नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली असून हाच भाजपचा न्याय आहे का, असा सवाल केला आहे.

विधि शाखेच्या या विद्यार्थिनीला बुधवारी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

उन्नाव बलात्कार खटल्यात पीडितेच्या वडिलांना ठार मारण्यात आले, काकांना अटक करण्यात आली. त्यानंतर जनक्षोभाचा उद्रेक झाला आणि १३ महिन्यांनंतर आरोपी आमदाराला अटक करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाहजहानपूर प्रकरणात पीडितेला अटक करण्यात आली आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला, असा आरोप  प्रियंका यांनी यासंबंधात केलेल्या ट्वीटमध्ये केला आहे.