दीप सिद्धूवर टीका केली म्हणून एका अभिनेत्रीला धमकावण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोनिया मान असे या अभिनेत्रीचे नाव आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तिकरी सीमेवर असल्याचा दावा सोनिया मानने केला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान दिल्लीत मोठया प्रमाणात हिंसाचार झाला. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामध्ये दीप सिद्धूचे नाव समोर आले आहे. दीप सिद्धूला त्यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. अभिनयाकडून समाजकारणाकडे वळलेल्या दीप सिद्धूने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. "मला एका खासगी नंबरवरुन फोन आला. त्यावेळी समोरच्या माणसाने दीप सिद्धू विरुद्ध बोलल्यास, गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी मला धमकी दिली" असा आरोप सोनिया मानने केला आहे. सोनियाने अजून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. आणखी वाचा- ‘तुम्हाला लाज वाटत नाही?’ दीप सिद्धूची शेतकरी नेत्यांना ‘सिक्रेट’ उघड करण्याची धमकी "प्रजासत्ताक दिनी जे घडले, त्यामुळे शेतकऱ्यांची बदनामी झाली. भगत सिंग, उधम सिंग, यांच्यासारख्या थोर व्यक्तींच्या बलिदानामुळे आपल्याला तिंरगा मिळाला, त्याचा आदर केला पाहिजे. तिरंग्याची प्रतिष्ठा कमी होईल, असे कुठलेही कृत्य आम्ही केलेले नाही. पण दीप सिद्धू सारख्या काही जणांमुळे आम्हाला राष्ट्रविरोधी ठरवले जातेय" असे सोनिया मान म्हणाली. सोनियाचे वडिल बलदेव मान यांची २६ सप्टेंबर १९९० रोजी अमृतसरमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सोनिया फक्त १६ दिवसांची होती. तिचे वडिल डाव्या विचारांचे आणि लेखक होते. दीप सिद्धू त्याच्यावरील आरोपांबद्दल काय म्हणाला? हिंसाचाराला चिथावणी देऊन शेतकरी आंदोलनाला बदनाम केल्याचा संयुक्त किसान मोर्चाने केलेला आरोप दीप सिद्धूने फेटाळून लावला. त्याने सोशल मीडियावरुन लाईव्ह करुन आपली बाजू मांडली. “मी गुपित सांगायला सुरुवात केली, तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना कुठे लपायच ते समजणार नाही” असे दीप सिद्धू म्हणाला. “तुम्ही निर्लज्जपणे मला जबाबदार धरताय. तुमच्या निर्णयाच्या आधारावर लोक संकल्प करुन, ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीत आले होते. लोक तुमचा शब्द मानतात. लाखो लोक माझ्या नियंत्रणाखाली कसे राहू शकतात? मी लाखो लोकांना चिथावणी देऊ शकतो, मग तुमचं महत्त्व काय ? दीप सिद्धूला कोणी मानत नाही, त्याचं योगदान नाही. मग मी लाखो लोकांना घेऊन तिथे आलो, हे तुम्ही कसं म्हणू शकता?” असा सवाल दीप सिद्धूने केला. सोशल मीडियावरुन लाईव्ह करताना सिंघू सीमेच्या जवळ असल्याचे त्याने सांगितले.