अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित होत आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी या संदर्भात बैठक पार पडली. ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने तसे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. मात्र, नेमकं कोणत्या दिवशी भूमिपूजन करायचं या संदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार आहे.

प्रस्तावित राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात आले असल्याची माहिती, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर दिली. आराख़ड्यातील य़ा बदलानुसार मंदिरास आता पाच घुमट असणार आहेत. शिवाय, मंदिराची लांबी, रुंदी व उंची देखील वाढवण्यात आलेली आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच, न्यासामध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शनिवारी  रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या झालेल्या बैठकीत राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह अकरा सदस्यांची उपस्थिती होती. तर अन्य चारजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

सध्या जगभरासह देशात थैमान घालत असलेल्या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मंदीर निर्माण कार्यात अडथळे न उद्भवल्यास, भूमिपूजनानंतर साधारण साडेतीन वर्षात मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.