग्रजीवर खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मला योग्य शिक्षक मिळाले. मी टंकलेखक म्हणून नोकरीस लागले. चार वर्षांत स्टेनोची परीक्षा दिली. मेहनत केल्यावर त्याचे फळ म्हणून चांगलं प्रगतीपुस्तक लिहिणारे वरिष्ठ मिळत गेले आणि प्रबंधक पदावरून मी निवृत्त झाले. नोकरीच्या मध्यावर घर घेण्यासाठी एका गुजराती आणि मराठी सहकाऱ्यानं मला आत्मविश्वास दिला. स्वत:चं घर घेतलं. तोपर्यंत सर्व आयुष्य भाडयाच्या घरातच गेलं होतं. हो, थोडी खंत राहिली, की नोकरी चालू ठेवून पुढे शिकले असते, तर अजून वरची पायरी चढून निवृत्त होता आलं असतं. पण वामनराव पै म्हणतात ते खरं आहे, की ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ आणि या लेखात पै यांनी म्हटल्याप्रमाणे कथाकारही. हल्ली स्पर्धा खूप वाढली आहे, त्यामुळे व्यक्तींना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र निराश न होता आपली कथा आपल्याला लिहावीच लागणार आहे, हेही तितकंच खरं. -नीता शेरे