राज्य सरकारचा कोणताच धाक नसल्यामुळे आझमगढ म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी केला. आझमगढमधील एका प्रचारसभेतच त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना गुजरातमधील बॉम्बस्फोटांचा हवाला देत आझमगढमधून कसे दहशतवादी तयार होतात, यावर भाष्य केले.
ते म्हणाले, राज्य सरकारचा कोणताच धाक नसल्यामुळे आझमगढ दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. दहशतवाद्यांची वकिली करण्यातच राज्य सरकार मश्गूल आहे. गुजरातमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आझमगढमधून आले होते. त्यावेळी गुजरातचा गृहमंत्री असल्यामुळे मी त्यांना अटक केली. त्यानंतर गुजरातमध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही.
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानी घुसखोर त्यांच्या हद्दीत ३० किलोमीटरपर्यंत माघारी जातील, असाही दावा शाह यांनी केला.