राजन गवस बारावीचा निकाल लागला. पालकांची आता भलतीच लगबग. कुठं प्रवेश घ्यायचा, कोणतं महाविद्यालय, कोणती शाखा. समुपदेशन करणारे, मार्गदर्शन करणारे यांचा धंदा एकदम तेजीत. पालकांचे - मुलांचे एकत्र वर्ग, फक्त पालकांसाठी वेगळे वर्ग. इतके पर्याय, इतक्या शाखा, इतक्या ठिकाणी उज्ज्वल भवितव्य! या शाखेला सध्या प्रचंड मागणी. असं आणि यासारखं बरंच काही. प्रचंड मार्क मिळवलेली मुलं-मुली एकदम हवेत. मध्यम मार्क मिळवणारे थोडेफार खूश तर कमी मार्क मिळवणारे एकदम चिंताक्रांत. ‘आपल्या मुलाचे आता काय होणार?’ नापासांच्या घरात सुतक. आता संपलंच सारं. अर्थच उरला नाही कशात. असलं दरिद्री करट आमच्याच पोटी कसं जन्माला आलं? सटवाई आमचंच नशीब लिहिताना झोपली होती का? असलं बरंच काय काय. घरात कोणच कोणाशी बोलत नाही. नापास मुला-मुलींवर तर सगळ्यांचा बहिष्कार. यानं कायतरी भयंकर पातक केलंय अशा नजरा. नापास मुला-मुलीला तर मेल्याहून मेल्यासारखं. आता जगण्यात अर्थच नाही. कशाला जगायचं? या काळात वर्तमानपत्रात कुठं ना कुठं बातमी झळकतेच नापास मुलानं किंवा मुलीनं केली आत्महत्या. एक निरागस जीवन बेचिराख. याच काळात वर्तमानपत्रातही भरलेले असतात रकाने. मार्गदर्शनच मार्गदर्शन. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यानं चांगल्या मार्कानं पास व्हावं, त्याला चांगलं शिक्षण मिळावं असं वाटणं स्वाभाविक. पण आपण आपल्या आयुष्यात जे करू शकलो नाही ते आपल्या पाल्यानं करावं असं वाटणं अस्वाभाविक. या अस्वाभाविकपणाचाच आढळ आता सार्वत्रिक. यातूनच मुला-मुलींना दिवसरात्र खाजगी शिकवण्या, सराव परीक्षा, अभ्यास आणि अभ्यास असल्या दुष्टचक्रात पिळून काढण्यात धन्यता. या साऱ्या ताणतणावात मुला-मुलींचं बालपण पारच होरपळून जातं. हा विचार आता कालबाह्य़. स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेत टिकायचं असेल तर गाफील राहून उपयोगी नाही. पाळणाघरातच वेगवेगळ्या स्पर्धाचं बाळकडू. परंपरागत गावठी गुटी आता पाजतच नाही बाळाला. फक्त स्पर्धा उगळायची, स्पर्धा पाजायची. असा सगळा जमाना. अशा सगळ्या वावटळीत मूलभूत शिक्षणाच्या संकल्पनेचं काय झालं? असा प्रश्न मनात उगाचच उगवतो. महात्मा फुले, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. जे. पी. नाईक हे सारे ज्या माणूस घडवण्याबाबत बोलत होते तो माणूस या शिक्षणातून गायबच झाला. पदव्यांची भेंडोळी आणि बेकारांच्या फौजा हेच या शिक्षणाचं फलित असं कोणी म्हटल्यास नीट प्रतिवाद करता येणं कठीण. या सर्वाबाबत मला फारसं काही म्हणायचं नाही. पण हे सगळं मेंदूत खळखळायला लागलं की मनात प्रश्न येतो, माझे श्रम चोरले कुणी? किंवा हा प्रश्न असा बदलून घेऊ की माझ्यातल्या श्रमनिष्ठेला हद्दपार कोणी केले? तुम्ही म्हणाल, या प्रश्नाचा या सगळ्याशी संबंध काय? माझं म्हणणं असं, की या सगळ्याचाच या प्रश्नाशी थेट संबंध आहे. पुढं कसा? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक. त्याचं उत्तर द्यायचं झालं तर मला थोडं आत्मचरित्र अनिच्छेने का असेना पण सांगावंच लागेल. तर आमच्या वाडवडिलात शिकलेलं कोणीच नव्हतं. पहिल्यांदा शाळेचा उंबरा ओलांडला मी आणि माझ्या भावानं. दाबजोर जमीन होती पण भांडणात थोडीच शेती वाटय़ाला आली म्हणून आईनं तिरपटलं शाळेत. पुस्तकाशी जोडला गेलो. शाळेला जात असलो तरी घरची आणि शेतीची सगळीच कामं करावी लागायचीच. त्यातून सुटका नाही. शाळेच्या वेळेपर्यंत सकाळी गुरढोरं फिरवून आणायची, गोठय़ातलं शेण भरून टाकायचं, गोरणीतला चगाळा गोळा करून बाहेर टाकायचा मग धावत पळत शाळेत. तर प्रार्थना झालेली असायची. संध्याकाळी शाळेतून आलं की पुन्हा जनावरांना फिरवणं, कोंबडय़ा झाकणं, गवत टाकणं ही नेहमीचीच आमच्यासाठी राखून ठेवलेली कामं. यात कधीच कुचराई चालायची नाही. झालीच टंगळमंगळ तर घरातले म्हणायचे सोड ती शाळा. गुढीपाडवा झाला की शाळेच्या परीक्षा आणि शेतीचा हंगाम एकदम यायचे. त्यामुळं नांगरट, कुळवट, वेचणी, बोचणी, बांध ओढा, सारणी काढा अशी कामं निघाली की शाळेला दांडी. काम करून चांगलं फेसलून आलं की रात्री जेवणाच्या ताटावरच पेंगायला सुरुवात व्हायची. अभ्यासाचा बबोळ. तरीही मिळेल त्या वेळेत पुस्तक वाचून वर्गात पुन्हा नंबरात असायचो. पोरं हाताखाली आली याचा वडिलांना आनंद. तर पोरांनी अभ्यास करावा ही आईची इच्छा. माझ्यासारखीच अवस्था आमच्या आख्ख्या वर्गाची. सातवी पास झालो आणि घरच्या लोकांना काय झालं कोणास ठाऊक? घरातलं कोणीच मला काम सांगेनासं झालं. आपणहून करायला लागलो तर ‘अभ्यास कर जा’ म्हणून दरडावायचे. हा सगळ्यांच्यात झालेला बदल मला भयंकर बोचायला लागला. आईला विचारलं, तर म्हणाली, ‘लेका, चांगलं शिकलास तर घराचं पांग फिटतील. तू शिक.’ कळलं काहीच नाही. पण निम्मं काम सुटलंच. दहावीपर्यंत तर श्रमाच्या कामानं राकट झालेले हात लिबलिबित होऊन गेले. सुट्टीत पुन्हा ते राकट व्हायचे पण अंगमेहनतीचं काम सुटत गेलं. माझ्या वर्गातले तीन-चार मित्र दुसऱ्याच्या बांधावर मजुरीला जाऊन शिकायचे. आमच्या वर्गातील गंगूबाई तर दररोज ऊसाच्या रानात भांगलून, शेणकाला करून, गोवऱ्या थापून दहावीपर्यंत शाळेत यायची. आम्ही सगळे शिकलो, नोकरदार झालो अंगमेहनतीचं काम कुठल्या कुठं गायब झालं. सवय सुटली. आज कासरा हातात धरला तरी तळव्याची सालटं जातात. सिलेंडर उचललं तरी कंबरेत करक भरते. तेव्हा सहज मनात येतं, माझ्यातला श्रम करणारा कुणी लंपास केला? माझ्यातला श्रम करणारा संपला आणि मी परावलंबी झालो, माझ्यातला कष्टकरी कोणी चोरला? खेडय़ापाडय़ांत शिक्षण आलं, खेडय़ाचं रुपडं पालटलं हे चांगलंच झालं. गावागावांत पदवीधर तयार झाले पण त्यांची श्रमनिष्ठा संपून गेली. शेतीचा संबंध बांधापुरताच उरला. हे सगळं माझ्या पिढीपर्यंत सुसह्य़ होतं. तोवर नोकरीची संधी होती. पण माझ्यानंतरच्या पिढीचं वर्तमानच बदललं. नोकरीच्या संधी कमी कमी होत गेल्या. आता तर नोकरीची संधीच उरली नाही. पाच-पन्नास लाख दिल्याशिवाय कोणतीच नोकरी उपलब्ध नाही. यू.पी.एस.सी./ एम.पी.एस.सी.च्या गाजरथापा पिढय़ाच्यापिढय़ा लंपास करत आहेत. गोरगरिबाच्या पोरानं कितीही पदव्या घेतल्या तरी त्याला नोकरी मिळेल अशी शक्यता आता उरली नाही. एकरभर शेत असणाऱ्या मालकाला आपल्या पाल्याला डॉक्टर, इंजिनीअर करणं शक्य नाही. त्यामुळे गावात फक्त शिकलेल्या पोरांच्या रिकामटेकडय़ा फौजा. माझ्या पिढीला किमान दहावीपर्यंत तरी शेतात राबावं लागलं. गुरंढोरं, शेणमूत काढावं लागलं. नांगरणी, पेरणी, चिखल, कोळपं, कापणी, मळणी करावी लागली. माझ्या पिढीत शिकणाऱ्या मुलींच्या पाचवीलाच शेण पाणी, दळणकांडण, वाटणचाटण, तिखटमीठ, मसालाबिसाला, भाकरीबिकरी, भांडीकुंडी, सारवणबिरवण, सडारांगोळी पुजलेलं होतं. हे करतानाच आम्ही मुलं-मुली शिकत गेलो. पण माझ्यानंतरच्या पिढीत शिकणाऱ्यानं शेणामातीत हात घालायचाच नाही अशीच नवी धारणा खेडय़ापाडय़ांतल्या पालकांच्यामध्ये भरभक्कम बळावत गेली. शाळेच्या उंबऱ्यात पाय टाकला की, मुलानं-मुलीनं फक्त शाळा एके शाळाच करायची. घरातल्या काडीलाही हात लावायचा नाही. मुलीनं पाण्याचा तांब्या उचलायचा नाही. चुलीजवळ येणं तर दूरच. आपल्या मुला-मुलींना अंगमेहनतीचं काम न करताच शिकलं पाहिजे म्हणजे या स्पर्धेत तो टिकेल अशी खुळचट धारणा सर्वाच्याच मनात घर करून बसली. त्यामुळे मुलांना श्रमाची सवयच राहिली नाही. त्यांनी शेताचे बांध बघितले नाहीत, जनावरांचा गोठा बघितला नाही, मातीत पाय ठेवणे तर दूरच. याचा विपरीत परिणाम गावगाडय़ावर झाला आणि गावगाडा केविलवाणा बनला. आज गावात पदवी घेऊन उनाड फिरणारे दोन-तीनशेच्या घरात पोरं दिसतील. पण गावात शेतकामाला मजूर मिळायला तयार नाही. एकादं दुसरं जनावर पाळावं तर पेंडीचा भारा आणायला हात नाही. एक-दोन एकर जमीन आहे पण कसायला माणूस नाही. दारातलं गटर तुंबलं तर खोरं हातात घ्यायला कोणी तयार नाही. आठवडाभर आईबापानं दूध पिळून डेरीला घालायचं, दहा दिवसानं बिलाला मात्र पोरगा हजर. दहावी-बारावी शिकलेल्या मुलीलाही भरभक्कम पगाराचा नवरा हवा. तो मिळालाच नाही तर शिपाई, झाडूवाला चालेल पण शेतकरी नको. भाकरी थापणं दूरच, पोळीचा आकारही भारताच्या नकाशासारखा. भरली घागर उचलणे सोडाच तांब्या घासणेही जिवावर येणारी ही पिढी. श्रमापासून कैक कोस दूर गेली. फक्त पंख्याखाली बसून श्रम न करता पसाच पसा मिळाला पाहिजे यासाठी ऊर फुटेपर्यंत निर्थक धावणे. यामुळे विद्रुप झालं खेडं. खेडय़ातल्या माणसातली झालेली ही श्रमचोरी खेडय़ालाच बकाल करणारी ठरली. हे रखरखीत वास्तव सगळ्यांच्या समोर आहे. पण याच्यावर उत्तर शोधलं पाहिजे असं कुणालाच का वाटत नाही? आमच्या गावगाडय़ात शिक्षण आलं आणि त्यानं आमचं मनगट बुळं केलं. याचा अर्थ कोणी असाही काढू शकेल, की माझा शिक्षणाला विरोध आहे, खेडय़ापाडय़ांतील, गावगाडय़ातील मुलं शिकताहेत हे यांना पाहवत नाही. हे शिकलं, यांचं जगणं बदललं तसं इतरांचं बदलावं, असं यांना वाटत नाही. पण असं बिलकुल नाही. माझा विरोध शिक्षणाला नाही; तर खेडय़ातल्या श्रमाची चोरी करणाऱ्या शिक्षणव्यवस्थेला आहे. आम्ही श्रमनिष्ठ शिक्षणव्यवस्था विकसित केली नाही. मातीची, शेणाची, पशू-पक्ष्यांची लाज निर्माण करणारं शिक्षण मुलांना देत गेलो, स्पर्धेच्या नावाखाली त्यांच्यातील माणूसपण विकसित करणं विसरून गेलो, वयाच्या पंचविशीपर्यंत फक्त शिकत राहायचं आणि घरच्या खानावळीत विनाकष्ट जेवायचं. असल्या शिक्षणातून आपण कोणता समाज घडवणार आहोत याचं उत्तर कोणी देत नाही. कर्मवीर अण्णांनी भारतीय शिक्षणात ‘कमवा आणि शिका’ ही अभिनव संकल्पना मांडली. तिची आपण टर उडविण्यात धन्यता मानली. आणि फक्त मुलामुलींना अक्षर शिकवत माहितीच्या पाठीमागे धावायला भाग पाडले. खेडय़ापाडय़ांत गावगाडय़ांत आजच्या काळात किंचित तरी मातीचा संबंध येतो, झाडं, फुलं, पशू, पक्षी, गुरं, ढोरं इच्छा नसली तरी पहावी लागतात, त्यांच्यासोबत वाढावं लागतं. शहरातल्या मुलांना मात्र फक्त धावणं आणि धावणं. कुठल्यातरी खुराडय़ात दिलं जाणारं शिक्षण नावाची गोष्ट. खाजगी शिकवण्या आणि पालकांचा पोलिसी पहारा यातच कोमेजून जातं त्यांचं भावविश्व. अशा मुलांनी धावायचं तरी किती आणि कसं? ज्ञाननिर्मिती झाली पाहिजे, ज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे असे मुलात बिंबवण्याऐवजी नोकरचाकर निर्माण करणं हेच आपणास महत्त्वपूर्ण कार्य वाटलं. पण यातून झालेली श्रमाची चोरी, ते चोरी करणारे दरोडेखोर कोण असा पुढच्या पिढय़ांनी प्रश्न उपस्थित केला तर जबाबदार कोणाला धरायचे? chaturang@expressindia.com