उत्तर प्रदेशमधील फतेहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आंब्याच्या झाडाची पानं तोडल्याने जमावाकडून मारहाण झालेल्या २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मारहाण झाल्याने हा तरूण अतिशय नाराज झाला होता, यामुळेच त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा या तरूणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. धर्मपाल दिवाकर असं नाव असलेला हा तरूण मालवण पोलिस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत येणाऱ्या अस्ता या गावात राहत होता. या ठिकाणी स्वतःच्या घरात मंगळवारी त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती स्टेशन ऑफिसर शेरसिंग राजपूत यांनी बुधवारी दिली.

आणखी वाचा- “तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत”

आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो जेव्हा गावात बकऱ्या चरण्यास घेऊन गेला होता, तेव्हा त्यांने अंब्याच्या झाडाची पानं तोडली म्हणून काही जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. तर, मारहाण झाल्यानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं आणि गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती राजपूत यांनी दिली आहे.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.