बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्य़ातील जंगल भागात केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कमांडो युनिटने चकमकीत पाच नक्षलवाद्यांना ठार केले असून त्यांच्याजवळून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

डाव्या विचारसणीच्या अतिरेक्यांचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्य़ाच्या दिभारा भागात काही सशस्त्र माओवादी फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफचे ‘कोब्रा’ पथक त्यांच्या मागावर निघाले. शुक्रवारी सायंकाळी उशिरा कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झडली. या चकमकीनंतर घटनास्थळी पाच मृतदेह आढळले, तसेच १ एके अ‍ॅसॉल्ट रायफल, एक कार्बाईन, एक देशी कट्टा व इतर दारूगोळा जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या वनक्षेत्रात अंधार पसरल्यामुळे जवानांना हा भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यास तसेच चकमकीची अधिक माहिती देण्यास उशीर होत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.