संचारबंदी उठविली
तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर आणि परिसरात लागू करण्यात आलेली संचारबंदी आज (रविवार) उठविण्यात आली असून अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरूवात झाली आहे. जम्मू-काश्मिरच्या रामबन जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती.
“काल शनिवारी परिस्थिती चांगली होती. कोणतीही हिंसक घटना घडली नसल्याने लागू करण्यात आलेली संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे पोलीस अधिका-याने  सांगितले.
गुरूवारी काही जणांनी बीएसएफ जवानांच्या तळावर दगडफेक केल्यामूळे जवानांनी गोळीबार केला होता. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तर, बीएसएफने गोळीबारात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. निदर्शकांनी यात चार जण ठार झाल्याचा आरोप केला आहे.