१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशभरातील CBSE बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर आता विद्यार्थी उत्सुकतेने त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत. मात्र परीक्षेचा निकाल कोणत्या आधारावर लावला जाईल, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दहावी, अकरावीच्या अंतिम परीक्षा गुणांच्या आणि १२वीच्या पूर्व बोर्डाच्या गुणांच्या आधारे निकाल तयार करू शकेल, अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे.

काय आहे ३०:३०:४० फॉर्म्युला?

सीबीएसईने नियुक्त केलेली १३ सदस्यीय समिती बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी ३०:३०:४० फॉर्म्युलाचा बाजूने आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास ३०% वेटेज दिले जाईल. इयत्ता १२ वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला ४०% वेटेज दिले जाईल.

१७ जूनला न्यायालयात सादर करणार फॉर्म्युला

हा फॉर्म्युला सीबीएसईने नियुक्त केलेली समिती १७ जून २०२१ ला सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर घोषित करण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात करोनामुळे परीक्षा रद्द करा, अशी जनहित याचीका पालकांनी न्यायालयात केला होती. त्यानंतर सीबीएसईने १ जूनला बारावीची परीक्षा रद्द केली होती, यानंतर अनेक राज्यांनी परीक्षा रद्द केली.

हेही वाचा- परीक्षेशिवाय कसं होणार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन? CBSE नं दिलं स्पष्टीकरण!

ऑनलाइन प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश

२०२०-२१ शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्या आणि परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या प्रयत्नात असल्याचे अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी समितीला सांगितले आहे. ज्या शाळांमध्ये प्रॅक्टिकल चाचण्या घेतल्या जाऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाइन प्रॅक्टिकल चाचण्या आणि तोंडी परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत मूल्यांकन गुण सीबीएसई सिस्टमवर २८ जूनपर्यंत अपलोड केले जाणार आहेत.

मुख्याध्यापकांची वेगवेगळी मतं

काही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की, बारावीच्या नियतकालिक चाचणी, पूर्व-बोर्ड गुण आणि अंतर्गत मूल्यांकन यांना अधिक वजन दिले जावे. तसेच विद्यार्थ्यी अकरावीचा अभ्यासक्रम गंभीरपणे घेत नाहीत त्यामुळे अकरावीच्या गुणांचा समावेश करणे अन्यायकारक ठरणार असल्याचे एका मुख्याध्यापकांनी सांगितले. एका मुंबईतील महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणाले की, सीबीएसई २०१८-१९ पासून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करू शकते कारण विद्यार्थी दहावीनंतर त्याच शाळेत शिक्षण घेत असतो.