काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली येथे बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर निशाणा साधला. महात्मा गांधी यांचा भारत हवा की नथुराम गोडसेचा हे आता जनतेनेच ठरवायचं आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये जनता काँग्रेसला कौल देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपाने गेल्या पाच वर्षात फक्त आणि फक्त द्वेषाचं राजकारण केलं आहे. समाजात तेढ कशी निर्माण होईल, द्वेष कसा पसरेल हेच भाजपाने पाहिलं आहे. आता जनतेने ठरवायचं आहे की जनतेला नथुराम गोडसेचा भारत हवा आहे की महात्मा गांधी यांचा भारत हवा आहे. एकीकडे द्वेष, तेढ आणि तिरस्कार आहे तर दुसरीकडे प्रेम माया आणि आपुलकी आहे. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसची सत्ता आल्यास रोजगारांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले आहे. इतकंच नाही तर काँग्रेसची सत्ता आल्यास आपला देश चीनशी स्पर्धा करेल याची मला खात्री आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आजच्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा केला. स्वतःला चौकीदार म्हणवणाऱ्या पंतप्रधानांना आम्ही काही प्रश्न विचारले होते. त्यावर संसदेत पंतप्रधान दीड तास बोलले मात्र राफेल करारात अनिल अंबानींचा सहभाग का? यावर मोदी काहीही बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली सगळी आश्वासनं फोल ठरली आहे. मेक इन इंडियावरूनही त्यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडियाचा नारा कायम देतात. मात्र त्यांचे शर्ट, बूट आणि फोन हे सगळं मेड इन चायना आहेत. ज्या फोनमधून पंतप्रधान सेल्फी काढतात तोही मेड इन चायना आहे असंही राहुल गांधी म्हटले आहेत.