संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीतून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या अन्य सदस्यांनी काढता पाय घेतला. या बैठकीतून बाहेर पडताना राहुल गांधींनी आरोप केला की, संसदीय समितीने सैन्याच्या गणवेशावर चर्चा करुन वेळ खराब केला. त्याऐवजी सैन्याला चांगल्या प्रकारे सुसज्ज कसं केलं जावं यावर चर्चा होणं अपेक्षित होतं, अस ते म्हणाले.

सुत्रांच्या माहितीनुसार, सीडीएस बिपिन रावत हे समितीपुढे जवानांच्या गणवेशाबाबत माहिती देत होते. यावेळी राहुल गांधी यांनी या चर्चेत हस्तक्षेप केला आणि लडाखमध्ये देशातील सैन्याची काय तयारी आहे? तसेच चीनविरोधात आपली रणनीती काय? यावर चर्चेची मागणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष जुअल ओराम यांनी राहुल गांधी यांना मध्येच बोलण्यापासून रोखले. त्यानंतर राहुल गांधी यांनी या बैठकीतून वॉक आऊट केला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत राजीव सांचा आणि रेवंथ रेड्डी हे देखील बैठकीतून बाहेर पडले.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. राहुल गांधी हे सातत्याने चीनसोबत लडाख सीमेवर सुरु असलेल्या संघर्षावर बोलत आहेत आणि पंतप्रधान मोदींवर आक्रमकपणे निशाणा साधत आहेत.

राहुल गांधी यांनी दावा केला होता की, “चीन भारताच्या भूभागात घुसला असून मोठ्या जमिनीवर कब्जा केला आहे. परंतू पंतप्रधान मोदी चीनला घाबरतात त्यामुळे काहीही करु शकत नाहीत.” एप्रिल महिन्यांत सीमेवर सुरु झालेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर राहुल गांधी अनेक वेळा सोशल मीडियातून आणि पत्रकार परिषदांमधून मोदींना घेरलं आहे. याशिवाय नेपाळ, बांगलादेशशी असलेल्या संबंधांवरुनही काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.