पावसाळी चराचे खोदकाम सुरु असताना मातीचा मोठा भाग अंगावर कोसळून त्यात दहा महिला मजूर ठार झाल्याची दुर्घटना तेलंगणातील नारायणपेट भागात बुधवारी घडली. या दुर्घटनेतील मृतांमध्ये सर्वच्या सर्व महिला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नारायणपेट येथील तिलेरू गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत (मनरेगा) पावसाळी चर खोदण्याचे काम सुरु होते. दरम्यान, एका बाजूचा मातीचा काही भाग १२ महिला मजुरांच्या अंगावर कोसळला. ही घटना एव्हढी भीषण होती की, त्यात दबल्यामुळे दहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण यात जखमी झाला आहे. या मृत महिलांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच जखमींनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला असून संबंधीत यंत्रणेला गरजूंना आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले आहेत.