चांद्रयान २ नं चंद्राच्या दिशेने उड्डाण घेतलं हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. १३० कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्याच शास्त्रज्ञांनी हातभार लावला या आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

प्रत्येक भारतीय या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते आणि तो क्षण पूर्ण झाला. चंद्रावर हे यान जाणार आहे. श्रीहरीकोटा येथून या यानाचं उड्डाण झालं आहे आता ते ६ सप्टेंबर रोजी चंद्रावर पोहचणार आहे. या मोहिमेमुळे चंद्राची नवी ओळख आपल्याला कळेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले.  हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारं हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज म्हणजेच सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांची वेळ चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली.