राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असतानाच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लशी संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. “पुढच्या तीन ते चार महिन्यात देशात करोनावरील लस तयार होईल” असा विश्वास हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. फिक्की एफएलओच्या एक वेबिनारमध्ये ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

“पुढच्या तीन ते चार महिन्यात करोनावरील लस तयार होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. वैज्ञानिक डाटाच्या आधारावर कोणाला प्राधान्य द्यायचे त्याचा आराखडा ठरवण्यात येईल. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, करोना योद्ध्यांना सहाजिकच प्राधान्य मिळेल, त्या खालोखाल वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना प्राधान्य मिळू शकते” असे त्यांनी सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर ती पोहोचवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. २०२१ आपल्या सर्वांसाठी चांगले वर्ष ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये २५ ते ३० कोटी लोकांसाठी करोना लशीचे ४० ते ५० कोटी डोस उपलब्ध झालेले असतील, असा अंदाजही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.

“लशी बाबत प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी, जे करोना योद्धे आहेत, त्यांना प्राधान्य मिळेल. त्यानंतर ६५ वर्षावरील व्यक्ती, ते झाल्यानंतर ५० ते ६५ वयोगटाला प्राधान्य मिळू शकते” असे हर्षवर्धन म्हणाले.
“वयोवुद्ध व्यक्ती झाल्यानंतर ५० पेक्षा कमी वयाचे, ज्यांना अन्य आजारही आहेत, त्यांच्याबाबत वैज्ञानिक दृष्टीकोनातून तज्ज्ञ निर्णय घेतील. आम्ही याबाबत सविस्तर योजना तयार केली आहे. पुढच्यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये काय करायचे आहे? त्याची प्लानिंग आतापासून सुरु केली पाहिजे” असे हर्ष वर्धन म्हणाले.