साधना तिप्पनाकजे

‘स्वत:ला सांभाळू शकत नाही मग गाव काय सांभाळणार?’ अशी बोचरी टीका करणाऱ्यांना कविताताईंनी आपल्या कामातून चोख उत्तर दिलं. त्यांच्या कामाची पावती म्हणजे त्या दुसऱ्यांदा गावच्या सरपंच झाल्या. आज गावात स्त्रीसभा आणि ग्रामसभा पूर्ण कोरमने पार पडतात आणि गावासाठीच्या योजना प्रत्यक्षात येतात. दिव्यांगत्वावर मात करत गावासाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील दहेगाव आणि वाघूळ या गट ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता भोंडवे यांच्याविषयी.

जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे दहेगाव, वाघूळ या गट ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता भोंडवे! आपल्या अपंगत्वावर मात करून कविताताई सलग दुसऱ्यांदा सरपंच झाल्या आहेत. त्यांच्यातला आत्मविश्वास, हिंमत, काम करण्याची ऊर्जा त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता आणते.

नाशिकमधील निफाड तालुक्यातील दहेगाव आणि वाघूळ ही गावं अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत. सध्या सरपंच असलेल्या कविताताई बारावीनंतर घरीच होत्या. दिव्यांग असल्याने पुढे काय करायचं, आपलं कसं होणार या विचाराने निराश झाल्या होत्या.  गावापासून २५ किलोमीटर अंतरावर पदवी महाविद्यालय असल्याने आणि तिथपर्यंत थेट बसची सोय नसल्याने इच्छा असूनही त्यांना पुढील शिक्षण घेता येत नव्हतं. २०११ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद ‘अनुसूचित जमात महिला’ या प्रवर्गासाठी राखीव होतं. कविताताईंचे वडील, पुंडलिक भोंडवे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य होते. पुंडलिक भोंडवेंना वाटत होतं, की गावात शिकलेली सरपंच असावी. आरक्षण मिळालंय तर त्याचा योग्य फायदा समाजाला होण्याकरता किमान साक्षर सरपंच असायला हवी. त्यांनी याकरिता आपल्या मुलीलाच विचारलं. कविताताईंनी साफ नकार दिला. पण त्यांच्या वडिलांनी हार मानली नाही. त्यांनी कविताताईंच्या मनात उमेद जागवली. ‘तुझ्या शिक्षणाचा उपयोग तू गावासाठी कर, तुला स्वत:ला सिद्ध करण्याकरिता ही चांगली संधी आहे’ हा विश्वास दिला. आणि वडिलांच्या प्रयत्नांना यश आलं. कविताताई निवडणूक लढवायला तयार झाल्या.

मात्र आणखी एक अडचण आली. कविताताई लहान असताना त्यांना पोलिओची लागण झाल्यामुळे पायांमध्ये व्यंग आलेलं होतं. गावात काही लोकांनी कविताताई दिव्यांग असण्यावरून त्यांच्या उमेदवारीला विरोध करायला सुरुवात केली. ‘स्वत:ला सांभाळू शकत नाही, मग गाव काय सांभाळणार?’ अशी बोचरी टीका करू लागले. कविताताईंनी या टीकेला आव्हान मानून हिंमत बांधली. जोरदारपणे प्रचार केला आणि सदस्यपदी निवडून आल्या आणि मग सरपंचपदीही निवडून आल्या.

पण निवडून येणं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं यामध्ये अडचणींचे बरेच दगड होते. सरपंचपदाच्या कामांची, अधिकारांची काही माहिती नव्हती. ग्रामसेवकाला काही विचारलं तर ते उत्तर तर देत नव्हतेच वर दुर्लक्ष करायचे. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकही एखादा ठराव झाल्यावर आधी तोंडी अनुमोदन द्यायचे मात्र नंतर निर्णय फिरवायचे. अंमलबजावणीत टाळाटाळ करायचे. या सगळ्यातून मार्ग काढणे कविताताईंना कठीण जात असल्याने त्यांची सरपंचपदाचं पहिलं दीड वर्ष थंडपणे गेलं. गावातही त्याविरोधात चर्चा सुरू झाल्या.

याच दरम्यान नाशिकच्या ‘अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट’ या स्वयंसेवी संस्थेने स्त्री सरपंचाकरिता आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात कविताताई सहभागी झाल्या. या प्रशिक्षण कार्यशाळेनंतर कविताताईंच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाल्याचं त्या सांगतात. या प्रशिक्षणामुळे त्यांना सरपंचाचे अधिकार, कार्य, ग्रामसभा, महिलासभा या मूलभूत पण गावविकासात अतिशय महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळाली. प्रशिक्षणावरून आल्यावर त्यांच्यात आत्मविश्वास आला होता, गावासाठी काहीतरी भरीव करायचं त्यांनी मनोमन ठरवलं आणि कडक भूमिका घेतली. सर्वात आधी त्यांनी गावातल्या स्त्रियांना एकत्र केलं. गावात महिला सभा कधी झालीच नव्हती. ग्रामपंचायत स्त्री सदस्या ग्रामपंचायत कार्यालयात कधी फिरकत नसत, तिथे सामान्य स्त्रिया कुठे येणार? ग्रामसेवकाला सांगून महिला सभा जाहीर झाली. स्वत: गावात फिरून स्त्रियांना सभेकरिता यायला सांगितलं. कुतूहलाने त्याही जमल्या, हळूहळू बोलत्या होऊ लागल्या. पाणीपुरवठा आणि दारू, मटका हे मुद्दे त्यांनी कळकळीने मांडले. कविताताईंनी या विषयांकडे सर्वात आधी लक्ष द्यायचं ठरवलं. गावात फक्त चार हातपंप होते त्यातूनच गावाला पाणी मिळायचं. कविताताईंनी ओझर धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी गावापर्यंत आणलं. पाण्याची टाकी बांधली, विहिरी-तलावांचं बांधकाम करून गावात पाणी

योजना राबवून गावचा पाणीपुरवठा सुरळीत केला. आता घरोघरी पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यात जरा त्रास सोसावा लागतो. पण त्यावरही शेततळं आणि जलसंधारणाची काम हाती घेऊन मार्ग काढला जात आहे. त्यानंतर मोर्चा वळवला गावाला व्यसनमुक्त करण्याकडे. मटका आणि दारू व्यावसायिकांना ग्रामसभेत बोलावून व्यवसाय बंद करण्याकरिता तोंडी सांगितलं. पोलीस स्थानकात अर्ज दिले. पण दारू आणि मटका व्यवसाय सुरूच राहिले. हे व्यावसायिक कविताताईंना लाच देण्याचा प्रयत्न करू लागले. आता कविताताई आणि गावातल्या स्त्रीवर्गाने या व्यावसायिकांच्या घरावर थेट मोच्रे न्यायला सुरुवात केली. ‘वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करू’ असं पोलीस आणि व्यावसायिक यांना सांगितलं. अखेरीस त्यांच्या या लढय़ाला यश आलं. गावातले दारूचे गुत्ते आणि मटका व्यवसाय बंद झाला. स्त्रियांना यामुळे स्फुरण चढलं.

आता गावातल्या स्त्रिया नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात येऊ लागल्या. महिला सभा आणि ग्रामसभा पूर्ण कोरमने होऊ लागल्या. कविताताईंनाही बळ मिळालं. लोकांनाही त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. प्राथमिक शाळेला आणि ग्रामपंचायत कार्यालयाला पक्कं कुंपण, स्मशानभूमीचं बांधकाम ही कामं झाली. २०१६ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. यावेळी सरपंचपद केवळ अनुसूचित जमातीकरिता राखीव होतं. कविताताईमध्ये ‘आपण गावासाठी काहीतरी करू शकतो’ हा आत्मविश्वास आला होता. त्यांना गावात विकासकामे करायची होती. त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं. गावकऱ्यांनाही ताईंबद्दल, त्यांच्या कामाबद्दल विश्वास वाटू लागला. कविताताई दुसऱ्यांदा सरपंचपदी निवडून आल्या. दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी गावातल्या अंतर्गत रस्त्यांवर लक्ष केंद्रित केलं. गावातले रस्ते सुधारले पण गाव अजूनही तालुक्याला जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून तुटलेलंच आहे. या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी तीन किलोमीटर चालत यावं लागतं. कच्चा रस्ताही धड नसल्यामुळे गावापर्यंत बस येत नाही. मध्यंतरी बस सुरू झाली होती, पण रस्ता धड नसल्यामुळे ती चारीत कोसळली आणि बससेवा बंद झाली.

दहेगाव आणि वाघूळला वणी, लखमापूर आणि करंजवन या मोठय़ा गावांना जोडणारा रस्ता झाल्यास गावकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. पण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या विभागाशी कविताताईंचा वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे. पण फायलींच्या कचाटय़ातून या रस्त्याचं प्रत्यक्ष बांधकाम होतच नाहीये. याचा सर्वात मोठा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे. गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. तीन किलोमीटर अंतरावरील लखमापूरमध्ये पाचवीपासून शाळा आहे. पाचवीपासून मुलं शाळेकरिता रोज सहा किलोमीटर चालतात. पावसाळ्यात मुलांचे खूप हाल होतात. उसाच्या मळ्यामध्ये वाघ लपलेले असतात. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही मुलांची शाळागळती होते. बहुतांश मुलींची तर शाळाच बंद होते आणि मग त्यांची लवकर लग्नं लावली जातात. कविताताई मुलींना शाळेत पाठवण्याकरिता गावकऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गावात आरोग्य उपकेंद्राकरिताही कविताताई काम करत आहेत. कारण सरकारी आरोग्य केंद्राकरिताही गावकऱ्यांना २०-२५ किलोमीटर अंतरावर जावं लागतं. गरोदर स्त्रीला किंवा रुग्णाला त्वरित आरोग्यसेवा मिळण्याकरिता, ग्रामपंचायतीच्या महिला बालकल्याण निधीतून प्रवासखर्चाकरिता रक्कम खर्च करून कविताताई खासगी वाहनाची सोय करून देतात. स्त्रियांच्या वैयक्तिक विकासाकडेही कविताताई लक्ष देतात. स्त्रिया आणि मुलींकरिता नियमितपणे आरोग्यमार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात येतं. सरकारी डॉक्टर्स आणि आशा सेविका या शिबिरांमध्ये मार्गदर्शन करतात. गेल्या दोन वर्षांपासून स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्याकरिता बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. स्त्रियांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरंही ग्रामपंचायतीतर्फे घेतली जातात. विशेषत: मुलींकरिता बारावीनंतरचे कोर्स आणि नोकरी अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येतं.

गावात तीन घरकुल योजनांद्वारे कल्पनाताईंनी पहिल्या कार्यकाळामध्ये ६५ तर दुसऱ्या कार्यकाळामध्ये ३५ जणांना घरकुलांचा लाभ मिळवून दिला. सध्या दोनशे जणांनी घरकुलाकरता ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यांनाही लवकरच हक्काचं घर मिळेल असा विश्वास कविताताई व्यक्त करतात. पहिल्या कार्यकाळामध्ये २४ तर दुसऱ्या कार्यकाळामध्ये १२ शौचालयांचं काम झालं असून गावात आता शंभर टक्के शौचालयांचा वापर होत आहे.

बसची सोय नसल्यामुळे वडील किंवा भाऊ  कविताताईंना तीन किलोमीटर अंतरावरील बसस्टॉपवर सोडतात. तिथून पुढे तालुक्याला पंचायत समितीत त्या एकटय़ाच जातात. पंचायत समितीतही अधिकाऱ्यांचं त्यांना चांगलं सहकार्य मिळत असल्याचं त्या आवर्जून सांगतात. कविताताईंचं दिव्यांग असणं हे त्यांच्या कामाच्या धडाक्याच्या कधीच आड येत नाही. शिक्षण पूर्ण करता येत नाही, करिअर करता येत नव्हतं, यामुळे नकारात्मक विचार करणाऱ्या, आत्मविश्वास हरवलेल्या कविताताईंना आज करिअरची वेगळी वाट मिळाली आहे.

आता गावविकासामध्येच त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. सरपंचपदामुळे त्यांच्यात आलेला सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी गावातल्या स्त्रियांमध्येही रुजवला.

दहेगाव आणि वाघूळला वणी, लखमापूर आणि करंजवन या मोठय़ा गावांना जोडणारा रस्ता झाल्यास गावकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. पण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या विभागाशी कविताताईंचा वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे. पण फायलींच्या कचाटय़ातून या रस्त्याचं प्रत्यक्ष बांधकाम होतच नाहीये. याचा सर्वात मोठा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे. गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. तीन किलोमीटर अंतरावरील लखमापूरमध्ये पाचवीपासून शाळा आहे. पाचवीपासून मुलं शाळेकरिता रोज सहा किलोमीटर चालतात. पावसाळ्यात मुलांचे खूप हाल होतात. उसाच्या मळ्यामध्ये वाघ लपलेले असतात. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही मुलांची शाळागळती होते. बहुतांश मुलींची तर शाळाच बंद होते आणि मग त्यांची लवकर लग्नं लावली जातात.

sadhanarrao@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chaturang@expressindia.com