मध्य प्रदेशातील राजकीय वादळ

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आणखी २० आमदार बंडखोरीच्या तयारीत असल्याचा आणि त्यांची लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचा दावा या राज्यातील २२ बंडखोर आमदारांनी मंगळवारी केला आहे.   त्यामुळे नजीकच्या भविष्यात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

बंगळूरुमध्ये आगमन झाल्यानंतर आणि राजीनामे पाठविल्यानंतर काँग्रेसच्या २२ बंडखोर आमदारांनी वार्ताहरांना सांगितले की, कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे आमचे नेते आहेत, आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्यासमवेत राजकारणात आहोत, आमच्यापैकी बहुसंख्य जण शिंदे यांच्यामुळेच राजकारणात आहोत, भाजपमध्ये प्रवेश करण्याची आमची इच्छा आहे, केंद्रीय पोलिसांकडून आम्हाला संरक्षण मिळाल्यास आम्ही मध्य प्रदेशमध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करू, असे एका महिला आमदाराने सांगितले.

आणखी २० आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा या २२ बंडखोरांनी केला आहे, मात्र त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे, ते आमच्यासमवेत आल्यास काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडेल आणि नव्या गटावर कोणत्याही कायद्यान्वये कारवाई होऊ शकणार नाही, असा दावाही केला जात आहे.

कमलनाथ सरकारला बुधवापर्यंत  म्हणणे मांडण्याचा आदेश

नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभेत तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत,  अशी मागणी करणारी याचिका माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली असून त्याबाबत बुधवापर्यंत म्हणणे मांडावे, असा आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला दिला. राज्य सरकार आणि विधिमंडळ सचिवांसह अन्य संबंधितांवर नोटिसा बजावण्यात येतील, असे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले.

राज्यपालांचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे

भोपाळ : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी बहुमत चाचणी घेण्याबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांना नव्याने आदेश दिले असून, ते पुढील कारवाईसाठी कमलनाथ यांनी मंगळवारी विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठविले आहेत.