‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या या मोहिमेला देशवासीयांनीही चांगला प्रतिसाद दिला. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह इतर भाजपा खासदारांनी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मोहिमेचे नेतृ्त्त्व केले. भाजपाचे मंत्री आणि खासदार या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. येत्या २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं १५० वं वर्ष आहे. त्याचमुळे संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्याचा मुद्दा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मांडला. त्यामुळे आम्ही ही बाब कृतीत आणली आणि हा परिसर स्वच्छ केला. पुढील आठवड्यात मी मथुरा या ठिकाणी जाणार आहे तिथेही अशाच रितीने स्वच्छता मोहीम राबवली जाईल असेही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.

हेमा मालिनी यांनी मथुरा या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्यांसोबत काम केले तेव्हा त्यांच्यावर विरोधकांनी बरीच टीका केली होती. एप्रिल महिन्यात हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांना रस्त्यातून जात असताना सोनेरी रंगाची भाताची पेंड दिसली. त्यामुळे त्या कापणीसाठी उतरल्या असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले मात्र त्या प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहेत असा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता. आता स्वच्छ भारत अभियानावरूनही हेमा मालिनी यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.