गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली आहे. एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. दरम्यान, २९-३० ऑगस्ट रोजी चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनच्या जवानांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा एकदा जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रात्रीच्या अंधारात वेशांतर करून चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सतर्क भारतीय जवांनांनी चीनच्या सैनिकांना हेरत त्यांचा घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला. चीनच्या ७ ते ८ मोठ्या गाड्या चेपुझी कॅम्पवरून भारतीय सीमेच्या दिशेनं येत होत्या. परंतु जवानांनी घेरल्याचं पाहताच त्या गाड्या माघारी परतल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

यापूर्वी गलवान खोऱ्यातही भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या अनेक सैनिकांना ठार केलं होतं. एकीकडे तणाव निवळण्यासाठी भारतासोबत चर्चा करत असलेल्या चीननं सीमेवरील आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीन या दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आल्याची माहिती समोर आली होती. यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगोंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं.