अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून म्हणजेच १५ जानेवारीपासून त्यासाठी निधी संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय यांनी दिली. निधी संकलन हे मकर संक्रांतीपासून सुरू होणार असून ते माघ पौर्णिमेपर्यंत जारी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "अयोध्येत ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंदिरासाठी देशभरातील प्रत्येर राम भक्ताची मदत घेतली जाणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जातील," असं चंपत राय यांनी सांगितलं. मकर सक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत सुरू राहणाऱ्या निधी संकलन कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चार लाख गावांच्या ११ कोटी कुटुंबीयांशी संपर्क साधणार आहेत. तसंच त्यांना श्री राम जन्मभूमीशी जोडून त्याचा प्रचारबी करतील. देशातील प्रत्येक जाती, मताच्या, पंथाच्या आणि संप्रदायाच्या लोकांच्या सहयोगातूनच राम मंदिर वास्तवात एक राष्ट्र मंदिराचं रूप घेईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातील गावांमध्ये आणि शहरांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या अभियानात भक्तांनी स्वैच्छिकरित्या केलेली आर्थिक मदत स्वीकारली जाणार आहे. तसंच यासाठी १०, १०० आणि १ हजार रूपयांचे कुपन्स उपलब्ध असतील. कोट्यवधी घरांमध्ये या भव्य मंदिराची प्रतीमा पोहोचवली जाणार असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलं. जनसंपर्काचे कार्य मकरसंक्रांतीस सुरू होणार जन्मभूमी परत मिळवण्यास लाखो भक्तांनी हाल सोसले, मदत केली. त्याच पद्धतीने कोट्यवधींच्या स्वैच्छिक सहयोगाने हे मंदिर उभे राहावे अशी आमची इच्छा आहे. जेव्हा जनसंपर्क केला जाईल तेव्हा लाखो कार्यकर्ते गाव, वस्त्यांमध्ये जातील तेव्हा समाज स्वाभाविकच काही ना काही मदत नक्कीच करेल. देवाचे कार्य आहे, मंदिर देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये पैसा ही अडचण ठरू शकत नाही. समाजाचे समर्पण कार्यकर्ते स्वीकारतील. आर्थिक विषयात पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आम्ही दहा रुपये, शंभर रुपये, एक हजार रुपये अशी कूपन आणि पावत्या छापल्या आहेत. समाज जशी मदत करेल त्याला अनुसरून कार्यकर्ते पारदर्शकतेसाठी कूपन किंवा पावत्या त्यांना देतील. कोट्यवधी घरांमध्ये मंदिराचे चित्र पोहोचेल. जनसंपर्काचे हे कार्य मकरसंक्रांतीस सुरू होईल व माघ पौर्णिमेस पूर्ण होईल, असं त्यांनी यापूर्वी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.