उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये अॅपल कंपनीचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी हत्याकांड प्रकरण दाबण्यासाठी आणि आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी युपी पोलिसांकडून शक्य तो प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिवारी यांना गोळी मारल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याऐवजी तिवारी यांची सहकारी सना खान यांच्याकडून आपल्याला हवी तशी एफआयआर दाखल करुन घेतल्याचे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे. दरम्यान, विवेक तिवारी यांच्यावर रविवारी लखनऊच्या वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक आणि शिक्षण मंत्री आशुतोष टंडन उपस्थित होते.

ही एफआयआर दाखल करताना पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना अत्यंत हुशारीने वाचवले आहे. या तक्रारीत संबंधीत आरोपी पोलीस कर्मचारी उपस्थितच नसल्याचे यात म्हटले आहे. मात्र, पोलीस अधिकारी कौशलराज शर्मा यांनी तिवारी यांच्या कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेऊनही तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

न्यू हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या विवेक तिवारी यांनी पोलीस कर्मचाऱ्याने त्यांची सहकारी सना खान यांच्यासमोरच गोळी मारली होती. पोलिसांनी हे प्रकरण बराच काळ दाबून ठेवले मात्र, त्यानंतर दबाव वाढायला लागल्यांतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तक्रार सना यांच्याकडूनच दाखल करण्यात आली. गोमतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत पोलिसांनी स्वतः दोन पोलीस कर्मचारी बाईकवरुन आल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, तिवारी यांच्यावर कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याने गोळी चालवली याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

दरम्यान, तक्रार दाखल करताना पोलिसांनी आमच्याशी चर्चा का केली नाही, असा आरोप तिवारी यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी असे जाणून बुजून केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोर्टात आरोपींना मदत मिळावी तसेच हे प्रकरण कमजोर करण्याचा त्यांचा डाव असल्याचे मृत तिवारींच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणीही तिवारी यांच्या कुटुंबियांनी केली आहे.