उत्तर प्रदेशातील दलित खासदार छोटेलाल खारवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तक्रार केल्यानंतर आता आणखी एका दलित खासदाराने पंतप्रधानांना पत्र लिहून दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. मी केवळ आरक्षणामुळे खासदार झालो असा दावा उत्तर प्रदेशातील नागिना येथील भाजपा खासदार यशवंत सिंह यांनी केला आहे.

यशवंत सिंह यांनी त्यांच्या पत्रात केंद्र सरकारने देशातील दलितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. मी केवळ आरक्षणामुळे खासदार झालो, तुम्ही माझ्या क्षमतेचा वापर करुन घेतला नाही. केंद्र सरकारने देशातील दलित लोकसंख्येसाठी काहीही केले नाही. चार वर्षात देशातील ३० कोटी दलितांसाठी काहीही केले नाही असे यशवंत सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

एसी/एसटीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. यापूर्वी खासदार छोटेलाल खारवार यांनी योगी आदित्यनाथाबद्दल पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. योगींनी आपल्याला वाईट वागणूक दिली असा त्यांनी आरोप केला होता.