देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांवर बंदी लागू केल्यानंतर देशातील नागरिकांना सुट्ट्या पैशाच्या चणचणीचा सामना करावा लागत असून, नोटाबदलासाठी कितीतरी जणांना अनेक दिवस रांगेत उभे राहावे लागल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या नियोनशून्यतेबाबतीतला देशवासियांचा संताप आता सोशल मीडीयावरदेखील उमटू लागला असून, #छुट्टा_दे_दे_रे_मोदी हा हॅशटॅग शुक्रवारी टि्वटरवर ट्रेण्डमध्ये होता. टि्वटरवर या हॅशटॅगद्वारे समस्यांना वाचा फोडत टि्वटरकरांनी मोदींना घेरण्यास सुरुवात केली. ‘मेरा देश बदल रहा है, लाइन में लग रहा है’ असा संदेश एकाने लिहिला, तर ‘गलती हो गयी अब १५ लाख नहीं मांगेंगे, मगर छुट्टा तो दे दो।’ असे अन्य एका टि्वटरकराने लिहिले होते. टि्वटरवर पोस्ट करण्यात आलेले यासंदर्भातील काही संदेश हे असे होते - ‘बहुत दिन हो गए Ice Cream खाये हुए । अब तो छुट्टा दे दो’, ‘आज भी मोदी की हवा नहीं, आंधी है..क्या ये अच्छे दिन नहीं, ATM की कतार में राहुल गांधी है!’, ‘भाजपा के फैसलों का सम्मान करो, बेशक तुम्हारे घर में खाने पीने का सामान खत्म हो रहा हो, आवाज़ निकली तो देशद्रोही बनोगे’, ‘मेड को, दूध वाले को ,अखबार वाले , धोबी को, स्वीपर को चेक से पेमेंट करूं?' सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून, बँक आणि एटीएम बाहेरची गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. सरकार परिस्थितीनुसार योजनेत आणि नियमांमध्ये वारंवार बदल करत असून, नोटाबंदीचा निर्णय अंमलात आणताना सरकारने योग्य नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकर्षाने जाणवते. गुरुवारीदेखील काही बदल करण्यात आले, आता बँकेत ४५०० रुपयांऐवजी २००० रुपये मिळणार असून, ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे अशांना थोडासा दिलासा देण्यात आला आहे. लग्नपत्रिका दाखवून त्यांना बँक खात्यातून २.५ लाखांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. नोटाबंदीवरून विरोधी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. एकीकडे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत रस्त्यावर उतरल्या होत्या, तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींदेखील सरकारवर हल्ला चढवत आहेत. सर्वसामान्यांचा आक्रोश दर्शविणारे काही टि्वटस् -