“मागील चार महिन्यांचा उपयोग देशातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा तयार करण्याबरोबर मानवी संसाधन वाढवणं आणि पीपीई किट्स, एन-९५ मास्क व व्हेटिंलेटर्स तयार करण्यासाठी करण्यात आला,” असं सांगत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील करोनाविरूद्धची लढाई संपली नसल्याचं प्रतिपादन केलं. संसदेत बोलताना हर्ष वर्धन यांनी देशातील करोना परिस्थितीविषयी माहिती दिली. त्याचबरोबर “करोनाविरूद्धची लढाई अजून फार दूर आहे,” अशी माहिती संसदेत दिली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले,”लॉकडाउनमुळे १४ लाख ते २९ लाख नागरिकांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवता आले. देशात कडक लॉकडाउन केल्यामुळे जवळपास ३७ ते ७८ हजारांच्या दरम्यान मृत्यू रोखण्यात यश आलं. मागील चार महिन्यांचा उपयोग देशातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा तयार करण्याबरोबर मानवी संसाधन वाढवणं आणि पीपीई किट्स, एन-९५ मास्क व व्हेटिंलेटर्स तयार करण्यासाठी करण्यात आला,” असं आरोग्यमंत्री म्हणाले.

करोनाविरुद्धच्या लढाईबद्दलही हर्ष वर्धन यांनी इशारा दिला. ते म्हणाले, “मी सदस्यांना आठवण करू देऊ इच्छितो की, करोनाविरुद्धची लढाई अजून फार दूर आहे. मी सभागृहाला सांगतो की, देशातील करोना प्रसार रोखण्यासाठी सरकारनं सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. देशातील करोना मृत्यूदर आणि रिकव्हरी दर सध्या अनुक्रमे १.६७ टक्के आणि ७७.६५ टक्के इतका आहे. भारत करोना मृत्यूची संख्या प्रति मिलियन ३,३२० इतकी रोखण्यास यशस्वी ठरला आहे. जो की जगात सर्वात कमी आहे,” असं हर्ष वर्धन यांनी संसदेत सांगितलं.

देशातील सद्यस्थिती आहे अशी…

२४ तासांत देशात ८३ हजार ८०९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १ हजार ५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४९ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात सध्या ९ लाख ९० हजार ६१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ३८ लाख ५९ हजार ४०० जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र, देशातील मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत ८० हजार ७७६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.