भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या आशयाचा एक ट्विटच राहुल गांधी यांनी पोस्ट केला आहे. भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत असं म्हणत त्यांनी नमो, अरूण जेटली, राजनाथ सिंह अशी नावं लिहिली आहेत. त्यापुढे काही रिकाम्या ओळी लिहून सगळेच चौकीदार चोर आहेत अशी टीका केली आहे. BJP ke sare Chowkidar Chor Hai. NoMo Arun Jaitley Rajnath Singh ——- ——- ——- — Rahul Gandhi (@RahulGandhi) March 22, 2019 भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी १८०० कोटी रुपये भाजपाच्या केंद्रीय समितीला वाटले असा आरोप काँग्रेसने केला आहे. याच संदर्भातली एक बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनीही भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत असे ट्विट केले आहे. द कॅरावानने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे येडियुरप्पांवर हे आरोप काँग्रेसने केले आहेत. तसेच यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचीही मागणी केली आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळा केला आणि अनिल अंबानींना ३० हजार कोटींचे कंत्राट मिळवून दिले असा आरोप राहुल गांधी यांच्यासह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसंच चौकीदार चोर आहे हे वाक्यही राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात वारंवार वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरबदल केले, त्याची किंमत वाढवली असेही आरोप केले आहेत. तसेच सामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून अनिल अंबानींचे खिसे भरले असाही आरोप वारंवार करण्यात आला आहे. मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे पंतप्रधान म्हणून नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणांमधून वारंवार केली. ज्याचाच आधार घेत काँग्रेसने चौकीदार चोर है ही मोहीम राबवली. राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या या मोहिमेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर मै भी चौकीदार अशी मोहीम सुरु केली. त्यानंतर त्यांना सगळ्याच भाजपा नेत्यांनी फॉलो करत आपल्या नावापुढे मै भी चौकीदार हे लावून ट्विटरवर नावं बदलली. आता याच गोष्टींचा आधार घेत भाजपाचे सगळे चौकीदार चोर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. या टीकेला आता भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.