पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१५ मध्ये स्त्रीवाद्यांनी दहेग येथे स्त्रियांची पहिली ‘आंतरराष्ट्रीय शांतता परिषद’ भरवली होती. तेव्हापासून स्त्रियांच्या सर्वच परिषदांमध्ये युद्धविरोधी भूमिका घेण्यात आली. २४ मे हा शांतता आणि नि:शस्त्रीकरण दिवस म्हणून जाहीर झाला असून जगभरातील लष्करशाही आणि युद्धखोरीविरुद्ध संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतातही पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ केलं गेलं. आता ‘सीझफायर’नंतर अनेक जण शांततेसाठी एकत्र येत आहेत. स्त्रियांच्या चळवळींनी आणि शांततावादी नागरिकांनी दिलेला ‘युद्ध नको, शांती हवी’ हा विचार पुढे न्यायलाच हवा.

डॅन्यूब नदीच्या काठावर हंगेरीची राजधानी बुडापेस्ट हे शहर वसलेलं आहे. नदीकिनाऱ्याच्या जवळच हंगेरियन पार्लमेंटची दिमाखदार इमारत आहे. ती पाहून पर्यटक नदीच्या पूर्वेकडील काठावर येतात. तेव्हा त्यांना विविध मापांतील, आकारांतील लोखंडी साच्यात तयार केलेले ६० बुटांचे जोड दिसतात. ‘शूज ऑफ द डॅन्यूब बँक’ नावाचं हे स्मारक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘नाझीवादा’च्या विचाराने प्रेरित ‘हंगेरियन एरो क्रॉस पार्टी’च्या गोळीबारात बळी ठरलेल्या ज्यू लोकांच्या स्मरणार्थ हे स्मारक १६ एप्रिल २००५ रोजी निर्माण केलं गेलं. सिने दिग्दर्शक कॅन टोगई आणि शिल्पकार ग्युआला पॉअर या कलाकारांची ही संवेदनशील निर्मिती पाहताना डोळ्यात पाणी येतं, मन उदास होतं. ते बूट घालणारे, जीव गमावलेले स्त्री, पुरुष, छोटी मुलं नजरेसमोर उभी राहतात. हा अनुभव मी घेतला आहे.

मानवी इतिहासात कधीही न घडलेली हिंसा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडली. जगातील सर्वच राष्ट्रं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या या युद्धात भरडली गेली. मृतांची संख्या सहा कोटींपर्यंत गेल्याची शक्यता वर्तवली जाते. जर्मन, पोलंड आणि रशियात सर्वाधिक बळी गेले. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि रशियातील अनेक शहरे हवाई हल्ल्यात बेचिराख झाली. ही शहरं पुन्हा उभी करण्यासाठी पुढची अनेक दशकं साधनसंपत्ती खर्च करावी लागली.

या युद्धाच्या सर्वात जास्त बळी ठरल्या त्या स्त्रिया. युद्धकाळात अनेक स्त्रियांना पती आणि तरुण मुलांच्या मृत्यूचं दु:ख सहन करावं लागलं. अनेकांचे नवरे बेपत्ता झाले. स्त्रियांच्या वाट्याला पराकोटीचं एकटेपण आलं. कित्येकांचं घरदार नष्ट झालं. याही परिस्थितीत स्त्रिया घराबाहेर पडून काम करू लागल्या. त्यांनी कष्टाने मुलांचं संगोपन केलं. युद्धाच्या दाहक अनुभवाने मानवी जीवनात नात्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले.

राष्ट्राराष्ट्रांतील संघर्ष मानवी जीवन उद्ध्वस्त करतो. आंधळा राष्ट्रवाद मानवी सहजीवनाची होळी करतो. वर्षानुवर्षं अनेक पिढ्यांनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेली मानवी संस्कृती आणि सभ्यता युद्धामुळे काही क्षणांत नष्ट होते. याची जाणीव युरोपीय देशांना झाली. त्यातूनच राष्ट्राराष्ट्रांमधील संबंध संघर्षापेक्षा सहकार्यावर आधारित असायला हवेत, हा विचार रुजला. युरोपीय ऐक्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय वास्तवातून अमेरिकेत आणि युरोपमध्ये स्त्रीवादाची दुसरी लाट (सेकंड वेव्ह ऑफ फेमिनिझम) निर्माण झाली. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रिया शांतीचा, युद्धविरोधाचा विचार करू लागल्या. त्यांनी जोरदारपणे ‘युद्ध नको, शांती हवी’, ‘वुई वॉन्ट पीस’ या घोषणा दिल्या.

‘सवत येणं, विधवा होणं, अपत्याचा मृत्यू, माता-पित्याचं छत्र नाहिसं होणं या घटना स्त्रियांच्या जीवनात दु:ख निर्माण करतात,’ असे तथागत गौतम बुद्धांनी म्हटलं आहे. शांतताप्रेमी लोक ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशी घोषणा देतात. युद्धात कुटुंबीय गमावण्याची वेदना स्त्रियांच्या वाट्याला येतेच. तसेच युद्धकाळात स्त्रियांना लैंगिक अत्याचार, अपहरण, उपासमार सहन करावी लागते. युद्धामुळे निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणात स्त्रियांचं रोजचं जगणं मुश्कील बनतं. आपलं घरदार, कष्टाने उभा केलेला संसार सोडून जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याची वेळ स्त्रियांवर येते. अनेकदा मुला-बाळांची, आप्तांची ताटातूट होते. सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धात, गाझा पट्टीतील इस्रायल पॅलेस्टिनी तसेच सीरियात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीत अनेक स्त्रियांच्या वाट्याला असं दु:ख, वेदना आल्या आहेत. या वेदना युद्धकाळात दुर्लक्षित केल्या जातात.

युद्ध पुरुषसत्ताक व्यवस्थेची निर्मिती आहे, अशी परखड भूमिका स्त्री चळवळीने मांडली. युद्धाचे निर्णय सत्तेतील पुरुष घेतात. दोन राष्ट्रांमधील सत्तासंघर्षात सामान्य माणसं, स्त्रिया, लहान मुलं भरडली जातात हे वास्तव स्त्रियांच्या चळवळीने पुढे आणलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१५ मध्ये स्त्रीवादींनी दहेग येथे स्त्रियांची पहिली ‘आंतरराष्ट्रीय शांतता परिषद’ घेतली होती. तेव्हापासून स्त्रियांच्या सर्वच परिषदांमध्ये युद्धविरोधी भूमिका घेण्यात आली.

१९८० मध्ये युरोपमध्ये स्थापन झालेल्या शांततावादी स्त्रियांच्या संघटनेने शस्त्रास्त्र आणि अण्वस्त्र निर्मितीला विरोध केला. त्या वेळी २४ मे हा शांतता आणि नि:शस्त्रीकरण दिवस म्हणून जाहीर झाला. जगभरातील लष्करशाही आणि युद्धखोरीविरुद्ध संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. १९८८ मध्ये फिलिपिन्समधील स्त्रियांनी ‘विमेन से नो टू टोटल वॉर’ असे फलक हातात घेऊन मशाल मोर्चा काढला. या चळवळींमुळे जागतिक संघटनांचे लक्ष युद्धात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे वेधलं गेलं. गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांच्या शांततावादी संघटना बांधण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत.

वरील प्रयत्नांमुळे युद्धग्रस्त भागातील स्त्रिया आणि मुलांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी ‘युनिसेफ’ने धोरण जाहीर केलं. आरोग्य, शिक्षण, सकस आहार, मानसिक आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले तसेच हिंसा आणि शोषणाला बळी ठरलेल्या स्त्रिया आणि मुलांसाठी मानवीय साहाय्य आणि संरक्षणासाठी निधी (Humanitarian Aid) उपलब्ध करून दिला.

२०२२ मध्ये सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध अद्याप थांबलेलं नाही. युक्रेनसारख्या छोट्या देशातील सामान्य माणसांच्या जगण्यावर या युद्धाचे भयावह परिणाम झाले आहेत. स्त्रियांना लैंगिक भेदभाव आणि अत्याचाराचा सामना करावा लागतो आहे. उपासमार, विस्थापन सहन करावं लागलं आहे. ‘युनायटेड नेशन्स विमेन’च्या २०२४च्या अंदाजानुसार १४.६ लाख लोकांपैकी ५६ टक्के स्त्रिया आणि मुलींना मानवीय साहाय्याची गरज आहे. हीच परिस्थिती गाझा पट्टीत सुरू असलेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षात झालेली आहे. त्यातही बहुसंख्य पॅलेस्टाईन स्त्रिया हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत. त्यांना साध्या आरोग्य सेवा मिळू शकत नाहीत. उपासमार सहन करावी लागते. हजारो माता मुलं गमावून बसल्या आहे, तर असंख्य मुलं अनाथ झाली आहेत. कित्येक वर्षांपासून इस्रायलचे पॅलेस्टाईन भूमीवरील अतिक्रमण आणि मानवाधिकारांचे उल्लंघन सुरू आहे. त्याविरुद्ध झालेल्या शांतता चळवळीत स्त्रियांचा सहभाग मोठा आहे. इस्रायली ज्यू स्त्रियांबरोबरच पॅलेस्टिनी इस्रायली स्त्रियाही या चळवळीत सहभागी होत्या. स्त्री चळवळीतील भगिनीभावाने राष्ट्रांच्या सीमा ओलांडून एकमेकींना साथ दिली. इस्रायलची ‘विमेन इन ब्लॅक’ संघटना सातत्याने इस्रायलच्या लष्कराला विरोध करते आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. त्याने संपूर्ण देश हादरला. सर्वांनीच या घटनेचा तीव्र निषेध केला. या काळात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले. त्या स्त्रियांनीही अत्यंत संयमी आणि विवेकी प्रतिक्रिया दिल्या. या कठीण प्रसंगी मदत करणाऱ्या काश्मिरी जनतेचे आभार मानले. केरळच्या आरती सराह म्हणाल्या, ‘‘मी माझे वडील गमावले, पण काश्मीरने मला मुसाफिर आणि समीर हे दोन भाऊ दिले.’’ तर या हल्ल्यात पती गमावलेल्या हिमांशी नरवाल म्हणाल्या, ‘‘सगळ्या देशवासीयांनी माझ्या पतीसाठी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. मला कोणाचाच द्वेष करणं मान्य नाही. सध्या मुसलमान आणि काश्मिरी जनतेच्या विरोधात द्वेष पसरवला जातो आहे. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला शांती हवी आहे. न्याय हवा आहे. माझ्या पतीला मारणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी’’.

पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ केलं. आपल्या घरात टीव्हीसमोर बसून युद्धज्वर डोक्यात गेलेले लोक समाजमाध्यमावरून द्वेष पसरवणाऱ्या, भडकवणाऱ्या पोस्ट टाकू लागले. काही माध्यमे त्यात तेल ओतू लागली. खोट्या बातम्या देणाऱ्या माध्यमांची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. आता ‘सीझफायर’मुळे युद्ध थांबलं असलं तरी अनेक सैनिक शहीद झाले. त्यानिमित्ताने मला मेहमूद दरवेश यांची कविता आठवली…

‘वह बोली: हम कब मिलेंगे?

मैने कहा: युद्ध समाप्त होने के बाद

वह बोली: युद्ध कब समाप्त होगा?

मैने कहा: जब हम मिलेंगे.’

युद्धात अनेकांच्या मीलनाची आशा मारली जाते. सीमेवर काय घडतं? सीमेलगत राहणाऱ्या जनतेला काय भोगावं लागतं, याचं भान जबाबदार नागरिकांनी बाळगायला हवं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देशवासीयांना दिली. सगळा देश या दोघींचं कौतुक करतो आहे. याच वातावरणात लेफ्टनंट पत्नी हिमांशी नरवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांच्या मुलीला समाजमाध्यमावर ट्रोल केलं गेलं. ही सगळी संवेदनशून्य माणसं आहेत का, असा प्रश्न पडतो. हा अतिरेकी राष्ट्रवाद देशाचं नुकसान करणारा आहे. स्त्रियांना असं लक्ष्य करणं पुरुषी विकृती आहे. त्यातूनच भाजपचे मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहा यांनी आता माफी मागितली असली तरी त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेलं अपमानास्पद आणि वेदनादायी विधान कसं पुसलं जाईल?

याच काळात अनेक आशादायक घटना घडल्या. पाकिस्तानातील पुरोगामी लेखक संघाने लाहोरमध्ये आणि भारतात पंजाबमधील ‘लोकसंस्कृती मंच’ने युद्धाला विरोध करत शांततेसाठी आवाहन करणाऱ्या मिरवणुका काढल्या. १३ मे रोजी दिल्ली शहरात ‘नो वॉर’, ‘अमन के हम रखवाले’ म्हणत स्त्रियांनी मोर्चा काढला, तर लंडनमधील काही भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी कुटुंबीयांसमवेत रस्त्यावर एकत्र येऊन आपापल्या देशाचे झेंडे हातात घेऊन दोन्ही देशांनी शांतता पाळावी अशी गाणी म्हटली. दोन्ही देशांतील सामान्य जनतेला युद्ध नको आहे.

युद्धखोरी मानवतेच्या प्रवासातील अडथळा आहे. शांततेला, संवादाला पर्याय नाही. स्त्रियांच्या चळवळींनी आणि शांततावादी नागरिकांनी दिलेला ‘युद्ध नको, शांती हवी’ हा विचार पुढे न्यायला हवा, तरच स्त्रियांच्या वाट्याला युद्धाने दिलेली दु:खं येणार नाहीत. अतिरेकी राष्ट्रवादाला नकार देत स्त्री चळवळींना हे आव्हान पेलावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

advnishashiurkar@gmail.com